![](https://kjmarathi.b-cdn.net/media/4417/goat1-620.jpg)
आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशात शेतीसह पशूपालनाचा व्यवसाय केला जातो. पशूपालन हे फार आधीपासून केले जाते.यात सर्वात फायदेशीर ठरतो तो शेळीपालन व्यवसाय. शेळीपालनाचा मोठा फायदा होत असतो. शेळींपासून मांस आणि दूधही मिळते. दुष्काळी - निमदुष्काळी भागात मोठ्या प्रमाणात होत असते. शेळीपालनासाठी कमी खर्च येत असतो. खर्चापेक्षा उत्पन्न अधिक असते. त्यामुळे शेळीपालन हे अंत्यत फायद्याचे आहे. यामुळेच शेळी ही गरिबांची गाय आहे, असे म्हटले जाते.
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी किंवा व्यवसाय करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी शेळीपालन हे फार उपयोगी ठरते. शेळी कोणत्याही परिस्थीत राहते. फक्त शेळीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. शेती नसेल तर गावरानात किंवा शेतात शेळ्यांची चराई आपण करु शकता. शेळीपालनाला जर शास्त्रीय ज्ञानाची जोड दिली तर हा व्यवसाय आपल्याला नक्कीच मालामाल करेल. शेळी आकाराने लहान असल्याने जागा कमी लागते. त्यामुळे जागेचा व गोठा बांधण्याचा कमी खर्च कमी येतो. शेळी कळपात राहत असल्यामुळे कळपाची वाढ झपाट्याने होते. लहान कळप घरातील स्त्रिया किंवा मुले हाताळू शकतात. यामुळे मजुरीचा खर्च वाचतो.
बाजारात बोकडाच्या मटणाला चांगली किंमत आहे. आपल्या देशातील आढळणाऱ्या शेळ्याच्या जातींमध्ये रोगांपासून वाचण्यासाठी आणि कोणत्याही वातावरणात राहण्याची क्षमता अधिक आहे. प्रजनन क्षमतही या जातींमध्ये अधिक आहे. प्रत्येक वर्षी शेळ्यांच्या संख्येत ३ ते ४ टक्क्यांनी वाढ होत असते. प्रत्येक वर्षी शेळ्यांपासून मिळणाऱ्या दूधापासून किमान ५०० रुपये मिळतात. याशिवाय शेळींपासून लेंडी खत मिळत असते. यामुळे शेळी पालन करणाऱ्या व्यक्तीला शेती करणारी व्यक्ती शेतात शेळी चारण्यासाठी पैसे देत असतो. शेळींची गर्भधारणा ही ६ ते ७ महिन्याची असते. वर्षभरात आपल्या शेळींची संख्या दुप्पट होत असते. महाराष्ट्रात उस्मानाबादी, संगमनेरी, कोकण, कन्यला आणि सुरती या शेळ्यांच्या जाती आहेत.
शेतकऱ्यांना शेळी पालनाचा फायदा व्हावा, यासाठी शासनाकडून योजनाही राबवली जात आहे. युवकांना शेळीपालनाचे धडेही गिरवले जात आहेत. जेणेकरुन ग्रामिण युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळेल. शेळी पालनासाठी बँकेकडून ५० हजार ते ५० लाख रुपयांचे कर्जही मिळते. राज्य सरकारकडून या योजनेसाठी अनुदानही मिळते. राज्यातील मागील सरकारने शेळीपालन योजना सुरु केली होती. ही योजना महाराष्ट्र शेळीपालन योजना या नावाने ओळखली जाते. शेतीपालनाची माहिती आपल्याला आपल्या जवळील पंचायत समितीत, ग्राम पंचायतीमध्ये मिळू शकते.
शेळी पालनाचे फायदे
- शेळ्या दूध आणि मांससाठी उपयुक्त.
- कातडी आणि केसांपासून अतिरिक्त उत्पन्न मिळते.
- शेतासाठी लेंडी खत मिळते. एका वेळी शेळ्या एक पेक्षा अधिक पिल्लांना जन्म देते.
- कोणत्याही वातावरणात शेळीचे पालन होते.
- शेळी पालनासाठी जागा जास्त लागत नाही.
- शेळींसाठी विशिष्ट प्रकारचे खाद्य नाही. कोणताही चारा शेळी खात असते. यामुळे खाद्याचा अधिक खर्च येत नाही.
Share your comments