![Vegetables Market](https://kjmarathi.b-cdn.net/media/14138/707771-vegetables-market-02.jpg)
Vegetables Market
पुणे । काल राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाला खराब झाला आहे. यामुळे आता भाजीपाला महाग झाला असून सर्व भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.
या गारपिटीत शिल्लक राहिलेला भाजीपाला वाचविण्यासाठी शेतकरी आता धावपळ करत आहे. यामुळे सध्या मालाची आवक घटली आहे. राहिलेला माल टिकवण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर औषधाची फवारणी करत आहे. याचा मात्र फायदा शेतकऱ्यांना होत नसून व्यापारी यामध्ये आपला हात धुवून घेत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कोरोना, परतीचा पाऊस, हवामानातील बदल या अस्मानी संकटांना तोंड देत आहे. असे असताना अजून देखील ही संकटे पुन्हा एकदा त्यांच्यापुढे उभी आहेत. यामध्ये आता हे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने सर्वसामान्य लोकांना महागाईचा फटका बसत आहे. अनेक भाज्यांनी शंभरी पार केली आहे.
कारले, गवार, मिरची, लसूण शंभरी पार गेले आहे. शेतकरी आपल्या पालेभाज्या संभाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. येणाऱ्या काही दिवसात आजूनही असेच हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. यामुळे भाज्यांचे भाव देखील असेच राहणार आहेत. फळबागांचे देखील यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आंबा, द्राक्ष या फळांवर मोठे संकट उभे राहिले आहे.
लाखो रुपये खर्च करून या बागा शेतकऱ्यांनी जपल्या आहेत. मात्र अवकाळी पावसाने आंब्याचा मोहर देखील गळून पडायला लागला आहे. तसेच तोडणीला आलेली द्राक्ष देखील आता खराब झाली आहे. महागडी औषधे फवारणी करावी लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
यामध्ये आता वांगी ८० ते ८५ रु. किलो, शेवगा ७० ते ७५ रु. मेथी २० ते २५ रु. (जुडी) शेपू २० रु. (जुडी) कांदापात ३० रु. (जुडी) कोथिंबीर १५ ते २० रु. (जुडी) बटाटे २५ ते ३० रु. कारले ११० ते ११५ रु. कांदा ४५ रु.भेंडी ७५ रु. सिमला मिरची ८० असे दर वाढले आहेत.
Share your comments