1. पशुधन

अहमदनगर जिल्ह्यात वाढले शेळीपालनाचे प्रमाण, ५ वर्षात शेळींची संख्या ४ लाखाच्या पार

दुग्धोत्पादनात अहमदनगर जिल्हा देशात अग्रेसर गणला जातो. आता शेळीपालनाच्या नावाने ओळखला जाऊ लागला आहे. शेळी-बोकडाच्या मटणाचे दर सातत्याने तेजीत आहेत. कातडीला भाव मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चातील शेळीपालन फायदेशीर ठरत आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
नगर जिल्ह्य़ात वाढतय शेळीपालन

नगर जिल्ह्य़ात वाढतय शेळीपालन

दुग्धोत्पादनात अहमदनगर जिल्हा देशात अग्रेसर गणला जातो. आता शेळीपालनाच्या नावाने ओळखला जाऊ लागला आहे. शेळी-बोकडाच्या मटणाचे दर सातत्याने तेजीत आहेत. कातडीला भाव मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चातील शेळीपालन फायदेशीर ठरत आहे.

२०व्या राष्ट्रीय पशुगणनेत जिल्ह्य़ातील शेळ्यांच्या संख्येत ५ वर्षांत ४ लाख २ हजार ४२ ने वाढ झाली आहे. तर गाई, म्हशी, मेंढय़ा, डुकरे आदी पशुधन घटलेले आढळते. जिल्ह्य़ातील १० लाख १८ हजार ४४७ कुटुंबे पशुपालनात आहेत. त्यातील किमान साडेचार लाख कुटुंबे शेळीपालनात असल्याचा पशुसंवर्धन विभागाचा अंदाज आहे.राष्ट्रीय पशुगणनेची आकडेवारी लक्षात घेतली तर नगरमधील शेळ्यांच्या संख्येत तुलनेत लक्षणीय वाढ होऊन आता ११ लाख ९४ हजार ५२ झाली आहे.

हेही वाचा : कमी खर्चात करा शेळीपालन, अन् व्हा मालामाल

जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या गणनेनुसार जिल्ह्य़ातील पोल्ट्री फॉर्मची संख्या ३३४१ आहे. त्यामध्ये १ कोटी १४ लाख ४१ हजार पक्षी आहेत. मात्र यातील ३३०५ बॉयलर तर अंडी देणारी केवळ ३६ फार्म आहेत. म्हशींची संख्या २ लाख २१ हजार ३५५ आहे. त्यात केवळ आठची घट झाली आहे तर मेंढय़ांची संख्या २ लाख ८५ हजार ७५२ आहे. त्यामध्ये जवळपास ७६ हजाराने घट झाली आहे. शेळीपालनासाठी लागणारा कमी खर्च व मटण, दूध व कातडीसाठी मिळणारा भाव यामुळे शेळीपालनात मोठी वाढ झाली आहे. मात्र अद्यापि त्याला विपणनाची फारशी जोड मिळालेली नाही. हा व्यावसायिक पारंपरिकतेवरच अवलंबून आहे. येथे ‘कृषीकुमार गोट-शिप प्रोडय़ुसर कंपनी’ अशा काही संस्था स्थापन झाल्या आहेत, तर मटण व्यवसायातील काही बडय़ा कंपन्यांचे लक्षही नगरच्या बाजारपेठेकडे लागले आहे.

 

नगरच्या बाजारातून या कंपन्या शेळ्यांची खरेदी करू लागल्या आहेत. या कंपन्या त्याची जाहिरातही करतात. शेळीच्या दुधाला मोठय़ा रुग्णालयांकडून मागणी आहे. जिल्ह्य़ालगतच्या सिन्नरमध्ये ‘गोट चीज’ची निर्यात करणारी कंपनी सुरू झाली आहे. त्याचाही फायदा जिल्ह्य़ात मिळू लागला आहे. मात्र अद्यापि हा व्यवसाय पारंपरिक पद्धतीवर आधारलेला आहे. एकत्रित किंवा बंदिस्त शेळीपालनाला फारसे यश मिळाले नाही. तरीही शेळ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

हेही वाचा : शेळीपालन करायचं? मग हा लेख आहे तुमच्या फायद्याचा, शेळीपालनाची सर्व माहिती

सन २०१२ मध्ये बोकडाच्या मटणाचा भाव ३०० रुपये प्रति किलो होता. तो आज ७०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. कातडीला ३५० रुपयांपर्यंत भाव मिळतो. दुधाला ७० ते ८० रुपये प्रतिलिटर दर मिळतो. त्या तुलनेत खर्च कमी आहे. दिवसभर फिरवा आणि रात्रीचा निवारा द्या, अशा पद्धतीने शेळीपालन होते. दिवसाला कोरडा चारा ३.५ ते ४ किलो आणि ओला चारा ९ किलोपर्यंत लागतो. तो शेतात बांधावर सहज उपलब्ध होतो. केंद्र व राज्य सरकार, महाराष्ट्र महिला विकास महामंडळ यांच्या शेळीपालन अनुदानाच्या योजनाही आहेत.

 

कृषिप्रधान अर्थव्यवस्थेत पशुगणनेस महत्त्व आहे. २० व्या राष्ट्रीय पशुगणना सन २०१७ मध्ये अपेक्षित होती. प्रत्यक्षात ऑक्टोबर २०१९ च्या दरम्यान झाली. यंदा प्रथमच ऑनलाइन गणना करण्यात आली, मात्र त्यासाठी आवश्यक असणारे टॅब उपलब्ध करण्यात दिरंगाई झाली. ऑनलाइन गणना होऊनही त्याची आकडेवारी अद्याप पुरेशा प्रमाणात जाहीर झालेली नाही.

मांसाची वाढती मागणी तसेच यामध्ये मोठय़ा कंपन्यांचा वाढलेला सहभाग यामुळे मटणाला किफायतशीर दर मिळत आहे. त्यामुळे नगर जिल्ह्य़ात शेळीपालनाकडे ओढा वाढला आहे. राष्ट्रीय पशुगणनेत शेळ्यांची संख्या सुमारे ४ लाखाने वाढली आहे. शेळीपालनाच्या व्यवसायात बचतगट सहभागी असल्याची संख्या मोठी आहे. परंतु अद्यापि शेळीपालन पारंपरिक पद्धतीनेच होत आहे. त्याला ‘मार्केटिंग’ची जोड देण्याची आवश्यकता आहे. या व्यवसायातील लोकांनी खरेदी-विक्री करताना एकत्रित करावी तसेच विक्री वजनावर करावी. त्याचा अधिक फायदा होईल.

–डॉ. सुनील तुंबारे, उपायुक्त पशुसंवर्धन विभाग, नगर

शेळीपालन करायचं असेल तर

महाराष्ट्रामध्ये शेळी पालनाच्या व्यवसायाला चांगला वाव आहे आणि शेतकर्‍यांची या व्यवसायामुळे आर्थिक अरिष्टातून सुटका होऊ शकते हेही लक्षात आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन सुद्धा या व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अशा उद्योगांचे प्रशिक्षण देणार्‍या संस्था शेळी पालनाचे प्रशिक्षण देणारे वर्ग आयोजित करीत आहेत.
ज्या शेतकर्‍यांना बंदगोठा शेळी पालन करण्यामध्ये रूची असेल आणि या व्यवसायात काही करण्याची इच्छा असेल त्या शेतकर्‍यांनी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा. या दोन संस्थांच्या मार्फत भरवल्या जाणार्‍या १२ दिवसांच्या शेळीपालन वर्गात सहभागी व्हावे. त्यातून शेळी पालनाविषयीच्या सर्व अंगोपांगांची माहिती त्रोटक स्वरुपात का होईना पण मिळू शकते.

शेळीपालनाचे प्रकार

परंपरागत पद्धतीत शेळ्यांना चरण्यास मोकळे सोडले जाते. त्यांच्यामागे एखादा गुराखी असतो आणि तो दिवसभर त्यांना लोकांच्या बांधांना, कुपाट्यांना आणि कुरणांमध्ये चारून संध्याकाळी घरी आणतो. मग दुसर्‍या दिवशी सकाळी चरायला सोडेपर्यंत त्यांना काही खाऊ घालण्याची गरज पडत नाही.

 

बंदिस्त शेळीपालन

काही विशिष्ट प्रकारचा गोठा तयार करून त्यात शेळ्या कायमच्या ठाणबंद ठेवल्या जातात. त्याला बंदिस्त किंवा बंदगोठा शेळीपालन असे म्हटले जाते.

अर्धबंदिस्त

ज्या शेतकर्‍यांना पूर्णपणे बंदिस्त शेळीपालन शक्य नाही आणि पूर्णपणे मोकाट शेळीपालनही शक्य नाही अशा शेतकर्‍यांना अर्धबंदिस्त शेळीपालन उपयुक्त ठरते. त्यामध्ये थोडा वेळ शेळ्या ठाणबंद केल्या जातात आणि थोडा वेळ चरायला सोडल्या जातात. या पद्धतीला अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणतात. मोकाट किंवा अर्धबंदिस्त शेळी पालनासाठी कुरणांची गरज असते. परंतु सध्या कुरणे कमी होत चालली आहेत. त्यामुळे पुढच्या काळात बंदगोठा शेळीपालन हा प्रकारच अधिक व्यवहार्य ठरणार आहे.

English Summary: Goat rearing increased in Ahmednagar district, number of goats crossed 4 lakh in 5 years Published on: 27 May 2021, 07:06 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters