1. बातम्या

Rabbi Crop Management : रब्बी पिकांची आंतरमशागत कशी करावी?

हरभरा पेरणीनंतर १५ दिवसांच्या आत आवश्यक तेथे नांगे भरावेत आणि विरळणी करून दोन रोपातील अंतर १० सेमी ठेवावे. पेरणीपासून चार आठवड्याच्या आत एक खुरपणी आणि कोळपणी देणे आवश्यक आहे. परिणामी तणांचा नायनाट होऊन उत्पादनात २५ टक्के वाढ होते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Rabbi crop management

Rabbi crop management

डॉ. आदिनाथ ताकटे, ऐश्वर्या राठोड

रब्बी हंगामात बहुतेक पिके ही उपलब्ध असलेल्या ओल्याव्यावरच येतात. अर्थात थोडे फार विहिरीचे पाणी दिले जाते परंतु ते अपुरेच असते.अशा परिस्थितीत उपलब्ध ओलावा, पीक पेरणीपासून तर पीक काढणीपर्यंत कसा पुरेल आणि त्याचा जास्तीत जास्त पिकाला कसा उपयोग होईल याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आंतरमशागतीशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून रब्बी हंगामामध्ये अधिक उत्पादनाच्या दृष्टीने “आंतरमशागतीस” अनन्य साधारण महत्व आहे. रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, हरभरा, करडई आणि सूर्यफुल ही पिके घेतली जातात. या पिकात आंतरमशागत कशी करावी याचा उहापोह येथे केला आहे.

रब्बी ज्वारी
पेरणीनंतर १० दिवसांनी पहिली व १२ ते १५ दिवसांनी दुसरी विरळणी करावी. पोंगेमर झालेली रोपे काढून टाकून आवश्यक तेथे नांगे भरावेत. जमिनीत ओल धरून ठेवण्यासाठी ज्वारीच्या पिकाला तीन कोळपण्या द्याव्यात. त्यासाठी पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात पहिली, पाचव्या आठवड्यात दुसरी तर आठव्या आठवड्यात तिसरी कोळपणी करावी. त्यासाठी अखंड पासाचे कोळपे वापरावे. दुसरी व तिसरी विशेषतःशेवटची कोळपणी दातेरी कोळप्याने केल्यास रान फुटून पडणाऱ्या भेगा बुजतात व बाष्पीभवन थांबते ही कोळपणी अत्यंत महत्वाची आहे.

तणांच्या उपद्र्वानुसार एक ते दोन वेळा खुरपणी करावी.जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हेक्टरी पाच टन काडीकचरा/धसकटे,सरमाड पिकाच्या दोन ओळीत पसरवावा. या आच्छादनामुळे जमिनीत ओळ चांगली टिकून राहण्यास मदत होते. अनियमित हवामान, अवर्षण पडल्यास ज्वारीच्या पिकामधील प्रत्येक तिसरी ओळ काढून आंतरमशागत करावी. ज्वारी मधील टारफुला व इतर द्विदल तणांचा नाश करण्यासाठी २-४ डी तणनाशक हेक्टरी १ किलो ६८० ते १००० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

सिमेझीन व अॅटा्झीन प्रत्येकी हेक्टरी १ किलो वापरून ज्वारीतील द्विदल व तृणवर्गीय तणांचा बंदोबस्त करावा. हे तणनाशक सर्वत्र फवारण्यापेक्षा ते पट्टयात देणे परिणामकारक ठरते. या तणनाशकाची फवारणी पेरणीनंतर दुसऱ्या दिवशी ज्वारी उगवून येण्यापूर्वी करावी.

हरभरा
पेरणीनंतर १५ दिवसांच्या आत आवश्यक तेथे नांगे भरावेत आणि विरळणी करून दोन रोपातील अंतर १० सेमी ठेवावे. पेरणीपासून चार आठवड्याच्या आत एक खुरपणी आणि कोळपणी देणे आवश्यक आहे. परिणामी तणांचा नायनाट होऊन उत्पादनात २५ टक्के वाढ होते. हरभरा पिकातील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी पिक पेरल्यानंतर परंतु पिक उगवणी पूर्वी सिमॅझीन तणनाशक ०.५ ते १ किलो क्रियाशील फवारावीत. बागायती हरभर्‍यातील तणांच्या बंदोबस्तासाठी फ्लूकॅसोरसीन हेक्टरी ०.७५ ते १ किलो क्रियाशील फारच परिणामकारक असून पिक पेरणीपूर्वी ६०० ते ८०० लिटर पाण्यात मिसळून करावी.

पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवातीपासून तणविरहीत ठेवावे. पीक २० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वापशावर करावी. कोळपणी नंतर एक खुरपणी करावी. कोळपणीमुळे जमिनीत हवा खेळती राहते आणि पिकांची वाढ चांगली होते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये कोळपणीमुळे जमिनीवर पडत असलेल्या भेगा बुजून जातात आणि ओल टिकून राहते

करडई
या पिकाची विरळणी उगवणीनंतर १० दिवसांनी किंवा पेरणीपासून २० दिवसांनी करावी. मध्यम जमिनीत दोन रोपात साधारणतः २० सेमी तर भारी जमिनीत ३० सेमी ठेवावे.जरुरीप्रमाणे एखादी निंदणी शक्य न झाल्यास अलकसोर हेक्टरी तीन लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर दुसऱ्या दिवशी जमिनीवर फवारावे.

पीक उगवणीनंतर १० ते १२ दिवसांनी या पिकाची विरळणी करणे आवश्यक आहे. विरळणी करताना चांगले जोमदार रोपे ठेवावी. दोन रोपामधील अंतर २० सेमी ठेवावे. रब्बी हंगामात गरज असल्यास एखादी खुरपणी करावी. दोन ते तीन कोळप्याच्या पाळ्या देणे अतिशय गरजेचे आहे. पहिली कोळपणी ३ ऱ्या आठवड्यात फटीच्या कोळप्याने दुसरी कोळपणी ५ व्या आठवड्यात अखंड पासाच्या कोळप्याने व तिसरी कोळपणी ८ व्या आठवड्यात दातेरी कोळप्याने करावी.

सूर्यफुल
पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी दोन वेळा विरळणी करावी. आधी दोन व अखेरीस एका ठिकाणी एकच रोप ठेवावे.विरळणी करताना मध्यम जमिनीत २० सेमी तर भारी जमिनीत ३० सेमी अंतर ठेवावे. पिकास १५ दिवसाच्या अंतराने एक–दोन कोळपण्या तसेच एक खुरपणी देऊन शेत तणविरहित ठेवावे.

दोन ओळीमध्ये गव्हाचे भुसकट अथवा उसाचा पाचटाचे तुकडे करून आच्छादन केल्यास हेक्टरी उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे रब्बी पिकांमध्ये योग्य वेळी आंतरमशागत केल्यास तणांचा नायनाट करून जमिनीतील हवा खेळती राहते आणि उपलब्ध ओलावा जास्त काळ टिकून राहतो. परिणामी उत्पादनात भरीव वाढ होते.

लेखक - डॉ. आदिनाथ ताकटे, मृद शास्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. मो.९४०४०३२३८९
ऐश्वर्या राठोड , आचार्य पदवी विद्यार्थी, कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

English Summary: How to Intercrop Rabbi Crops rabbi season update article by Dr Adinath Takte Aishwarya Rathod Published on: 03 November 2023, 11:30 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters