![custerd apple crop](https://kjmarathi.b-cdn.net/media/20302/c.jpg)
custerd apple crop
पीक असो वा कुठल्याही फळबाग यांच्यामध्ये वाढीच्या कालावधीमध्ये प्रत्येक टप्प्यात परफेक्ट नियोजन मग ते खतांचे असो की पाण्याचे ते जर व्यवस्थित आणि आधुनिक पद्धतीने ठेवले तर भरघोस उत्पादन मिळन्यापासून आपल्याला कोणीच थांबवू शकणार नाही हेही तेवढेच सत्य आहे. जर आपण सीताफळ बाग याचा विचार केला तर कोरडवाहू जमिनीत देखील सिताफळ पीक चांगले येते असे म्हटले जाते.
परंतु यामध्ये तुम्ही केलेल्या परफेक्ट नियोजन आणि व्यवस्थापन तसेच अगदी उशिरा न करता अचूक वेळेला केलेले नियोजन खूप उपयोगी पडते. या लेखात आपण सिताफळ बागेविषयी अशा दोन गोष्टी जाणून घेऊ की त्या जर शेतकऱ्यांनी अचूकपणे केल्या तर मिळणारे उत्पादन नक्कीच बंपर स्वरूपात मिळेल.
नक्की वाचा:'अर्का किरण' आणेल शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण,वाचा या पेरूच्या जाती विषयी माहिती
सिताफळ बागेसाठी करावयाच्या महत्त्वाच्या उपाययोजना
1- सिताफळ बागेचे करा परफेक्ट ओलीत व्यवस्थापन- सिताफळ बागेला नियमित पाण्याची गरज नसते. अगदी तुम्ही पावसाळ्यात पडणार्या पाण्यावर देखील सिताफळाचे चांगले उत्पादन मिळवू शकतात परंतु संरक्षित पाण्याच्या पाळ्या या सीताफळाच्या झाडाची वाढ आणि उत्पादनासाठी व फळधारणा इत्यादी गोष्टीसाठी खूप उपयुक्त आहेत.
सीताफळाच्या झाडाला पहिली तीन-चार वर्ष जर पाण्याचे व्यवस्थित नियोजन विशेषतः उन्हाळ्यात चांगले केले तर झाडांची वाढ चांगली होण्यास मदत होते व फळधारणा देखील चांगली होते. त्यासोबतच फळधारणा झाल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात एक ते दोन पाणी दिल्यास येणाऱ्या फळाची प्रत व त्याचा आकार खूप उत्तम असतो.
जर तुम्ही पावसाळ्यामध्ये बाग नांगरून घेतला तर जास्तीचे पाणी उपलब्ध होते.उत्पादन निघाण्यावर आलेल्या बागांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे विश्रांतीच्या काळात झाडांना 35 ते 55 दिवस पाणी देऊ नये. जेव्हा झाडाची 35 ते 50 टक्के पानगळ सर्वसाधारणपणे होते तेव्हा समजावे की झाडाला विश्रांती मिळाली.
2- झाडाची वळण व छाटणी आहे महत्वाचे- सीताफळाच्या झाडाला योग्य वळण यावे यासाठी वाढीच्या सुरवातीच्या काळामध्ये हलक्या छाटणीची गरज असते. जर तुम्ही झाडाला योग्य वळण दिले व झाड एका बुंध्यावर वाढवले तर झाडाची वाढ डौलदारपणे होते.
नाहीतर अनेक फांद्या असलेले एक झुडुपवजा झाड तयार होते. त्यामुळे झाडाची वाढ कमी होते व साहजिकच मिळणारे उत्पादन देखील कमी मिळते.
त्यासाठी एक मीटर खोडावरील सर्व फुटवे काढून त्याच्या चारही बाजूने फांद्या विखुरलेल्या राहतील, अशा मोजक्याच फांद्या ठेवाव्यात. जुन्या, वाळलेल्या, अनावश्यक आणि गर्दी करणाऱ्या फांद्या काढून टाकून सीताफळ बागेत भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी.
सिताफळ लागवड केल्यानंतर जेव्हा झाड चार ते पाच महिन्याचे होते त्यावेळी दोन फुटाचे झाल्यावर त्याला सहा इंच ठेवून वरील शेंडा कापून टाकावा व नंतर खोडातून येणाऱ्या फांद्यांमधून फक्त दोन किंवा तीन फांद्या ठेवाव्यात बाकीच्या फांद्या काढून घ्याव्यात.
नंतर या फांद्यांना पुन्हा चार ते पाच महिने वाढू द्यावे. नंतर इंग्रजी व्ही आकाराच्या दोन फांद्या प्रत्येक मुख्य फांदिला ठेवून इतर फांद्या छाटून टाकाव्यात. म्हणजेच जुलैमध्ये लागवड केली असेल तर पहिली छाटणी आक्टोबर नोव्हेंबर आणि दुसरी छाटणी मे जून महिन्यामध्ये करता येते.
अशाप्रकारे छाटणीचे नियोजन केले तर दोनच वर्षात 16 ते 24 फांद्यांचे एक उत्कृष्ट डौलदार झाड तयार होते. नवीन व जुन्या अशा दोन्ही वाढीवर फळधारणा होते व फळधारणा अवस्थेतील जे झाड आहे त्याची मे महिन्यामध्ये हलकी छाटणी केली तर जास्त फळे फांदीवर लागतात. छाटणी करताना एक महत्त्वाची काळजी घ्यावी ती म्हणजे छाटणी ही खोल किंवा भारी करू नये. छाटणी झाल्यानंतर लगेच एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करून घ्यावी.
नक्की वाचा:फायदेशीर लागवड: कोरडवाहू शेतीत चिंच लागवड ठरेल एक राजमार्ग, शेतकऱ्यांना होईल फायदा
Share your comments