![](https://kjmarathi.b-cdn.net/media/6228/lockdown-640-1.jpg)
देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत करोना रुग्ण संख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. देशात पहिल्यांदाच करोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजारांच्या पुढे गेली. त्यामुळे एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या पाच लाख ८ हजार ९५३ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात १८ हजार ५५२ करोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे. यात नवी मुंबईही पुढे आहे. येथे कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
येथील भागांमध्ये दररोज २०० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत. यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईत आता पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. २९ जूनपासून येथे लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे पालकमंत्र्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. कारण येथे जवळपास ४४ कंटेन्मेंट झोन आहे. या भागांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. ७ दिवसांसाठी हा लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान २६ जून रोजी नवी मुंबईमध्ये २२४ नवीन रुग्ण आढळले आहेत. ही संख्या खूप जास्त आहे. आता येथील कोरोना बाधितांचा आकडा हा ५ हजार ८५३ वर जाऊन पोहोचला आहे. तर आतापर्यंत येथील १९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे चिंता ही वाढली आहे.
Share your comments