![आता सेंद्रिय कर्ब वाढविणे आवश्यक आहे बरं, का त्याचे कारणं वाचाच](https://kjmarathi.b-cdn.net/media/2015/organic.jpg)
आता सेंद्रिय कर्ब वाढविणे आवश्यक आहे बरं, का त्याचे कारणं वाचाच
कोणताही वनस्पती अगर प्राणिजन्य पदार्थ कुजतो व त्याचे खत होते. असे आहे तर सेंद्रिय कर्ब वाढीसाठी फक्त शेणाचाच ध्यास का धरावा? वनस्पती अगर प्राण्यांनी तयार केलेला कोणताही पदार्थ हा खतासाठी योग्य आहे असा एक पायाभूत नियम यातून तयार झाला.पूर्वी माझ्या पुढे असा प्रश्न पडायचा शेणाचे कुजून खत होते हे ठीक, पण पाळापाचोळ्याचे खत कसे काय होते. म्हणजे निसर्गात काही सजीवांना हे काम दिलेले आहे.कुजण्याची प्रक्रिया म्हणजे हे सजीव तो पदार्थ खातात. त्यांची विष्ठा व मृत शरीरे म्हणजे तपकिरी रंगाची भुकटीसारखा दिसणारा पदार्थ ज्याला आपण शेणखत किंवा कंपोस्ट असे म्हणतो. शेतकरी वर्गाची पालापाचोळ्यापेक्षा शेणखतावर जास्त भक्ती आहे.शुद्ध शेणापासून तयार झालेले खत म्हणजे सर्वांत उत्तम खत. पालापाचोळ्यापासून तयार झालेले कंपोस्ट खत म्हणजे दुय्यम दर्जाचे अशी एक मानसिकता तयार झाली आहे.शेणाचा मूळ स्रोत वनस्पतीच आहे. कोणताही वनस्पती अगर प्राणिजन्य पदार्थ कुजतो व त्याचे खत होते.
असे आहे तर सेंद्रिय कर्बवाढीसाठी फक्त शेणाचाच ध्यास का धरावा? वनस्पती अगर प्राण्यांनी तयार केलेला कोणताही पदार्थ हा खतासाठी योग्य आहे, असा एक पायाभूत नियम यातून तयार झाला. या पुढील वाटचालीत शेण व गदाळा या मर्यादा निघून गेल्यामुळे वनस्पती अगर प्राण्यांनी तयार केलेल्या प्रत्येक पदार्थाकडे खत असे पाहण्याची सवय लागली.खतासाठी कच्चा पदार्थांची यादी इतकी व्यापक झाली की आज वर सेंद्रिय खताची टंचाई हा शेतीपुढील ज्वलंत प्रश्न संपूनच गेला. याचे एक उदाहरण वाचकापुढे ठेवितो. आजवर शेताच्या बांधावरील झाडांच्या फांद्या जळणासाठी तोडल्या जात. मोठ्या आकाराचे लाकूड जळणासाठी बाजूला काढून शेंड्याच्या लहान आकाराच्या फांद्या व पाने वाहनात भरून शेतातील एखाद्या पडिक कोपऱ्यात फेकून दिली जात. पुढे ती तेथेच कुजून संपून जात परंतु त्यापासून खत होऊ शकेल, असे बरेच दिवस लक्षात आले नाही. वरील अभ्यास झाल्यानंतर अशा लहान फांद्या घराकडे न आणता उसाच्या सरीत विसकटून टाकून देणे सुरू झाले. पुढे पावसाळ्यात त्याचे खत होऊन ते अवशेष संपून गेले. पायाभूत विज्ञानाने एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो, याचे हे एक उदाहरण.
आजवर शेणखताच्या ढिगात चुकून एखादे उसाचे खोडके गेले तर बाकीचे खत तयार झाले तरी हे खोडके जसेच्या तसेच फक्त थोडेसे काळसर झाल्याचे आढळले. इथे आपली मानसिकता अशी तयार होते की हे खोडवे हा खत करण्याचा पदार्थ नाही. रानात खत भरून नेताना हे खोडवे बाजूला फेकून देऊन बाकी खत रानात नेऊन शेतकरी टाकेल.दुसऱ्या बाजूला हे खोडके चुलीत घातले तर उत्तम जळतात, मग हा पदार्थ खत करण्यासाठी नसून हे जळण आहे, असाच समज सर्वत्र रूढ आहे. जळगाव अगर खानदेशात रस्त्याकडेला सर्वच केळीचे अवशेष फेकून दिलेले पाहावयास मिळतील. उत्तर महाराष्ट्रात कापूस तूर पिकविणाऱ्या भागात या पिकाचे अवशेष तुराट्या पराट्या घराच्या परड्यात आणून जळणासाठी रचून ठेवलेल्या सर्वत्र आढळतील.नांगरणी अगर पूर्वमशागतीच्या शेवटी धसकटे म्हणजे पूर्वीच्या पिकाचे बुडखे, मुळे अगर कुळवाच्या फासात अडकून आलेले मुळांचे जाळे हा सर्व कचराच! पेरणीपूर्वी हा सर्व कचरा वेचून बाहेर फेकून देणे, अगर लहान लहान ढीग करून जाळून टाकणे, हे काम उन्हाळ्याच्या शेवटी सर्वत्र चालू असते.
यात आपण खत करण्याचा पदार्थ पदरचे पैसे खर्च करून व्यर्थ घालवतोय, असा विचार कोणत्याही शेतकऱ्याच्या मनात येणे शक्य नाही. या उलट सर्व काडीकचरा बाहेर टाकून तयार झालेले काळेभोर शेत पाहणे यात नेत्रसुख मानणारा व उत्तम पूर्वमशागत पार पाडल्याच्या समाधानातच शेतकरी समाज दिसेल.आता यात आणखी थोडी सुधारणा झाली आहे.विदर्भ मराठवाड्यात शेतीतील टाकाऊ पदार्थापासून वीजनिर्मिती करण्याचे कारखाने उभे राहत आहेत.शेतकरी ट्रक भरभरून टनाने हा कचरा कारखान्याकडे नेऊन घालून या कचऱ्यापासून पैसे करताहेत. ऊस कारखानदारीत बगॅसपासून वीजनिर्मिती हा एक उत्तम जोडधंदा होत आहे, हे ठीक. यापुढे ऊस तुटून गेल्यानंतर उपलब्ध होणारे पाचट गोळा करून त्यांचे गठ्ठे बांधून ते जळणासाठी विकण्याचा नवीन धंदा उदयाला येत आहे. उसाची जमीन नांगरल्यानंतर बायका जळणाला खोडकी गोळा करून रान रिकामे करून देतात. असा फुकटात कचरा बाहेर जाऊन रान स्वच्छ करून मिळाल्याने शेतकऱ्यांना आनंद होतो. एके काळी असा आनंद मीपण उपभोगलाय.
Share your comments