![](https://kjmarathi.b-cdn.net/media/13292/tur-crop-600.jpg)
उस्मानाबाद : दोन दिवसापूर्वी झालेला पाऊस हा रब्बी हंगामासाठी पोषक होता पण वातावरण बदलाचे परिणाम आता खरीप हंगामातील पिकावर जाणवू लागले आहेत. या अवकाळी पावसामुळे कापसाच्या बोंड्याचे नुकसान झाले आहे तर तुरीलाही धोका निर्माण झाला आहे. खरीप हंगामातील कापूस आणि तुर ही दोनच पिके सध्या वावरात आहे.
कापसाची वेचणी सुरु झाली आहे. मात्र, तुर पीक हे फुलअवस्थेतच आहेत. बदलत्या वातावरणामुळे (outbreak of insect on turi) तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे तर फुलगळतीचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वेळीच फवारणीची कामे केली तरच हे पीक देखील पदरात पडणार आहे.
मध्यंतरीच्या अतिवृष्टीने सोयाबीन या पिकाचे नुकसान झाले होते तर आता अवकाळी पावसाचा परिणाम हा कापूस आणि तुरीवर होऊ लागला आहे. सध्या तूर ही फुलोऱ्यात ते शेंग लागणीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे या पिकातून शेतकऱ्यांना उत्पादनाची आशा आहे. मात्र, सोयाबीनप्रमाणेच अंतिम टप्प्यात तुरीची अवस्था झालेले आहे. मात्र, अधिकचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांकडे फवारणीचा पर्याय आहे.
मध्यंतरीच्या पावसातून तुर पिकाला फटका बसलेला नाही. पण सध्याच्या बदलत्या वातावरणाचा धोका निर्माण झाला आहे. विशेष: मराठवाड्यातील वातावरणात बदल झालेला आहे. तीन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस हा उस्मानाबाद, बीड, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये बरसलेला आहे. शिवाय ढगाळ वातावरण अद्यापही कायम आहे. त्यामुळे तुरीवर शेंगअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे शिवाय फुल गळतीचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात आलेले पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी आता फवारणीच्या कामाला लागलेला आहे. शिवाय किटकनाशकांचे दरही वाढलेले आहेत. मात्र, सोयाबीनप्रमाणेच तुरीचेही नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी फवारणी करुन घेत आहे.
हेही वाचा : रब्बी हंगामातील पिकांसाठी सुक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करा आणि विक्रमी उत्पादन मिळवा
असे करा कीडीचे व्यवस्थापन…
तुरीवरील कीड नियंत्रणासाठी पहिली फवारणी ही प्रोफेनोफॅास किंवा क्चिनॅालफॅास 20 मिली प्रति लिटर 10 लिटर पाणी या प्रमाणात करावी. तर दुसरी फवारणी ही इमामेकटीन बेंझोएट 4 ग्रम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. धुक्याचा परिणाम टाळण्यासाठी या दोन्ही किटकनाशकांसोबत कार्बेडाझिम 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फावरणी करावी.
या किटकनाशकांच्या माध्यमातून तर नियंत्रण मिळवता येते पण कीड नियंत्रणासाठी पक्षी थांबेदेखील उपयोगी ठरत आहेत. ज्या प्रमाणे शेत जमिनीची मशागत सुरु असते त्या दरम्यान पक्षी हे किटकांचे सेवन करतात अगदी त्याप्रमाणेच पक्षी थांबे केले तर कीड नियंत्रणही होते.
Share your comments