MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

आता गरज जलसाक्षरतेची : राजेंद्र सिंह

नवी मुंबई : आपल्या देशात जलसंधारणाची कामे झाली आहेत, परंतू आता जलसाक्षरतेची गरज आहे. त्यासाठी आंतरसंवादाची आवश्यकता आहे. संवादातून शाश्वत विकास होतो, असे प्रतिपादन जलबिरादरी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी केले.

KJ Staff
KJ Staff


नवी मुंबई
: आपल्या देशात जलसंधारणाची कामे झाली आहेत, परंतू आता जलसाक्षरतेची गरज आहे. त्यासाठी आंतरसंवादाची आवश्यकता आहे. संवादातून शाश्वत विकास होतो, असे प्रतिपादन जलबिरादरी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी केले.

जलसाक्षरता केंद्र यशदा व कोकण विभागाद्वारे कोकण विभागीय जलसाक्षरता कार्यशाळेचे आयोजन सिडको भवन, नवी मुंबई येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, कोकण विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी संचालक भारतीय औद्योगिक महासंघ त्रिवेणी पाणी संस्थेचे डॉ.कपिल नरुला, मुंबई विद्यापीठाच्या सिंधू स्वाध्याय संस्थेचे समन्वयक विनायक दळवी, जलसाक्षरता केंद्र यशदाचे संचालक आनंद पुसावळे, यशदाच्या उपमहासंचालक प्रेरणा देशभ्रतार,जलनायक डॉ.श्रीनिवास वडगबाळकर आदि उपस्थित होते.

श्री.सिंह म्हणाले, सध्याच्या काळात पाणी आर्थिक विकासाचे महत्वाचे साधन झाले आहे. आज पाण्याच्या टंचाईमुळे काही देशात लोकांचे स्थलांतरण सुरु झाले आहे. जलसाक्षरतेचे महत्व गावपातळीपर्यंत पोहोचविल्यास पाण्याचे योग्य नियोजन करणे शक्य आहे. लोकसहभाग व प्रशासन यांच्या सहभागाने जलसाक्षरता हा शासनाचा उपक्रम आहे. यामध्ये मुंबई विद्यापीठानेही सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणाची भौगोलिकता वेगळी आहे. त्यामुळे गावनिहाय नियोजन करणे आवश्यक आहे. स्थानिक लोकांच्या ज्ञानाचा उपयोग या कामासाठी करणे गरजेचे आहे. कारण त्या लोकांना गावातील समस्या माहिती असतात. सध्याच्या काळात हवामानावर आधारित पीक नियोजन करणे आवश्यक आहे. यामध्ये स्वयंसेवी संस्थांनीही काम करताना प्रशासनाशी संवाद साधला पाहिजे.

श्री. डवले म्हणाले की, जलसाक्षरता म्हणजे पाण्याचे निसर्गचक्र समजून घेणे आणि समतोल बिघडू न देता नियोजन करणे होय. जलयुक्त शिवार या अभियानात पाण्याचा ताळेबंद तयार करून नियोजन केल्यास मुलभूत गरजांसाठी पाणी वर्षभर उपलब्ध होईल. पाण्यासंबंधी काम करणाऱ्या शासकीय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि पाण्याचा वापर नियोजनपूर्व व काटकसरीने करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. सध्या जलसाक्षरता आवश्यक असून ग्रामीण भागातील पाणी गावातच थांबणे आवश्यक आहे. राजेंद्र सिंह यांच्या प्रेरणेमुळे हे काम होत आहे.

डॉ. पाटील म्हणाले की, जलसाक्षरता जलजागृतीचा उपक्रम लोकसहभागातून व स्वयस्फूर्तीने पुढे येणाऱ्या स्वंयसेवकाद्वारे राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. राज्यात जलसाक्षरतेबाबत यंत्रणा उभी केली त्यात राजेंद्र सिंह यांचे मोठे योगदान आहे. लोकसहभाग वाढवायचा असेल तर स्थानिक लोकांचा अनुभव व तंत्रज्ञानाची जोड देऊन काम करावे लागेल. राज्यात भौगोलिक असमतोल असल्यामुळे प्रत्येक ठिकाणाच्या अडचणी वेगवेगळया आहेत. त्यामुळे प्रत्येक गावाचे तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार नियोजन करावे. यामध्ये स्वंयसेवी संस्था, जलसेवक, जलनायक,जलकर्मी यांचाही सहभाग महत्वाचा आहे.

यावेळी जलसाक्षरता आणि जलक्षेत्रातील अनुभव याबाबत सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये छोट्या ओहोळावरील साखळी बंधारे-सरवले दहिवडी सावर्डे शेखर निकम, कोकणातील माथ्यावरील कामे तालुका महाड अनुभव कथन जलनायक किशोर धारिया, लोकसहभागातून गोड्या पाण्याच्या तलावाची दुरुस्ती श्रीकृष्ण तलाव बोईसर दिलीप सावे आणि अनंत कित्तूरकोकणातील जलनियोजन गाव घटक मानून कसा करावे जलनायक डॉ.अजित गोखले, कोकणातील युवकांचे पाण्यासाठी योगदान कसे घेता येईल जलनायक संजय यादवराव, कांदळवने/खारभूमी सद्यस्थिती अधीक्षक अभियंता कोकण खोरे विकास महामंडळ अे.अे.आव्हाड, अतिपावसाच्या प्रदेशातील जलसंधारण विशेष संदर्भ सिमेंट नाला बांध आणि इतर रचना जिल्हाधिकारी पालघर प्रशांत नारनवरे, भारतीय औद्योगिक महासंघ यांचे माध्यमातून जलक्षेत्रात केलेली कामे विशेष संदर्भ कोकण मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी संचालक भारतीय औद्योगिक महासंघ त्रिवेणी पाणी संस्थाचे डॉ.कपिल नरुला, जलसाक्षरतेत मुंबई विद्यापीठाचा सहभाग मुंबई विद्यापीठाच्या सिंधू स्वाध्याय संस्थेचे समन्वयक विनायक दळवी यांनी केले. यावेळी ठाणे व पालघर जिल्ह्याच्या कॉफीटेबल बुकचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यशाळेस कोकण विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,मुख्य अभियंता जलसंपदा, विभागीय कृषि सहसंचालक, उपजिल्हाधिकारी,अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता जलनसंपदा विभाग, तहसीलदार, गट विकास अधिकारी, अधीक्षक कृषि अधिकारी, जलसंधारण क्षेत्रात कार्य करणारे स्वयंसेवक आदी उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक श्रीमती देशभ्रतार यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीमती धानके यांनी केले.

English Summary: now the need of water literacy : rajendra singh Published on: 03 September 2018, 09:31 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters