![tomato market rate update](https://kjmarathi.b-cdn.net/media/25847/a.jpg)
tomato market rate update
Tomato Market :- मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरांमध्ये प्रचंड अशी भाव वाढ झालेली होती व त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला. परंतु दुसरीकडे ग्राहकांच्या ताटातून टोमॅटो गायब झाला. जर गेल्या दोन ते अडीच महिन्याचा विचार केला तर बाजारामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेल्या टोमॅटोचे किरकोळ बाजारातील दर मात्र चक्क 60 ते 70 रुपयांवरून घसरले व ते 30 ते 40 रुपयांपर्यंत आता आले आहेत.
त्यातच केंद्र सरकारच्या माध्यमातून टोमॅटोचे दर कमी व्हावेत याकरिता आयातीचा घाट घालण्यात आला व त्यामुळे नेपाळमधून 10 टन टोमॅटो आयातिचे करार देखील केले व आयात देखील सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे या आयातीचा कितपत परिणाम टोमॅटो दरांवर होईल हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु या क्षेत्रातील जाणकारांच्या मते आयात जरी सुरू झाली आहे परंतु ती पुरेशी नसून टोमॅटोच्या भावात यामुळे पुढील काळापर्यंत तरी जास्त घसरण होईल याची शक्यता कमीच आहे.
टोमॅटोची आवक वाढली
जर आपण महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील ज्या काही प्रमुख बाजारपेठ आहेत त्यातील टोमॅटो आवकेचा विचार केला तर ती वाढल्याने एकंदरीत त्याचा परिणाम टोमॅटो दरांवर दिसून आला. नाशिक जिल्ह्यामध्येच जवळजवळ एक लाख टोमॅटो क्रेटची आवक झाल्यामुळे दर घसरले. देशातील ज्या भागांमध्ये टोमॅटो पिकतो त्या ठिकाणाचा टोमॅटो देखील बाजारामध्ये येऊ लागल्यामुळे आता आवक वाढली व टोमॅटोचे दर पडले.
आयातीचा बाजारावर परिणाम काय होईल?
टोमॅटोचे भाव कमी व्हावेत याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून नेपाळमधून टोमॅटो आयात सुरू करण्यात आली व या आयातीचे करार हे एनसीसीएफच्या करण्यात आले असून टोमॅटोची खरेदी व वितरण या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. 10 टन टोमॅटो आयातीचे हे करार असून त्यातील पाच टन टोमॅटो हा उत्तर प्रदेशातील बाजारपेठांमध्ये पन्नास रुपये प्रति किलो दराने विकले जाणार असल्याचे देखील एनसीसीएफने सांगितले आहे.
परंतु देशाचा जर टोमॅटो उत्पादनाचा आकडा पाहिला तर तो 210 लाख टनांच्या आसपास आहे. परंतु टोमॅटोचा वापर पाहिला तर तो 200 लाख टनांच्या दरम्यान असतो. म्हणजे जवळपास देशाला 55 हजार टन टोमॅटोची गरज भासणार आहे. त्यातच आयातीच्या माध्यमातून सरकार दहा टन टोमॅटो निर्यात करणार असून या आयातीतून फक्त एका शहराची गरज पूर्ण होईल की नाही याची देखील शक्यता कमी आहे
त्यामुळेच या आयातीचा टोमॅटो बाजारावर काही परिणाम होईल असे दिसून येत नाही. या माध्यमातून एक प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न असून तीस रुपयांपर्यंत भाव कमी व्हावे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. परंतु सध्याची टोमॅटोची मागणी आणि होणारा पुरवठा इत्यादी गोष्टी पाहिल्या तर सरकारला हे उद्दिष्ट साध्य करता येईल असे दिसत नाही. त्यामुळे 30 ते 40 रुपये प्रति किलोवर असलेले टोमॅटोचे दर यापुढे उतरतील असा देखील अंदाज दिसून येत नसल्याचे जाणकार यांचे मत आहे.
Share your comments