1. कृषीपीडिया

सोयाबीन पीक लागवड माहिती तंत्रज्ञान

जगात गळीत धान्यामध्ये सोयाबीन लागवड सर्वात जास्त असुन हे भारतातील एक प्रमुख पीक आहे. सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण २०% व प्रथिनांचे प्रमाण ४०% आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
सोयाबीन पीक लागवड माहिती तंत्रज्ञान

सोयाबीन पीक लागवड माहिती तंत्रज्ञान

जगात गळीत धान्यामध्ये सोयाबीन लागवड सर्वात जास्त असुन हे भारतातील एक प्रमुख पीक आहे. सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण २०% व प्रथिनांचे प्रमाण ४०% आहे.

  • सोयाबीनची उत्पादकता कमी असण्याची कारणे
  • आधुनिक लगवड़ तंत्रज्ञानाचा अवलंब न करणे
  • सुधारीत जातींचा वापर न करणे
  • दर हेक्टरी झाडांची संख्या न राखणे
  • बीजाक्रिया न करणे, उगवणशक्तीची तपसणीं न करणे
  • योग्य खत मात्रांचा शिफारशीनुसार वापर न करणे
  • तण तसेच कीड,रोगांचा बंदोबस्त वेळेवर न करणे
  • आंतरपीक पद्धतींचा वापर न करणे

हवामान

सोयाबीन पीक उष्णता व पाण्याच्या ताणास संवेदनशील, असे पीक आहे. हे पीक २० ते ३५ सेल्सीयस उष्णतामान ७०० ते १२०० मि.मी. पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात उत्तम येते सूर्यप्रकाशाच्या कालावधीचा देखील पिकावर परीणाम होतो. भरपूर फुलो-यासाठी निदान १० तासांपेक्षा जास्त काळोख्या रात्री असाव्या लागतात. म्हणून खरीप हंगामात हे पीक चांगले येते. साधारणत: हवामानाच्या वर्गीकरणानुसार कमी पावसाचा, निश्चित पावसाचा, मध्यम ते भारी पावसाचा प्रदेश असे प्रकार पडतात. हे हवामानाच्या वर्गीकरणानुसार मध्यम ते उशिरा कालावधीचा वाण टी.ए.एम.एस. ९८-२१ हा जास्त पावसाच्या प्रदेशांत तसेच संरक्षित ओलिताच्या सोय, ओलिताच्या सोय नसल्यास वरील वाणांचे अपेक्षित उत्पादन येत नाही.

सोयाबीन पिकाकरीता लागणारी जमीन

  • मध्यम स्वरुपाची
  • भुसभुशीत व पाण्याच्या निचरा होणारी
  • उत्तम सेंद्रीय पदार्थ असलेली
  • चोपण, क्षारपड जमिन वापरू नये
  • पुर्वी सुर्यफुल घेतलेले शेत वापरू नये
  • जमिन मे महिन्यात नांगरट केलेली उन्हाळ्यात तापू दिलेली स्वच्छ असावी.
  • जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ पर्यत असलेली निवडावी.
  • हलक्या मुरमाड जमिनी या पिकास योग्य नसतात_

पूर्व मशागत

हिवाळी पीक काढल्यावर लगेच उन्हाळी नांगरट करावी २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमिन भुसभुशीत करावी. हेक्टरी २५ ते ३० गाड्या कुजलेले शेणखत शेवटच्या कुळवाच्या अगोदर मातीत मिसळून घ्यावे जमिन पेरणीसाठी तयार करून घ्यावी.

सुधारित जाती

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली दरवर्षी आखिल भारतीय स्तरावर, राष्ट्रीय सोयाबीन अनुसंधान केंद्र, इंदौर अंतर्गत नवनवीन जातींच्या संशोधनाचा आढावा घेत असते. त्यापैकी महाराष्ट्रासाठी ज्या काही महत्वाच्या सुधारीत जाती लागवडीकरीता प्रसारीत करण्यात आलेल्या आहेत त्या जाती त्यांची गुणवैशिष्ट्ये पूढे दिली आहेत.

MAUS-716 : दर्जेदार बियाणे, इतर जातीच्या तुलनेत अधिक एकरी उत्पादन तसेच अवर्षण व जास्त पावसात सुद्धा चांगले येते.
MAUS-158 : एकरी अधिक उत्पादन देणारे सोयाबीन वाण, काढणी वेळेस शेंगा फुटण्याचे प्रमाण सगळ्यात कमी.
MAUS-162 : सरळ, उंच वाढणारे तसेच अधिक एकरी उत्पादन देणारे वाण काढणी यंत्राने काढण्यासाठी सगळ्यात चांगले वाण.
फुले अग्रणी : राहुरी विद्यापीठाचे सर्वोत्कृष्ट उत्पादन देणारे सोयाबीन वाण,शेंगा गळत नाहीत.
फुले संगम 726 : राहुरी कृषि विद्यापीठाचे आणखीन एक सर्वोधिक एकरी उत्पादन तसेच काढणीच्या वेळेस शेंगा न फुटणारे, रोगास प्रतिबंधक
MDS रुची 2001 : 60-70 दिवसात काढणी येणारे सर्वोत्कृष्ट लवकर येणारे सोयाबीन वाण.
JS-9705 : महाराष्ट्रासाठी शिफारस 70-75 दिवसात येणारे तुलनेत अधिक एकरी उत्पादन तसेच अवर्षण व जास्त पावसातसुद्धा चांगले येते_
JS-9305 : महाराष्ट्रासाठी शिफारस,अधिक उत्पादनासाठी रोग, किडीस कमी बळी पडणारे सोयाबीन वाण
जात, परिपक्वतेचा कालावधी (दिवसात), प्रति हेक्टरी उत्पादन क्विंटल
पी.के. -४७२ : ९५ ते १०५ दिवस = २२ ते २८ क्विंटल
जे.एस.-३३५ : ९५ ते १०० दिवस = २५ ते ३५ क्विंटल
मोनेटा : ७५ ते ८० दिवस = २० ते २२ क्विंटल
एम.ए.सी.एस.-१३ : ०० ते ०० दिवस = २५ ते ३५ क्विंटल
एम.ए.सी.एस.-५७ : ७५ ते ९० दिवस = २० ते ३० क्विंटल
एम.ए.सी.एस.-५८ : ९५ दिवस = २५ ते ३५ क्विंटल
एम.ए.सी.एस.-१२४ : ९० ते १०० दिवस = ३० ते ३५ क्विंटल
एम.ए.सी.एस.-४५० : साधारणपणे ९० दिवस = २५ ते ३५ क्विंटल
टी.ए.एम.एस. -३८ : ९० ते ९५ दिवस = २३ ते २८ क्विंटल
टी.ए.एम.एस.-९८ -२१ :१०० ते १०५ दिवस = २४ ते २८ क्विंटल
या व्यतिरिक्त

Js 335 ही व्हरायटी चांगली आहे, पण त्यानंतर खूप नवीन जाती आल्या आहेत जसे की Ds228, Js 9305, MACS1188, MACS 1281, फूले संगम, जुन्या जातीत काही दोष असतील ते नवीन जातीत काढून टाकलेले असतात जसे Js 335 या जातीच्या शेंगा जास्त प्रमाणात उकलतात, ही जात बुटकी आहे जास्त वाढत नाही. MACS 1188, फूले संगम या जाती उंच वाढणारी, जास्त उत्पादन देणारे, अगदी कमी प्रमाणात उकलणारी असे गुणधर्म आहेत या जातीत. उंच वाढणारी असल्याने पाला भरपूर असतो त्यामुळे तो पाला जमीनीवर पडून जमीनीचा सेंद्रियकर्ब वाढायला पण मदत होते, त्यामुळे शेतकरी बांधवांनी या नवीन जाती कराव्यात या जातींची संपूर्ण महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस आहे.

 

बियाणे

सोयाबीनचे सरळ पेरणीसाठी 30 ते 35 किलो प्रति एकरी तर टोकण पेरणीसाठी 20 ते 25 किलो प्रति एकरी बियाणे लागते.

लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया

उगवणीच्या काळात बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशके किंवा बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया आवश्यक आहे. लागवड करताना प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा थायरम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी, त्यानंतर प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धके आणि २५ ग्रॅम पी.एस.बी. जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. सावलीत हलके वाळवून लगेचच पेरणी करावी.

पेरणीची वेळ

सोयाबीनची लागवड ७ जुन ते १५ जुलै पर्यंतच करावी. लागवड करताना पावसाचा अंदाज घेवून लागवड करावी. पेरणीनंतर जास्त काळ राहणारा कोरडा काळ सोयाबीन पीकासाठी हानीकारक ठरतो. अशा कोरड्या काळामध्ये रोपांची मर होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मान्सून व्यवस्थित स्थिर झाल्यानंतरच पेरणी करावी._

लागवड

सोयाबीनची लागवड जुन ते जुलै महिन्यात केली जाते. लागवड करतांना पावसाचा अंदाज घेवून लागवड करावी. पेरणीतील अंतर हे दोन ओळीत ३० ते ४५ से.मी. तर दोन रोपातील अंतर ५ ते १० सेमी असावे.

सोयाबीनची सुधारित पट्टापेर पेरणी पद्धत

खरीप हंगामातील सोयाबीन हे मुख्य पीक आहे. त्यामध्ये पट्टापेर पद्धतीचा अवलंब केल्यास सरासरी उत्पादनात २५% वाढ होते.

पट्टापेर पद्धत म्हणजे काय?

सोयाबीन, मूग, उडीद पिकाची प्रचलित पद्धतीने पेरणी करताना त्यामध्ये किंचित बदल अथवा सुधारणा करून, पेरणी करताना ठराविक ओळीनंतर एक ओळ खाली सोडली जाते. त्याठिकाणी डवऱ्याच्या फेराच्या वेळी जानोळ्याला दोरी गुंडाळून सऱ्या पाडून घेतात, त्यामुळे मूलस्थानी जलसंवर्धन होऊन उत्पादकतेत वाढ होण्यास मदत होते.

पट्टापेर पद्धतीचे फायदे

पिकाची सूर्यप्रकाश, जागा, अन्नद्रव्ये, जमिनीतील ओल या बाबींसाठी होणारी स्पर्धा कमी होते.
पिकाची निगराणी, निरीक्षण योग्य प्रकारे करता येते. किडी, रोगांचा प्रादुर्भाव लवकर लक्षात येतो.
चांगल्या रीतीने फवारणी होऊ शकते.
मधील सऱ्यामधून अतिरिक्त पावसाचे पाणी सरीमध्ये उतरते. मूलस्थानी जलसंवर्धन शक्य होते. कमी पावसाच्या स्थितीमध्ये ओल टिकून राहते. सरीमध्ये जमा झालेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्यासाठी वाव राहतो.
मोकळ्या ओळीमुळे शेतात हवा खेळती राहते. पर्यायाने बुरशीजन्य रोगांपासून पिकाचा बचाव होतो.
मूलस्थानी पावसाच्या पाण्याचे संवर्धन
सूर्यप्रकाशाचा पुरेपूर उपयोग
शेतात हवा खेळती राहते.
ओलिताची सोय असल्यास पाणी देणे सोयीचे.
तुषार सिंचनाचा होतो फायदा.
कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो
कीडनाशक फवारणी करणे अत्यंत सोयीचे
पिकाची निगराणी वा निरीक्षण सुलभ करता येते
प्रत्येक पट्ट्याचे व्यवस्थापन सोयीचे होते
बियाणे वापरात व खर्चात बचत होते.
पिकाची एकसमान वाढ होते

ट्रॅक्टरद्वारे पट्टापेर पद्धत

सात दात्याचे पेरणी यंत्र : ट्रॅक्टरचलित ७ दात्याच्या यंत्राने पेरणी करताना पट्टापेर पद्धतीचा ३ प्रकारे अवलंबता येतो.
सात ओळींचा पट्टा एक ओळ खाली
पाच ओळींचा पट्टा : पेरणीयंत्राच्या दोन्ही बाजूंकडील काठावरील प्रत्येकी एक छिद्र बंद केल्यास ५ ओळींचा पट्टा तयार होईल. प्रत्येकी सहावी ओळ खाली राहील.
तीन ओळींचा पट्ट : पेरणी यंत्राचे मधीच म्हणजेच चौथे छिद्र बंद करावे. म्हणजे पेरणी ३ ओळी खाली ओळ तीन ओळी अशी होईल. ट्रॅक्टर प्रत्येक वेळी पलटून येताना जाताना एक ओळ खाली सुटेल याप्रमाणे जागा सोडावी. सहा ओळींचा पट्टा : ट्रॅक्टरचलित ६ दात्याचे पेरणीयंत्र असल्यास, पेरणी करताना ट्रॅक्टर प्रत्येक वेळी पलटून येताना जाताना एक ओळ सुटेल असे नियोजन करावे. म्हणजेच शेतात प्रत्येक सातवी ओळ खाली राहील.
चार ओळींचा पट्टा : पेरणी यंत्राच्या काठावरील दोन्ही बाजूचे एक छिद्र बंद करावे. ट्रॅक्टर प्रत्येकवेळी पलटून येताना जाताना शेवटचे दाते खाली ठेवलेल्या काकरातच ठेवावे.
बैलजोडीचलित तिफण, पाभर, काकरी, सरत्याने पेरणी : बैलजोडीने पेरणी करताना ३ दाती, चारदाती अथवा ५ दाती काकरी वापरली जाते. पट्टापेर पद्धतीचे नियोजन करण्यासाठी ३ दाती काकरी असेल तर चौथी ओळ, ४ दाती काकरी असेल तर पाचवी ओळ व पाच दाती काकरी असेल तर सहावी ओळ प्रत्येकवेळी पलटून येताना जाताना खाली ठेवावी. म्हणजेच शेतात तीन ओळी, चार ओळी अथवा पाच ओळींमध्ये पट्टापेर पद्धतीचे नियोजन होईल.

ट्रॅक्टरचलित अथवा बैलजोडीने अशाप्रकारे पट्टापेर पद्धतीचा अवलंब करताना खाली ठेवलेल्या प्रत्येक ओळीच्या ठिकाणी डवऱ्याच्या फेराच्यावेळी, जानोळ्याला गच्च दारी गुंडाळून दांड, सरी अथवा गाळ पाडून घ्यावा. वरीलप्रमाणे पट्टापेर पद्धतीने पेरलेले सोयाबीनची पीक गादीवाफ्यावर येऊन, प्रत्येक खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी डवऱ्याच्या फेराच्या वेळी सऱ्या तयार होतात.
महत्त्वाचे
शिफारशीनुसार सलग सोयाबीनसाठी एकरी 30 किलो बियाणे आवश्यक असले तरी आता ओळींची संख्या कमी होणार आहे. प्रत्येकी चौथी ओळ खाली ठेवल्यास पेरणीसाठी 25% बीयाणे कमी होईल. प्रत्येकी पाचवी ओळ खाली ठेवल्यास 20℅ प्रत्येक सहाव्या ओळीसाठी 15% यानुसार बियाण्याचे प्रमाण कमी होईल._
सोयाबीन प्रमाणेच मूग, उडीद, हरभरा या पिकांसाठीसुद्धा पेरणी पद्धतीचा अवलंब करता येतो.
आधीच्या हंगामात खोड माशीचा प्रादुर्भाव झालेला असल्यास, खत व्यवस्थापनाच्या वेळी फोरेटचा वापर करावा.
आंतरमशागत सुरवातीच्या 35-40 दिवसांत पूर्ण करावी.
पावसात खंड पडल्यास ओलिताची सोय असल्यास फुलोऱ्यापूर्वी तसेच शेंगामध्ये दाणे भरताना संरक्षित ओलित करावी.

तणनियंत्रण

सोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके, ही तणनाशके वापरतांना कंपनी प्रतिनिधि, कृषी तज्ञ, किंवा दुकानदार यांचा सल्ला घेवून, रोपांवर फवारणी होणार नाही याची काळजी घेवून वापरावे.
तणनाशक केव्हा वापरावे. तणांच्या बंदोबस्तासाठी उगवणीपूर्व तणनाशक पेंडीमिथॅलीन ३० ई.सी. पेरणीच्यावेळी प्रति एकरी १ ते १.३ लिटर २५० ते ३०० लिटर पाण्यामध्ये मिसळून जमिनीवर फवारावे. पीक उगवणीनंतर १५-२० दिवसांनी एक कोळपणी एक खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे. अथवा पीक उगवणीनंतर १५-२० दिवसांनी इमिझाथ्यापर ४०० मिली. २०० - २५० लिटर पाण्यामध्ये मिसळून तणावर फवारावे.
उगवणीपूर्व तणनाश खालील पैकी कोणतेही एक वापरावे.
प्रती एकरी १ पॅकेट
●Velor 32
●Max
●Mar
Strongarm
उगवणीनंतर तणनाशक पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी खालील पैकी कोणतेही एक वापरावे.
क्लोरीम्युरॉन इथाईल 15 ग्रॅम/ एकर
इमॅझीथॅपायार 400 ml/ एकर_
क्विझॉलफॉप इथाईल 400 ml/ एकर_
इमॅझीथॅपायार (35%) अधिक इमॅझमॅक्स (35%) 40 ग्रॅम/एकर 200 लीटर पाणी प्रति हेक्टर वापरावे._
व्यापारी नाव
Fusiflex
Shaked
Odissi
Iris
तणनाशक फवारणी जमिनीवर ओलावा असताना फ्लॅट किंवा फ्लाड जेट नोझलने करावी
तण उगवणीनंतर वापरण्याचे तणनाशक

१) टरगा :* बहुवार्षिक तणांच्या नियंत्रणासाठी दोन वेळेस वापरावे लागु शकते.
२) परस्युट (इमिझाथायपर) :* तण उगवणीनंतर वापरता येते. तणाच्या वाढीचा काळ सक्रिय हवा.

खत व्यवस्थापन : (प्रमाण किलो प्रती एकर)

चांगले कुजलेले शेणखत एकरी १० ते १२ गाड्या वापरावे, प्रति एकरी २०:३०:१८ कि.ग्रॅ. नत्र, स्फुरद, पालाशची मात्रा पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्यावेळी दुचाडी पाभरीने द्यावी. त्याचप्रमाणे एकरी ८ किलो गंधक, १० किलो झिंक सल्फेट, ४ किलो बोरॅक्सची मात्रा पेरणीपूर्वी द्यावी.


पिकाच्या वाढीची अवस्था, फवारणीच्या खतांचा प्रकार, प्रमाण प्रती लिटर पाणी
लागवडीनंतर १०-१५ दिवसांत : 19-19-19 = 2.5 - 3 ग्रॅम + सुक्ष्म अन्नद्रव्ये = 2.5 - 3 ग्रॅम
वरिल फवारणीनंतर १५ दिवसांनी : २० टक्के बोरॉन = 1 ग्रॅम + सुक्ष्म अन्नद्रव्ये = 2.5 - 3 ग्रॅम
फुलोरा अवस्थेत : 00-52-34 = 4-5 ग्रॅम + मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २) = 2.5 - 3 ग्रॅम
शेंगा पोसत असतांना : 00-52-34 = 4 - 5 ग्रॅम + बोरॉन = 1 ग्रॅम
वरील फवारणीनंतर ७ दिवसांनी : 00-52-34 = 4 - 5 ग्रॅम

 

महाराष्ट्रात सोयाबीन पिकावर आढळणा-या प्रमुख किडी

खोडमाशी : ही सोयाबीन पिकावरील महत्वाची कीड असून जवळजवळ सर्व भारतात या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. खोडमाशीची मादी सोयाबीनच्या पानावरील शीरेजवळ अंडी घालते. अंड्यातून अळी बाहेर येऊन शीरेतून देठात व देठातून खोडात पोखरत जाते. पिकांच्या सुरवातीच्या काळात या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास रोप मरते. उशिरा प्रादुर्भाव झाल्यास झाडाच्या वाढीवर परिणाम होऊन फुले व शेंगाचे प्रमाण कमी होते.

तंबाखुवरील पाने खाणारी अळी : अनुकुल हवामान मिळाल्यास या किडीचा फार मोठ्या प्रमाणावर उद्रेक होऊ शकतो. किडीचा मादी पतंग पानाच्या मागील बाजूस पुंजक्याने अंडी घालतो. अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या सुरुवातीला समुहाने एकाच झाडाची पाने कुरतडतात. नंतर त्या सर्व शेतात पसरतात. कोवळ्या शेंगा असताना प्रादुर्भाव झाल्यास अळ्या शेंगा कुरतडून आतील दाणे खातात. अशावेळी पिकाचे उत्पादन 70 टक्क्यांपेक्षा जास्त घटते.

बिहार सुरवंट : ही किड भारतात सर्वत्र आढळते. सुरवातीस अळ्या एकाच झाडावर पुंजक्याने राहतात पानांचे हरीतद्रव्य खाऊन टाकतात. त्यामुळे पाने जाळीदार होतात. त्यानंतर अळ्या सर्व शेतात पसरतात पुर्ण पाने खातात. किडीच्या अळ्या केसाळ असून प्रथम त्यांचा रंग पिवळा असतो नंतर तो राखाडी होतो.

पाने पोखरणारी अळी : कमी पाऊस कोरडे हवामान असल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. किडीच्या अळ्या पानांच्या वरील बाजूस नागमोडी आकारात पाने पोखरत जातात वाढ पुर्ण झाल्यावर तेथेच कोषावस्थेत जातात. एका पानांवर एकापेक्षा जास्त अळ्यांचा हल्ला झाल्यास पान वाकडे तिकडे द्रोणाकार होते नंतर सुकून गळून पडते.

पाने गुंडाळणारी अळी :सतत पाऊस ढगाळ हवामान राहिल्यास या किडीचा उपद्रव वाढतो. किडीची अळी चकचकीत हिरव्या रंगाची असते हात लावताच लांब उडून पडते. एक किंवा अधिक पाने एकमेकांना जोडून कडा पिवळ्या पडतात व पाने आकसली जातात.

मावा : ढगाळ व पावसाळी हवामानात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. कीड पानांच्या मागील बाजूस व खोडावर राहून रस शोषते. या किडीच्या अंगातून साखरेसारखा चिकट द्रव स्त्रवतो. त्यामुळे झाडावर काळी बुरशी वाढते. सोयाबीनवरील मावा किडीचा रंग पिवळा किंवा हिरवा असतो.

शेंगा पोखरणारी अळी : ही प्रामुख्याने कपाशी, तूर, हरबरा या पिकांवरील कीड असून गेल्या काही वर्षात सोयाबीन पिकांवर जास्त प्रमाणात दिसून येऊ लागली आहे कीडीच्या अळ्या सुरुवातीच्या काळात पाने खातात. शेंगा भरण्याच्या काळात शेंगा पोखरून आतील दाणे कुरतडतात.
हिरवे तुडतुडे : या किडीची पिल्ले, पुर्ण वाढ झालेले कीटक पानाच्या मागील बाजूस राहून रस शोषतात. त्यामुळे पानांच्या कडा पिवळ्या पडतात पाने आकसली जातात.

शेंगा पोखरणारी सूक्ष्म अळी : सांगली, कोल्हापूर या भागात तसेच कर्नाटक राज्यात या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. पिकाच्या दाणे भरण्याच्या काळात किडीची मादी शेंगावर अंडी घालते. किडीच्या अळ्या शेंगा पोखरून आतील दाणे खातात. शेंगावरून निरोगी दिसतात परंतु अळ्या आतील दाणे खाऊन टाकतात. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव ओळखणे अवघड जाते.


हिरवा ढेकूण : ही कीड पानाच्या मागील बाजूस राहून पानातील रस शोषते. सोयाबीन पिकांच्या विषाणूजन्य रोगांच्या प्रसारास ही कीड मदत करते. हुमणी : ही अनेक पिकांवर पडणारी कीड असून किडीच्या अळ्या जमिनीत राहून रोपांची मुळे खातात. त्यामुळे पिकाच्या सुरवातीच्या काळात रोपे सुकतात मरतात. अळीचे कोष सुप्तावस्थेत जमिनीत राहतात. पावसाळ्याच्या सुरवातीस अनुकूल हवामान झाल्यावर भुंगेरे कोषातून बाहेर पडतात. हे भुंगेरे कडुनिंब, बाभळीची पाने खाऊन शेणखतात अंडी घालतात. शेणखताद्वारे सर्व शेतात पसरते. याखेरीज महाराष्ट्रात सोयाबीन पिकावर लाल मखमली अळी, उंट अळी, पांढरा भुंगेरा, करदोटा भुंगेरा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसून येतो.

पांढरी माशी :ही कीड पानांच्या मागील बाजूस राहून पानांतील रस शोषते. सोयाबीन पिकाच्या विषाणूजन्य रोगांच्या प्रसारास ही कीड मदत करते.
कीडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकांचा वापर
खोडमाशीच्या नियंत्रणासाठी 10 टक्के दाणेदार फोरेट प्रती हेक्टरी 10 किलो या प्रमाणात पेरणीपुर्वी जमिनीत मिसळावे. थोयोमेथोक्झाम या किटकनाशकाची 3 ग्रँम प्रती किलो या प्रमाणात बीजप्रक्रीया देखील परिणामकारक आढळून आली आहे. पाने खाणा-या, पाने पोखरणा-या गुंडाळणा-या अळ्यांच्या नियंत्रणासाठी हेक्टरी क्विनॉलफॉस 25 इ.सी. 1.5 लीटर किंवा क्लोरोपायरीफॉस 20 इ.सी. 1.5 लिटर किंवा इथोफेनप्राँक्स 10 इ.सी. 1 लिटर किंवा ट्रायझोफॉस 40 इ.सी. 800 मि.ली किंवा इथिऑन 50 इ.सी. 1.5 लीटर किंवा मेथोमिल 40 एस.पी. 1 किलो या किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. वरील कीटकनाशकांचा भुकटीच्या देखील हेक्टरी 20-25 कीलो या प्रमाणात धुरळणीसाठी वापर करावा. रस शोषणा-या किडींच्या नियंत्रणासाठी मिथिल डिमेटाँन (0.03 टक्के) किंवा फॉस्फोमिडाँन (0.03 टक्के) किंवा डायमेथोएट (0.03 टक्के) या किटकनाशकांची फवारणी करावी.

हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी शेणखतात ते शेतात पसरण्यापुर्वी 10 टक्के लिंडेन किंवा 2 टक्के मॅलेथिऑन भुकटी मिसळावी. शेतात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळल्यास 60 किलो प्रती हेक्टरी 5 टक्के क्लोरडेन किंवा हेप्टाक्लोर भुकटी जमिनीत मिसळावी. पावसाळ्याच्या सुरुवातीस भुंगेरे बाहेर पडल्यावर कडू निंबाच्या, बाभळीच्या झाडावर किटकनाशकांची फवारणी करून ते नष्ट करावेत._

एकात्मिक किडरोग व्यवस्थापन

पेरणीनंतर कीडनाशक फवारणी वेळापत्रक
10 व्या दिवशी ( खोडमाशी नियत्रंण) 5% निबोळी अर्क किंवा क्बिनिल्फोस
19 व्या दिवशी + 19.19.19 (चक्रिभुंगा, उंट अळी नियत्रंण)
प्रोफेनॉफोस 50% किंवा इण्डॉक्सी कर्ब 18.5%
45 दिवशी ( फुल धारणा, स्पोडूटरा अळी नियत्रंण)
स्पिनोटरेम 11.7% किंवा इण्डॉक्सीकर्ब 18.5% + 17.44.00. + Rcf मायक्रोला
80 व्या दिवशी ( अलीवर्गिय + शेंगवरील करपा + दाण्याचे वजन वाढणे)
क्लोरअण्टरानीलीपोर 18.3% + तेब्युकिनोझोल सल्फर 65 wg + 0.0.50 किंवा पोटॅशियम सोना इट

महाराष्ट्रात सोयाबीन पिकावर आढळणारे प्रमुख रोग व त्यांचे नियंत्रण :

तांबेरा : सतत पाऊस व ढगाळ हवामान अशी अनुकूल परिस्थिती राहिल्यास या रोगांचा इतर भागात प्रसार होतो. या रोगांमूळे पानांच्या मागील बाजूस लालसर, तपकीरी रंगाचे पुरळ दिसून येतात. पिकांची वाढ मंदावते पाने गळतात. उशिरा पेरलेल्या सोयाबिन पिकाचे जास्त नुकसान होत असल्याने या भागातील शेतकरी 15 जुनपुर्वी पेरणी करतात. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पीक फुलावर असताना हेक्झाकोनँझोल 0.1 टक्के या रसायनांचा फवारा आवश्यक ठरतो.

खोडाचा राखी करपा : पिकाच्या उगवणीनंतर कोरडे,उष्ण हवामान असल्यास यो रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. रोपाची वाढ थांबून रोपे मरतात. खोडाच्या जमिनीलगतच्या भागावर काळ्या रंगाचे चट्टे दिसतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी थायरम 3-4 ग्रँम प्रती किलो किंवा कार्बेन्डँझिम 2-2.5 ग्रँम प्रती किलो या प्रमाणात बीजप्रक्रीया करावी. तसेच ट्रायकोडर्मा विरीडी या बुरशीपासून तयार केलेल्या बुरशीनाशकांची बीजप्रक्रीया उपयुक्त ठऱते.

करपा : या रोगाच्या प्रादुर्भाव झालेली रोपे कोलमडून पडतात, मरतात. जमिनीजवळ खोडावर पांढरी बुरशी आढळून येते. शेतातील बुरशीग्रस्त भाग हा रोगाचे प्रमाण वाढविण्यास कारणीभूत ठरतो. अशा भागाला प्रति हेक्टरी 20 किलो क्लोरबेनच्या द्रावणाने भिजवून प्रक्रीया करावी.

सुक्ष्म जिवाणूंचे पुरळ :

रोगजनक जिवाणुमुळे पानावर लालसर तपकीरी रंगाचे फुगलेले ठीपके आढळून येतात. पावसाळी हवामानात रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. या रोगांचे नियंत्रण बीजप्रक्रीयेद्वारे किंवा कार्बोक्झीन (0.2 टक्के) च्या फवारणीने करता येते.
पानांवरील ठीपके : बुरशीच्या निरनिराळ्या रोगजनक प्रजातीमुळे पानांवर पिवळे, लालसर, तपकीरी, बेडकाच्या डोळ्याच्या आकाराचे ठीपके आढळून येतात. बुरशीनाशकांच्या फवारणीने त्यांचे नियंत्रण करता येते. त्यासाठी कार्बेन्डँझिम, डायथेन एम - 45, डायथेन झेड -78 व ताम्रयुक्त बुरशीनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करावा.

बियांवरील जांभळे डाग : पिकांच्या काढणीच्या वेळी सतत पाऊस असल्यास या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. असे रोगग्रस्त बियाणे पेरणीसाठी वापरू नये. तसेच पेरणीपुर्वी बीजप्रक्रीया करावी.

 

पीक कापणी व मळणी

साधारणपणे सोयाबीनची सर्व पाने झडून जातात ९५ टक्के शेंगा पक्व झालेल्या असतात तेव्हा पीक कापणी योग्य झाले असे समजावे. परंतू सोयाबीनच्या जास्त कालावधीच्या जातीमध्ये शेंगा जरी पक्व झालेल्या दिसल्या तरी झाडांवर हिरवी पाने दिसून येतात. तसेच १०% शेंगासुध्दा हिरव्या दिसतात. तेव्हा पीक पक्व झाल्याबरोबर ताबडतोब कापणी सुरू करावी अन्यथा उशीर झाल्यास शेंगा तडकून जातात. उत्पन्नात घट येवू शकते. मोनॅटो ही जात उशिरा कापणीस फारच संवेदनशील आहे तसेच पी.के.-४५२ या जातीस कापणीस वेळ झाला असल्यास उत्पन्नात ८०-८५ टक्के घट येवू शकते.

सोयाबीनमधील ओलाव्याचे प्रमाण १७ टक्के असताना या पिकाची कापणी करणे योग्य ठरते. तसेच मळणी करतांना सोयाबीनच्या दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १३-१५ टक्के असणे आवश्यक आहे. जर बियांणामधील ओलाव्याचे प्रमाण १३ टक्केपेक्षा कमी असल्यास अशावेळी मळणी करतांना दाण्याची फूट होऊन दाळ होण्याचे प्रमाण वाढते किंवा बियाण्यांच्या वरच्या कवचाला तडा जाऊन उगवणशक्तीचा ऱ्हास झालेला दिसून येतो.  मळणीच्या वेळी बियामधील ओलाव्याचे प्रमाण १७ टक्के पेक्षा जास्त असल्याससुध्दा बियाण्यास हानी पोहचू शकते. तेव्हा सोयाबीनच्या कापणी मळणीच्यावेळी सोयाबीनमधील ओलाव्याचे प्रमाण १३-१५ टक्के दरम्यान असणे अत्यावश्यक आहे. जेणे करून सोयाबीनची उगवणशक्ती टिकून राहून गुणवत्ता सुध्दा चांगली राहील.

सोयाबीन कापणी, मळणी करण्याच्या पध्दती

१) हाताने कापणी व मळणी
_सोयाबीनचे क्षेत्र कमी प्रमाणात असेल किंवा सोयाबिन बियाणे म्हणून उपयोगात आणावयाचे असल्यास ही पध्दत अधिक फायदेशिर ठरते अशा क्षेत्रातील पीक कापून शेतातच ४-५ दिवस सुकवायला सोडून देऊन नंतर कोरड्या जागेवर किंवा ताडपत्रीवर छोट्या छोट्या गंज्या काडीने किंवा लाकडी दांड्याने ठोकून घ्याव्यात. या क्रियेत बियाला कमी मार लागल्यामूळे सोयाबिनचे फारच कमी नुकसान होते. म्हणून बियाण्याची गुनवत्ता उदा. उगवणशक्ती टीकून ठेवायची झाल्यास हाताणे कापणी मळणी करणे अत्यावश्यक आहे.
२) हाताने कापणी तथा मळणीयंत्राद्वारे मळणी

हाताने कापणी केलेल्या सोयाबीनमधील ओलाव्याचे प्रमाण १३-१५% असतांना मळणी केल्यास बियाण्याची गुणवत्ता चांगली राहते. परंतू मळणी यंत्राच्या ड्रमच्या फे-याची गती ४०० फेरे प्रति मिनीटपेक्षा जास्त असू नये._

३) कम्बाईनर द्वारे कापणी व मळणी

पूर्वी कम्बाईनरव्दारे कापणी मळणी करणे फारसे प्रचलीत नव्हते परंतू आता काही भागात कम्बाईनरव्दारे कापणी मळणी करण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. कापून ठेवलेल्या सोयाबिनची सुध्दा कम्बाईनरव्दारे मळणी करता येते. परंतू यात सोयाबीन दाळ होतांना दिसून येते. तसेच या सोयाबीनच्या बियाण्यांच्या कवचाला सुध्दा इजा पोहचुन त्याचा उगवनशक्तीवर परिणाम होतो. ज्या ठीकाणी सोयाबीन हे बिजोत्पादणासाठी घ्यावयाचे असेल त्या ठीकाणी कम्बाइनरद्वारे कापणी, मळणी करु नये. कम्बाईनरव्दारे कापणी मळणी केल्यास ८-१० टक्के बियाण्याची घट येऊ शकते.

कापणी मळणी झाल्यावर सोयाबीनचे बियाणे उफणूक, चांगले साफ करून सुकवून मगच साठवावे. बियाणे सुकवितांना सोयाबीन मधील ओलाव्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जास्त ओलावा असल्यास बुरशीची वाढ होवून बियाण्याच्या प्रतीवर परीणाम होतो त्यासाठी वाढ होवून बियाण्याच्या प्रतिवर परीणाम होतो, त्यासाठी साठवणआधी बियाणे सुकविणे अत्यांवश्यक आहे. सर्वसाधारणपणे सोयाबीन खळ्यावर किंवा ताडपत्रीवर ३-४ दिवस सुकवून घेतात. रात्री बियाणे झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. बियाणे म्हणून सोयाबीन तयार कराचे झाल्यास १०-१२% ओलाव्याचे प्रमाण असलेले सोयाबिन हे मशीनद्वारे वेगवेगळ्या चाळण्यातून तसेच पृथकाद्वारे वेगळे करून पिशव्यामध्ये साठवावे.

साठवणूक

सोयाबीनची साठवणूक करतेवेळी खालील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
साठवणूक करतेवेळी लाकडी फळ्या टाकून त्यावर पोते ठेवावे जेणेकरून खालची ओल सोयाबीनला लागणार नाही.
पोत्याच्या चारही बाजूने हवा खेळती राहिल अशा रीतीने पोते ठेवावे.
एकावर एक अशी पोत्याची थप्पि न लावता दोन पोत्यावर एक अशी पोत्याची थप्पी लावावी. ५ पोत्यापेक्षा जास्त पोत्याची थप्पी लावू नये.
आवश्यकतेनूसार भांडाराची साफसफाई आवश्यकता पडल्यास किटक नाशकाची फवारणी करावी.
अशाप्रकारे सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन केल्यास सोयाबीनचे २०-२५ क्विं. / हे. उत्पन्न मिळू शकते.

पिकाच्या अधिक उत्पादनासाठी महत्वाचे मुद्दे

धुळ पेरणी करू नये.
सुपीक, मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी._
सेंद्रिय, रासायनिक, जिवाणू खतांचे शिफारसीनूसार एकात्मिक खत व्यवस्थापन करावे. नत्रयुक्त खतांचा प्रमाणबध्द वापर करावा._
पेरणी वेळेवर म्हणजेच २० जून ते १० जुलै पर्यतच करावी._
रोग, किड व्यवस्थापनाच्या दृष्टिने पिकांचा फेरपालट करावा._
◆पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणशक्ति घरच्याघरी तपासून घ्यावी._
◆शेतक-यांनी स्वत:चे बियाणे स्वत: तयार करावे._
◆पेरणीपूर्व बियाण्यास बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करून त्यानंतर जिवाणू संवर्धक लावावे._
◆बियाणे ४ सेंमी.पेक्षा जास्त खोल पेरू नये._
◆उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिमी पेरणी करावी._
◆पेरणीसाठी आवश्यकतेपेक्षा दुप्पट बियाणे स्वत: जवळ असल्यास दुबार पेरणीची व्यवस्था करता येवू शकते._
◆पीक फुलो-यावर येईपर्यत तणमुक्त ठेवावे. पीक फुलो-यावर असतांना किंवा त्यानंतर डवरणी करू नये._
◆दुस-या डवरणीच्यावेळी डव-याला दोरी बांधावी जेणेकरून स-या तयार होतील, त्यामुळे मुलस्थानी जल व मृदसंधारण साधता येईल._
◆ज्या शेतात पाण्याचा निचरा होत नसेल अशा जमिनीत ५ क्विंटल/ हेक्टर जिप्सम पूर्व मशागतीच्यावेळी मिसळून द्यावे._

चूनखडीयुक्त शेतामध्ये ( सामू ८.० पेक्षा जास्त ) सोयाबीनच्या पीकास फेरस सल्फेट ०.५ टक्के ( ५० ग्रॅम ) + २५ टक्के ( २५ ग्रॅम ) कळीचा चूना १० लिटर पाण्यात मिसळून दोन वेळा फवारणी करावी. पहिली फवारणी पिक फुलो-यावर असतांना व दुसरी फवारणी शेंगा धरण्याच्या अवस्थेत करावी._
◆किडीची आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यावरच शिफारसीनूसार एकीकृत किड व्यवस्थापनाचा अवलंब करावा._
◆मुळ कुजव्या रोगाचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे याकरीता ट्रायकोडर्मा व्हीरीडी हे जैविक बुरशीनाशक २.५ किलो + ५० किलो शेणखत मिसळून घ्यावे._
◆पीक फुलो-यावर असताना शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना पाण्याचा ताण पडल्यास व ओलीची सोय उपलब्ध असल्यास क्षेत्र संरक्षित ओलीत द्या._
◆मळणी करतांना ड्रमची गती ३००-४०० फेरे प्रति मिनिट या दरम्यान असावी. म्हणजे चांगली उगवणशक्ती असलेले बियाणे उपलब्ध होईल._

सोयाबीन पीक तांबेरा रोगास बळी पडत असल्यामुळे शक्यतोवर रब्बी हंगामात सोयाबीन घेवू नये._

लेखक -प्रवीण सरवदे कराड
प्रतिनिधी गोपाल उगले

English Summary: Soybean crop cultivation information technology Published on: 19 June 2021, 02:13 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters