![pigeon pea](https://kjmarathi.b-cdn.net/media/2231/pigeon-pea.jpg)
pigeon pea
खरीप हंगामात निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या चांगलाच जिव्हारी बसला आहे. अवेळी आलेल्या पावसाने खरीप हंगामात मोठा त्राहिमाम् माजवला होता त्यामुळे खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिके मातीमोल झाली होती. यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते शिवाय यामुळे आता सामान्य नागरिक देखील संकटात सापडताना दिसत आहेत. खरीप हंगामात डाळवर्गीय पिके बऱ्याच अंशी खराब झाल्यामुळे डाळवर्गीय पिकांचा मागणीनुसार पुरवठा होत नाहीये. त्यामुळे जवळपास सर्वच डाळींचे भाव कमालीचे वधारतांना दिसत आहेत.
डाळीच्या दरात यावर्षी कमालीची चढ-उतार याच कारणाने बघायला मिळत आहे. अवकाळी पावसाचा फटका तुर पिकाला देखील बसला होता, यामुळे तुरीचे उत्पादन लक्षणीय घटले आहे, आणि त्यामुळेतुरीच्या डाळीला सोन्यासारखा भाव प्राप्त होताना दिसत आहे. जाणकार लोक सांगत आहेत की तुरीच्या डाळीचे भाव यावर्षी गगनभरारी घेतील आणि शंभरी पार करतील. राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा फार महत्त्वाचा ठरतो मात्र खरीप हंगामातच अतिवृष्टीने हजेरी लावली आणि खरीप हंगामाची पुरती वाट लावून टाकली. खरीप हंगामात लावल्या गेलेल्या तुर पिकाला देखील अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे आणि यामुळे उत्पादनात कधी नव्हे ती लक्षणीय घट होणार असल्याचे सांगितले जात आहे. तुरीचे नवीन उत्पादन अद्यापही बाजारात दाखल झालेले नाही आणि नवीन तूरडाळ येण्यास जवळपास दोन महिन्याचा काळ असल्याचे सांगितले जात आहे.
जुन्या डाळीची मागणी बाजारात कमी झाल्याने तुरीचा दर आज रोजी शंभरीच्या खालीच आहे. राज्यात 90 ते 92 रुपये प्रतिकिलो दराने सध्या तूर डाळ उपलब्ध होत आहे. मात्र असे असले तरी, उत्पादनात झालेली घट ही तूर डाळीचे भाव वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. अद्याप नवीन तूर डाळ बाजारात आली नसल्याने तूरडाळीच्या बाजार भावात चढ-उतार चालूच राहणार आहे. असे असले तरी मार्च महिन्यानंतर तूर डाळीचे भाव परत एकदा कडाडण्याची भविष्यवाणी व्यक्त केली जात आहे.
तसेच नागपूर किरकोळ किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर यांच्या मते, अद्याप पर्यंत कर्नाटक राज्यातून तूर डाळीची आवक राज्यात नजरेस पडत नाहीय आणि अजून किती दिवसात येईल हे देखील सांगता येणार नाही त्यामुळे येत्या काही दिवसात तूर डाळ चांगलीच कडाडू शकते. एकंदरीत खरीप हंगामात नजरेस पडलेला पावसाचा लहरीपणा शेतकरी समवेतच सामान्य ग्राहकांना देखील चांगलाच जिव्हारी बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Share your comments