
राज्यभरात परतीच्या पावासाने थैमान घातल्या शेतीचे मोठे नुकसान झाले. शेतीतील पिकांसह शेतातील मातीही वाहून गेली. यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी केली जात होती. आता राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अतिवृष्टीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.
राज्य सरकार ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीने वितरित करणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केले. दिवाळीपर्यंत ही मदत देण्यात येणार आहे. सणासुदीत बळीराजाच्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यासोबतच राज्याचे केंद्राकडे ३८ हजार कोटी थकीत असल्याचे सांगत केंद्राने अजूनही ही रक्कम दिली नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, या आपत्तीत १० हजार कोटी रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे. यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे. पैशाची ओढाताण आहे, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा शब्द आहे. जिरायत, बागायत जमिनीसाठी ६ हजार ८०० प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे.
त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी १० हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे. फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर ऐवजी २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल.