
Agriculture Minister Adv. Manikrao Kokate News
नंदुरबार : गेल्या चार – पाच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाल्याने आतापर्यंत राज्यातील २४ जिल्हे १०३ तालुके अतिवृष्टी आणि गारपिटीने बाधित झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे, त्यात हजारो एकरांवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना अधिकाधिक मदत मिळण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा येथील अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या पाहणीवेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सी.के.ठाकरे, तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व गावकरी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देताना कृषिमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. बहुतांश ठिकाणचे पंचनामे झाले आहेत, काही ठिकाणी एक दोन दिवसांत पंचनाम्यांचे काम पूर्ण होईल. येत्या आठ दिवसांत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीतचा संपूर्ण राज्याचा आराखडा आपल्यासमोर येईल. हा आराखडा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्रिमंडळासमोर सादर करून शेतकऱ्यांना निश्चितपणे अधिकाधिक मदत करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
कृषिमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा, गंगापूर आंबापूर अशा तीन गावांमध्ये वादळ, गारपिट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण हे उद्या (७ एप्रिल २०२५) नंदुरबार दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्याशी या परिस्थितीवर चर्चा करून केंद्र सरकारकडेही मदत मागणीसाठी प्रस्ताव पाठवणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे हे शासनाचे धोरण आहे, त्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी थेट शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांनी शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा देण्याबाबात आश्वस्त केले.
Share your comments