!['पेरणी होणारच आहे पण, वाट बघा, लक्ष ठेवा, हुशारीने दुबार पेरणी टाळाच'](https://kjmarathi.b-cdn.net/media/3164/farmer-kharif.jpg)
'पेरणी होणारच आहे पण, वाट बघा, लक्ष ठेवा, हुशारीने दुबार पेरणी टाळाच'
चांगल्या मान्सूनच्या बातम्या येत होत्या तरी जुन महिन्यात चांगला पाऊस अन २५-३० दिवस पीकरोपटे दम धरेल इतकी पूर्ण (१०-१२ सेमी.) ओलीशिवाय ह्यावर्षी पेरणी करू नये,असे माझे स्पष्ट मत होते अन अजुनही आहे.त्याचा वारंवार पुनःरुच्चार करत आलो आहे. साधारण १० ते १२ से.मी. पाऊस झाला तर जमिनीचा पोत कसाही असला तरीही सोयाबीन पेरणी साठी बक्कळ ओल समाजावी. अन त्यावर २५-३० दिवस सोयाबीन रोपटे तग धरू शकते.जुन महिन्यात कमी पावसाचे भाकीत तरीही भागपरत्वे कमीजास्त पाऊस होवु शकतो. जमीनही पोतपरत्वे वेगवेगळ्या खोलीवर ओल धारण करते.आपल्या शेतात किती ओल किती आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.महाराष्ट्रात ह्या वर्षी जुन महिन्यात होणारा पाऊस व त्याचे वितरणसादर भाकिताकडे लक्ष वेधता - ' पूर्ण ओल, तरच पेरणी ' ह्या उक्तीकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. भाकिता प्रमाणे निम्मा महिना जवळपास संपलेला आहे
अन अजुनही पुरेशी ओल नाहीये. म्हणूनच म्हणतो ह्या वर्षांपासून ह. खातेने चालु केलेला मासिक अंदाज पीक नियोजनात प्रभावी ठरु शकतो. त्याचा उपयोग करून घ्यावा.मान्सूनपूर्व पावसाने आभासी ओल जाणवलीही परंतु पेरणीसाठी मात्र फसवी ठरली असती. स्वतःची खात्री व इतके वर्ष कमावलेल्या अनुभवावरच शेतकऱ्यांनी निर्णय घेतला,योग्य झाले.सोयाबीन बी भाव पाहता, ह्यावर्षी सोयाबीन पिकाची दुबार पेरणी अन तीही पुन्हा उशिरा केली तर हंगाम फारच फायदेशीर ठरेल असे वाटत नाही. त्यापेक्षा न झुललेलेच बरे. खरीप हंगामात दिवसागणिक पेरणीस उशीर म्हणजे सोयाबीनझड एकरी किलोगणिक कमी होते अन दिवसांगाणिक काढणीच्या वेळेस पुढे होणाऱ्या अवकाळी पावसाचा धोका वाढत जातो. हे जरी असले तरीही दुबार पेरणी टाळण्यासाठी चांगली ओल असणे गरजेचे आहे. आजच खाद्यतेलाचे भाव १०-१५ ने घसरले आहेत. शिवाय गुजराथ व राजस्थानात बम्पर भुईमूग पेरणी झाली तर सोयाबीन भाव ह्यावर्षीसारखा कडाडेल असे गृहीत धरू नका.
सोयाबीनचे मार्जिनल उत्पन्न शेतकऱ्याला उगीचच थकवते असे मला वाटते. शिवाय ह्या पिकाला फारच प्रभावी असे तणनाशकही नाही, फक्त हवेतील ओलाव्यावरही हे पीक तग धरू शकते व जमिनीसाठी चांगले 'बेवड' ही जमेची बाजू, पण केंव्हा? जेंव्हा पहिल्या २५-३० दिवसात रोपटे तरारुन वर येऊन तग धरील तेंव्हा. ह्यागोष्टी कडेही लक्ष असू द्या. फार धाडसाने लिहिले आहे.येणारा काळच ह्याचे उत्तर देईल.भौगोलिक रचनेत महाराष्ट्राचा जो भाग वर्षाच्छायेच्या प्रदेशात म्हणजेच दुष्काळी, निमदुष्काळी किंवा खरीपात नेहमी कमी पाऊस पडणाऱ्या भागातील येत असेल अश्यांनी तसेच पूर्णपणे जिरायतदार शेतकऱ्यांनी तर येत्या आठवड्यातील पावसाचे वितरण पाहूनच धाडस करावे,असे मला वाटते.साधारण १५ जुलै पर्यंत सोयाबीन पेरणी करतात.अन रोपटे २५-३० दिवस दम धरणार असेल तर १५ ते २० जुन नंतरच्या पाऊस किती होऊ शकतो ह्यावरच निर्णय घ्यावा, बघू या काय घडते ते.
जाणवणारे भाकीत अन आपला अनुभव ह्यावरच सोयाबीन हंगाम जिंकावा. असे वाटते. ' ह्यावर्षी सोयाबीनची दुबार पेरणी टाळायचीच ' असा निर्धार करणे गरजेचे आहे.ज्यांच्याकडे सलग दोन भरणी इतके पाणी व तुषार सिंचन असेल अश्याच्यांनीच मर्यादित क्षेत्रासाठी सुरवातीला पेरणीचे धाडस करावे. असे वाटते.'सावध खेळेल तो जिंकेल ' नाहीतर येरे माझ्या मागल्या ' मका ' - मका लागवडीसाठीही हीच स्थिती असु शकते.पावसाच्या पाण्यावरील नैसर्गिक ओलिवरील पेर व कोरडपेर अन वरून पाणी अशी कृत्रिम ओल ह्या दोन्हीमधील उगवण क्षमतेत फार फरक पडतो. सध्याच्या आंधळ्या रानात असे किती भरणार?जास्त क्षेत्रावर भरणं कस उरकणार? तसेच लष्कर अळीचे आक्रमणाचाही ह्यामुळे कमी अधिक फरक पडतो. तेंव्हा ह्या पिकासाठीही पूर्ण ओल गरजेची आहे.हे माझे वैय्येक्तिक मत आहे, ह्याची नोंद घ्यावी,
माणिकराव खुळे, वडांगळी ता. सिन्नर, जि. नाशिक.
Share your comments