
Monsoon News
दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीचा आठवडा कडाक्याच्या उकाड्यात जातो. यंदा मात्र अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह ढगाळ वातावरण अनुभवायला मिळतय . त्यामुळे, 'यंदा मान्सून कधी दाखल होणार? ' हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
सामान्यतः मे महिन्याच्या अखेरीस हवामानात बदल घडू लागतात – ढगाळ वातावरण तयार होते, विजा चमकतात आणि जोरदार वारे वाहू लागतात. हे सगळं पूर्वमोसमी पावसाची चाहूल देणारे संकेत असतात. मात्र, यंदा हे बदल मे च्या सुरुवातीलाच पाहायला मिळत आहेत.
दरवर्षी अंदमान-निकोबार बेटांवर 18 ते 22 मेदरम्यान मान्सून दाखल होतो. परंतु यंदा मान्सून आठ ते दहा दिवस आधीच तिथे पोहोचण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, 13 मे पर्यंत मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होऊ शकतो. यामुळे केरळमध्येही मान्सून नेहमीपेक्षा लवकर पोहोचण्याची शक्यता आहे.
जरी हवामान विभागाने केरळ आणि भारताच्या मुख्य भूमीवरील मान्सूनच्या आगमनाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली, तरी काही अभ्यासकांचा अंदाज आहे की, जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून यंदा मेच्या अखेरीस महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो.
हवामान अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार, सध्या अंदमान-निकोबार भागात ढगांच्या हालचालींमध्ये वाढ झाली आहे, तसेच वाऱ्याचा वेगही सातत्याने बदलत आहे. यावरून मान्सून वेळे आधी पोहोचण्याची शक्यता बळकट होते.
याशिवाय, समुद्रसपाटीवर हवेचा दाब तुलनेने जास्त असून, जमिनीवर दाब कमी असल्याने समुद्राकडून जमिनीकडे वाऱ्यांचा जोर वाढत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या कडाक्यातही हवामानात अचानक बदल जाणवत आहेत.
Share your comments