![Sharad pawar news](https://kjmarathi.b-cdn.net/media/26320/add-a-subheading-57.jpg)
Sharad pawar news
राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांच्या बारामती अॅग्रो कारखान्याला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण विभागाने नोटीस बजावली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामती अॅग्रो कारखान्यावर झालेल्या कारवाईबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर झालेल्या कारवाईवर मी काही बोलू शकत नाही, असं उत्तर शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. तसंच कारवाईबाबत शरद पवार यांनी बोलणे टाळले आहे.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने आमदार रोहित पवार यांच्या कारखान्याला नोटीस बजावली आहे. पुढील ७२ तासांत त्यांना बारामती अॅग्रो प्लांट बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करुन माहिती दिली होती.
रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले की, राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली. युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे.
हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही.
आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त 'गिफ्ट' दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच 'रिटर्न गिफ्ट' देईल, ही खात्री आहे. असो!
पण सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील.
Share your comments