1. बातम्या

शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून सरकार काम करणार

पुणे: साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून सरकार काम करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच मराठवाड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासन तातडीने निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

KJ Staff
KJ Staff


पुणे:
साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून सरकार काम करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच मराठवाड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासन तातडीने निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मांजरी, पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, सहकार तथा अर्थमंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, आमदार अजित पवार, राजेश टोपे, कलप्पा आवाडे, हर्षवर्धन पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, इंडियन शुगर इन्सिट्यूटचे अध्यक्ष रोहित पवार, बाळासाहेब पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या साखर उद्योगात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मोठे योगदान आहे. नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत व्हीएसआयच्या माध्यमातून पोहोचत असते. त्यामुळेच साखर उद्योगात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. आज साखर उद्योगासमोर अनेक अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी सरकारच्यावतीने एक तज्ज्ञांची समिती स्थापन करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

सर्वांचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. २ लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांबाबत सरकार विचार करत असून त्याची माहिती बँकांच्याकडून मागवून घेतली आहे. त्याबाबत सरकार सकारात्मक असून नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही योजना सरकार आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.  साखरेची उत्पादकता वाढविण्याबरोबरच साखरेच्या उपपदार्थ निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता असून यावर कारखान्यांनी विचार करावा. ऊसासारख्या शाश्वत उत्पन्न देणाऱ्या उद्योगाला जगविण्यासाठी सरकारबरोबर साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी शरद पवार म्हणाले, ऊसाच्या व ऊस कारखानदारीच्या संबंधातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही देशातील अग्रगण्य संस्था आहे. ऊस उतारा, उत्पादन वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येक कारखान्यांनी ऊस विकासासाठी विशेष लक्ष द्यावे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. साखर व्यवसाय हा महाराष्ट्रातील ग्रामीण व्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे. या व्यवसायामुळे राज्याला चांगले आर्थिक उत्पन्न होत आहे. ऊसाची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रत्येक कारखान्यांनी ऊस विकास कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता आहे.

सहकार मंत्री जयंत पाटील म्हणाले, साखर कारखानदारी अडचणीत आहे. गेल्या वर्षीचा दुष्काळ आणि यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. साखर कारखान्यातील को-जनरेशन प्रकल्प शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिकचा दर देण्याचा उपाय आहे. सहकारी साखर कारखानदारी शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमीकरण करण्याचा मुख्य कणा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तांत्रिक कार्यक्षमता अहवाल, आसवणी अहवाल, आर्थिक कार्यक्षमता अहवाल आणि साखर संघाची दिनदर्शिका यांचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने विविध पुरस्कारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यातील ऊस कारखान्यांचे पदाधिकारी, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

English Summary: The government will act as the backbone of the farmers Published on: 26 December 2019, 07:46 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters