![farmars](https://kjmarathi.b-cdn.net/media/14604/capture.jpg)
farmars
राज्यातील अनेक शेतकरी उसाचे पीक घेतात, उसाच्या पिकासाठी पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत. यामुळे अनेक कारखान्यांनी उसाचे पैसे देखील दिले नाहीत. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. आता सांगलीचे खासदार संजय पाटील यांच्या मालकीच्या नागेवाडी व तासगाव कारखान्याचे बिल गेले वर्षभर न दिल्याने शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली. काका मी तुमचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, माझा भाचा तळमळून मेला हे बरोबर नाही. असे शेतकऱ्याने म्हटले आहे. यावेळी शेतकऱ्यांचा आक्रोश बघायला मिळाला.
वेळत पैसे मिळाले नाहीत म्हणून दवाखान्यात भाचा मेला, असे म्हणताच अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे तासगाव व नागेवाडी कारखान्याच्या थकित ऊस बिलासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली खासदार संजय पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा राडा झाला, यामुळे काहीवेळ वातावरण तापल्याचे दिसून आले.
यावेळी खासदार संजय काका पाटील हे मोर्चास्थळी आले, ते म्हणाले की येत्या दोन फेब्रुवारीपर्यंत ऊस बिले सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करतो. मात्र शेतकऱ्यांनी ते मान्य केले नाही. आता 2500 रूपये नाही 2850 रुपये घेतल्याशिवाय माघार नाही. बेमुदत ठिया आंदोलन तहसीलदार कार्यालय तासगाव येथे सुरू आहे, असे संघटनेकडून सांगण्यात आले. सततच्या नैसर्गिक संकटाचांचा सामना करणारा बळीराजा त्याच्या हक्काच्या पैशासाठी वणवण करतोय. मात्र त्यांच्याकडे कोणाचे लक्ष नाही, असेही शेतकऱ्यांनी यावेळी म्हटले आहे.
यावेळी एक शेतकरी रडत रडत म्हणाला, की संजय काका मी तुमचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, माझा भाचा तळमळून मेला हे बरोबर नाही. पैसे मिळाले नाहीत म्हणून दवाखान्यात भाचा मेला. कारखान्याचे बिल ना मिळाल्याने शेतकऱ्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. यामुळे आता तरी शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पैसे देण्याचे अनेकदा आश्वासन देण्यात आले मात्र अजून पैसे मिळाले नाहीत, यामुळे आता जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत, तोपर्यंत सुरूच ठेवणार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. वर्षभरापासून पैसे मिळाले नाहीत, यामुळे सध्या शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.
Share your comments