![](https://kjmarathi.b-cdn.net/media/8408/heavy-rain-640.jpg)
राज्यात धुवांधार बॅटिग करणाऱ्या मॉन्सूनने माघार घेण्यास सुरुवात केली आहे. संपुर्ण विदर्भासह, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकणच्या काही भागातून मॉन्सून माघारी परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. यंदा हवामान विभागाने बदलेल्या हवामान नियोजनानुसार १७ सप्टेंबरला परतीच्या मॉन्सूनचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज दिला होता. मात्र, नियमित सर्वसाधरण वेळेच्या तब्बल ११ दिवस उशिराने मॉन्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. वायव्य भारतातील पश्चिम राजस्थानातून २८ सप्टेंबर रोजी मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला. ६ ऑक्टोबर बहुतांशी वायव्य आणि उत्तर भारतातून वारे परतले.
बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे परतीच्या प्रवासाला अडथळा तयार होऊन परतीचा मॉन्सून रेंगाळला होता. दरम्यान राज्यातील दक्षिण पश्चिम मॉन्सून नांदेड, नाशिक, डहाणूपर्यंत माघारी आला आहे. तर नैऋत्य मॉन्सूनने पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंडचा बहुतेक भाग, ओडिशाचा काही भाग, छत्तीसगडचा उर्वरित भाग, आंध्रप्रदेशचा किनारपट्टीचा काही भाग तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि अरबी समुद्राचा उत्तरेकडील भागातून परतला आहे. संपूर्ण देशातून मॉन्सून २८ ऑक्टोबरपर्यंत माघारी परतण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासात कोकणातील संमेश्वर, देवरुख, राजापूर, महाड, पोलादपूर, म्हसळा, वैभववाडी, वेंगुर्ला, लांजा, मालवण, मंडणगड. मुरुड आदि भागात हलका ते मध्यम पाऊस झाला.
यंदा मॉन्सूनचा मुक्काम होता अधिक काळ
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र आंध्र प्रदेश मार्गे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातून अरबी समुद्रात जाऊ मिळाले होते. त्यामुळे मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला होता. गेल्या काही वर्षांपासून मॉन्सूनचे आगमन व परतीच्या प्रवासाात मोठा बदल आढळून आला आहे. त्यामुळे यावर्षी हवामान विभागाने देशभरातील विविध शहरात मॉन्सूनचे आगमन कधी होणार व तो कधी परतणार याच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत.
विदर्भातून ३ ऑक्टोबर, मराठवाडा २८ सप्टेंबर रोजी परतेल अशा तारखा जाहीर केल्या होत्या. त्यात यंदा ८ ते ९ऑक्टोबर ,अशा सुधारित तारखा जाहीर केल्या होत्या. परंतु मॉन्सूनने काल सोमवारी माघार घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्यात गेले पंधरा दिवस मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. वादळी वारे, विजांच्या कडकटासह मध्यम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भात मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
Share your comments