1. यशोगाथा

ढोबळी मिरचीमुळे पडसाळी गावाचे बदलले अर्थकारण ; होतेय लाखो रुपयांची उलाढाल

राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळ राहत असतो, त्यातील एक जिल्हा म्हणजे सोलापूर. या जिल्ह्याला कोरडवाहू जिल्हा अशी ओळख प्राप्त झाली आहे. पण येथील एका पिता-पुत्रामुळे या जिल्ह्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
मा. प्रदीप गायकवाड स्वतःच्या ढोबळी प्रक्षेत्रात पुणे चे संचालक डॉक्टर लाखन सिंह व आटारी बेंगळूर चे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. रेड्डी , कृषी विज्ञान केंद्र सोलापूर चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर ला रा तांबडे यांना प्लॉट मधील बारकावे समजून सांगताना.

मा. प्रदीप गायकवाड स्वतःच्या ढोबळी प्रक्षेत्रात पुणे चे संचालक डॉक्टर लाखन सिंह व आटारी बेंगळूर चे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. रेड्डी , कृषी विज्ञान केंद्र सोलापूर चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर ला रा तांबडे यांना प्लॉट मधील बारकावे समजून सांगताना.

राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळ राहत असतो, त्यातील एक जिल्हा म्हणजे सोलापूर. या जिल्ह्याला कोरडवाहू जिल्हा अशी ओळख प्राप्त झाली आहे. पण येथील एका पिता-पुत्रामुळे या जिल्ह्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे.

शेतीतून कशी किमया साधता येते याची कल्पना देत देत त्यांनी आपल्या बरोबर दुसऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा करुन दिला आहे. ही कथा आहे, उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावातील पिता-पुत्राची. याच्या मार्गदर्शनाने साधरण ४०० ते ५०० एकर क्षेत्रात ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची उत्पन्न घेतलं जात आहे. कृषिभ्षण कै. ज्योतिराम गायकवाड यांनी शबरी फार्मची स्थापना केली आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने प्रदिप गायकवाड यांनी या फार्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवी उन्मेद मिळवून दिली.

सोलापूर जिल्हयाची कोरडवाहू जिल्हा अशी ओळख आहे, पण ही ओळख पुसून जिल्हयातील शेतक-यांना आर्थिक, सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याची काम उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावचे सुपूत्र कृषिभ्षण कै. ज्योतिराम गायकवाड यांनी केले.आपल्या जिल्ह्याला एक चांगली प्रतिष्ठा मिळवून द्यायची असेल तर शेती हाच एकमेव राजमार्ग आहे, असे समजून त्यांनी आयुष्यभर त्यात काम केले. यासाठी त्यांनी बांधावरच्या ‘बोर’ पिकाला शेतातील महत्वाच्या फळपिकाचा दर्जा मिळवून दिला. स्वत: बरोबरच माझ्या इतर शेतकरी बांधवही चार पैसे कसे मिळतील,यासाठी ज्योतिराम गायकवाड यांनी शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन केले. त्यांची पडसाळी येथील शेती ‘शबरी फार्म’नावाने ओळखली जावू लागली. हजारो शेतकरी त्यांचा शबरी फार्मला भेट देऊन बोर पिकाचे लागवड तंत्रज्ञान सामजावून घेत होते. परंतु नियतिला काही वेगळचं मान्य होतं. एका अपघातात वयाच्या ५३ व्या वर्षी ज्योतिराम गायकवाड याचे अकस्मित निधन झाले.

पुढे हा सर्व कार्यभार वयाच्या २१ व्या वर्षी त्यांचे थोरले सुपुत्र श्री. प्रदिपजी गायकवाड यांच्याकडे आला. सुरूवातीचा काही काळ गेल्यानंतर त्यांनी कृषी क्षेत्रात आपल्या वडिलांप्रमाणेच डाळींब, टोमॅटो, काकडी, वांगी इत्यादी पिकांमध्ये विक्रमी उत्पादन घेत इतर शेतक-यांना मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली. त्याचाच एक भाग म्हण्ाून पडसाळी येथे ग्रामीण युवक शेतक-यांच्या ढोबळी उत्पादकांच्या गटाला मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली.

तांत्रिक मार्गदर्शन: 

वर्ष २०१४-१५ च्या काळात मंगळवेढा तालुक्यात ढोबळी मिरचीची लागवड शेडनेट हाऊसमध्ये झाली आणि पहिल्याच वर्षी शेतक-यांना चांगले उत्पन्न मिळाले. त्यामुळे त्याभागात शेडनेट मध्ये जवळपास ४० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली. शासनाच्या योजनेमुळे पडसाळी गावातही १३ शेडनेट उभे राहिले होते.  मात्र पुढे चालून त्यामध्ये पांढरी माशी व इतर रोगांचा प्रादुर्भावामुळे उत्पन्नाचे सातत्य राखता आले नाही. मात्र त्याचवेळी हेच पीक ओपन पध्दतीने म्हणजेच कोणतेही शेडनेट / पॉलीहाऊसचा वापर न करता शबरी कृषि प्रतिष्ठान, सोलापूरचे अध्यक्ष मा. श्री. प्रदीपजी गायकवाड यांनी हिरज व पडसाळी येथील प्रक्षेत्रावर सलग तीन वर्ष लावले. त्यानंतर त्यांची खात्री पटली की ढोबळीमध्ये अधिक उत्पादनासाठी शेडनेटपोठी एकरी १२ ते १३ लाखाचा खर्च न करता ही उघड्यावर लागवड केली तरी उत्कृष्ठ उत्पादन घेता येते. हाच प्रयोग त्यांनी त्यांच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी या गावातील शेतकरी तरूणांच्या निदर्शनास आणून दिला.

 यामध्ये युवकांना लक्षात आले की, पारंपारिक पिकांपेक्षा ढोबळीमधील पिकातुन चांगली अर्थार्जन होते. प्रथम वर्षी एकूण २० युवकांनी ५० एकर क्षेत्रावर लागवड केली व एकरी ४-५ लाख रूपये निव्वळ नफा मिळविला. येथुनच पडसाळी भागातील इतर शेतकरी युवकांनी प्रेरणा घेतली.पडसाळी येथील जयाचे शेडनेटमधील ढोबळी उत्पादन बंद झाले होते त्यांनीही श्री.प्रदिपजी गायकवाड यांच्या सल्यानुसार ओपन पध्दतीने ढोबळी लागवड करण्याचा निर्णय घेतला.  हूळूहळू येथे ढोबळी पीक उत्पादकांचा एक गटच निर्माण झाला. पहिल्या वर्षी उत्पन्न निघाल्यानंतर दुस-या वर्षी (२०१६-१७) या पिकाखाली २५० एकर क्षेत्र तयार झाले. यावेळीही सर्व युवकांनी अधिक उत्पादनाचे नवे उच्चांक गाठले. अशाप्रकारे वर्ष २०२० साली एकूण ४००-५०० एकर क्षेत्र हे निव्वळ ढोबळी लागवडी खाली आहे.

हेही वाचा : यशोगाथा; शेतीला कुक्कुटपालन अन् शेळीपालनाची जोड देऊन मिळाली नवी ओळख 

 यामध्ये या युवकांना तांत्रिक माहितीची स्त्रोत म्हणून स्वत: श्री. प्रदिप गायकवाड सर्व युवकांना तांत्रिक माहिती पुरवत होते. यामध्ये, जमिनीची निवड, मृदा निर्जंतुकीकरण, वाफे तयार करणे, त्यामध्ये विविध रासायनिक तसेच सेंद्रिय खतांची योग्य मात्रा मिसळणे, त्यावर मल्चिंग पेपर हाथरणे, लागवडीसाठी योग्य जातीचे निवड करणे, रोपांची लागवड करणे, पुढील औषधांच्या फवारण्या खतांची मात्रा, झाडांची बांधणी, काढणी, पॅकिंग, बाजारपेठ इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश होता. उत्पादन प्रक्रियेत लागणा-या निविष्ठांचे नियोजन, मजुरांचे नियोजन, मार्केटचा शोध घेणे, शेतमालाला जास्तीत जास्त भाव कसा मिळेल, यासाठीही विशेष प्रयत्न श्री. प्रदिपजी गायकवाड यांनी केले.

बाजारपेठेच्या शोधासाठी विशेष प्रयत्न:

पॅकिग असते महत्वाची -

 यामध्ये मार्केटचा शोध घेताना अनेकवेळा स्वत: प्रदिप गायकवाड हे राज्यातील व्यापाऱ्यांची भेट घेतात. सुरुवातीला त्यांनी जोखीम घेत सुरतला माल पाठवला. पण पॅकिग चांगली नसल्यानेमालखराब होण्याचा धोका होता, त्यावेळी सुरतचे व्यापारी ढोबळी मिरची सोलापूर येथून मागवण्यास घाबरत होते. मिरची केलेली पॅकिंगमध्ये मिरचीला हवा खेळती राहत नव्हती, त्यामुळे पॅकिंगमध्ये बदल केले. हवा खेळती राहण्यासाठी विशेष पॅकिंग केले. नंतर मात्र हा प्रयोग श्री. प्रदिप गायकवाड यांनी यशस्वी केला व आत्ता हेच व्यापारी या गावात माल घेण्यास स्वत: येतात. सुरताला माल पाठवणे यशस्वी झाल्यानंतर शिमला मिरची १८००ते २००० कि. मी. वर असणारे जमशेदपूर, कानपूर, दिल्ली, पटना, कलकत्ता, जयपूर येथील मार्केटला पाठवू लागले. यातून त्यांना शेतमालाला चांगला भाव मिळू लागला.

यामध्ये स्थानिक व्यापारी इतर मार्केटच्या तुलनेत जास्त भाव देऊ लागले इथे नोंद घेण्यासारखे म्हणजे शेतकऱ्यांकडे स्वत:च्या मालाचा भाव ठरवण्याचा दुर्मिळ अधिकार त्यांना मिळाला व ३० रू. किलोचा भाव ३४ रू. पर्यंत वाढवून मिळाला. विशेष म्हणजे जवळच्या मार्केटला तेथील व्यापारी माल पाठवलेल्या बॉक्समागे २ किलो कटता म्हणून कमी वजन पकडत. तिथे सुध्दा मालाच्या गुणवत्तेमुळे व उत्पादकांच्या एकत्रित दबाव तंत्रामुळे बॉक्समागे २ किलोचा कटता आता शून्यावर आणला. रोज १५०० ते २००० बॉक्समागे प्रति बॉक्स दोन किलोच्या हिशोबाने ३ ते ४ हजार किलोचे ४० रू. प्रमाणे रोज १.२० ते १.६० लाखाने जास्त उत्पन्न मिळू लागले.  एका महिन्याला ३० ते ४० लाख रू. जास्तीचे गावात येऊ लागले. याचाच दुसरा परिणाम म्हणजे जे मजुर शेतात येत होते, त्यांनी सुध्दा प्रेरणा घेत स्वत:च्या शेतात ढोबळीचे उत्पादन घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे सध्या गावात ४०० ते ५०० एकरावर हे पीक घेतले जाते.

 

इतर संलग्न व्यवसायांमुळे तरूणांना रोजगार / व्यवसायाच्या संधी :

यातून दुसरे व्यवसाय वाढीस लागले ते म्हणजे रोपवाटिका, कृषी निविष्ठा विक्री, माल वाहतूक व्यवसाय, शेत मजुरांना काम इत्यादी. पडसाळी गावातच ढोबळीची ४० ते ५० लाख रोपे लागतात.गावातील २-३ तरूणांना रोपवाटिकेसाठी प्रोत्साहन दिले गेले. जवळपास एकरी १२ हजार ५०० रोपे लागतात त्यानुसार गावातच एकूण ४० ते ५० लाख रोपाचा एकूण ४५ ते ५५ लाख रूपयांचा संलग्न व्यवसाय निर्माण झाला. गावातील पैसा गावातच उत्पन्नाच्या स्वरूपात फिरू लागला. तसेच ते इतर गावातही दर्जेदार रोपांच्या निर्मितीच्या जोरावर रोपे पूरवत आहेत.  त्यातूनही जास्तीचे उत्पन्न मिळत आहे. दुसरा संलग्न व्यवसाय म्हणजे गावातील ३-४ तरूणांनी कृषी निविष्ठा विक्रीचा व्यवसाय सुरू केला व त्यातून प्रत्येक दुकानाचा १ ते १.५ कोटीचा व्यवसाय होऊ लागला. 

 गावात शेतमालासाठी लागणारी वाहने ही इतर ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागत होती. येथेही श्री. प्रदिप गायकवाड यांनी गावातील काही तरूणांना पीकअप, छोटे टेम्पो सारखी वाहने खरेदीस प्रोत्साहीत केले त्यासाठी त्यांना लागणारे अर्थसहाय्य ही बँकेद्बारे मिळवून देण्यास मदत केली.याव्यतिरीक्त उत्पादन व विपणन प्रक्रियेत लागणा-या अनेकवस्तू जसे की बॉक्स, सुतळी, तार, काठ्या इत्यादी वस्तुंचाही व्यापार करण्यामध्ये गावातील ग्रामीण युवक पुढे सरसावले. या व्यतिरीक्त मोठया प्रमाणात ४००ते ५०० शेत मजुरांना गावातच काम मिळू लागले यात बाहेर गावातील जवळपास २०० ते ३०० कामगारांना ५ ते ६ महिने रोज काम मिळू लागले.  

एकंदरीतच पडसाळी तालुका उत्तर सोलापूर येथे मागील चार ते पाच वर्षात कृषी क्षेत्रात अनुकुल बदल होताना दिसत आहेत. मुळ म्हणजे शेतीमधुन चांगले उत्पन्न मिळून आपण आपला चरीतार्थ चांगल्या पध्दतीने चालवू शकतो हा आत्मा विश्‍वास शंभर ते दिडशे २० ते २५ वर्ष या वयाच्या तरूणांमध्ये निर्माण झाला हे फार मोठे यश मानायला हवे. दुसरी बाब म्हणजे त्यांच्या पारंपारिक पिकांपासून दुस-या पिकांकडे वळताना जोखीम पत्करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण झाली.    तिसरी बाब म्हणजे त्यांचे पुर्वीचे उत्पन्नापेक्षा आताच्या उत्पन्नात निश्‍चितच तीन ते चार पटीने वाढ झाली. मोठया प्रमाणात गावात शेतमजुरांना काम मिळाले आणि सगळयात महत्वाचे म्हणजे पडसाळी येथे ढोबळी पिक अनेक संलग्न व्यवसाय निर्मातीसाठी कारणीभूत ठरले. यातून युवकांमध्ये व्यावसायिक दृष्टीकोन विकसीत झाला. त्यामुळे नोकरीच्या मागे न लागता आपणच दुस-यांना रोजगार देऊ शकतो ही वस्तूस्थिती अनुभवास आली.

हेही वाचा : टायकोग्रामा बोंड अळीवरील जालीम उपाय: वाचा शेख आरीफ यांच्या लॅबची यशोगाथा

अनुभवास आलेले सामाजिक बदल :

या सगळयामुळे गावातील शेतक-यांची पत वाढली.  गावातील तसेच शेजारील भागातील व्यापारी सुध्दा आदराने बोलू लागले. सण समारंभात पाहुणे राऊळे मान सन्मानाची वागणूक देऊ लागले. हा बदल या युवकांच्या आयुष्यात येण्यासाठी निव्वळ एका गोष्टीने हा सर्व बदल झाले आणि तो बदल म्हणजे फक्त आणि फक्त शबरी कृषी प्रतिष्ठान, सोलापूरचे अध्यक्ष मा. श्री. प्रदिपजी गायकवाड यांनी ढोबळी उत्पादनाच प्राप्त झालेले ज्ञानाचे स्वामीत्व स्वत: पूरते मर्यादित न ठेवता त्याला आपल्या गावातील तरूणांना ज्ञानाचे हे द्वार खुले केले आणि नुसतेच लागवडीपुरते प्रोत्साहित केले नाहीतर उत्पादनाच्या समस्येच्या प्रत्येक टप्प्यांवर मोलाचे मार्गदर्शन केले. युवकांमध्ये या पिकाबद्दल गोडी निर्माण केली.  आजमितीला या गावात २०-२२ युवक स्वत: इतरांना मार्गदर्शन करतात. पडसाळी व आसपासच्या ४-५ गावांमध्ये ढोबळीचे उत्पादन होऊ लागले.

सध्या शबरी कृषि प्रतिष्ठान, सोलापूरचे अध्यक्ष या नात्याने कृषि विज्ञान केंद्र, सोलापूरला गेली २० वर्षे दिशा दर्शनाचे ही काम श्री. प्रदिपजी गायकवाड पार पाडत आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत मुक्त कृषि शिक्षण केंद्राची स्थापना वर्ष १९९७ रोजी झाली तेव्हा पासून आतापर्यंत जवळपास ६ हजार विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले असुन कृषि पदविका, उद्यान विद्या पदविका, कृषि पदवीधर, उद्यानविद्या पदवीधर इ. अभ्यासक्रम यशस्वीपणे राबवून त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावला व त्यामुळे त्यांना चरीतार्थासाठी नोकरी / व्यवसाय इ. संधी निर्माण करून दिले. कृषिभुषण कै. ज्योतिराम गायकवाड यांनी आयुष्यभर सुरू ठेवलेला ज्ञानदानाचा वसा पुढे श्री. प्रदिपजी गायकवाड यांनी सुरू ठेवला.  ज्योत से ज्योत जलाते चलो या उक्तीप्रमाणे हे काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. 

प्रति एकरी ढोबळी उत्पादन ताळेबंद

खर्च  
१. पूर्व मशागत :  
    नांगरणी, कुळवणी :    ३०००/-
बेड तयार करणे, सरी पाडणे, मल्चिंग पेपर टाकणे :            ४०००/-
ड्रिप व्यवस्थापन :    ७०००/-
रोपे ( एकरी १२५००+५०० तुटाळ) प्रति १.८० /- प्रमाणे २३ हजार ४००रु./- 
   
२. आंतरमशागत  
आळवणी (३ प्रति आळवणी ६ महिला) ३६००/-
झाडांना आधार देणे  (तारकाठी वार्षिक खर्च विभागूण ) १५ हजार रु./-
सुतळी : ४,५०० रु/-
बांधणी मजूरी : १३ हजार ५०० रु./-
खुरपणी : ७ हजार रुपये/-
फवारणी (विद्राव्य खते/ किटकनाशके/रोगनाशके) १,५०,०००/-
   
३. तोडणी / पॅकींग  

६ महिला, २ गडी प्रति दिन प्रति तोडणी X एकूण १७ तोडण्या

३२,५००/-
बॉक्स - ७०००/-
   
४. वाहतूक व्यवस्था :

शक्यतो माल जागेवरच विकला जातो.                 

एकूण :   ७०५००/-
   
ब) उत्पादन  

प्रति एकरी ३० टन (१७ ते २५) तोडण्या प्रति तोडणी २ ते ३ टन सर्व साधारण दर रू. २५ प्रति किलो

७५००००/-  
   
प्रति एकर अंदाजे उत्पन्न : ,५०,०००/-

प्रति एकर खर्च :    

,७०,००/-
प्रति एकर निव्वळ नफा : ,७९,००/-
   

 

लेखक -

१)  श्री. पी. ए.  गोंजारी,                                     २)    डॉ. एल. आर. तांबडे 

विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार)                             वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख

कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर                             कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर

English Summary: Due to capsicum chillies change padsali villages economy cycle Published on: 01 January 2021, 04:17 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters