![a farmer](https://kjmarathi.b-cdn.net/media/4660/farmer-8-620.jpg)
a farmer
कृषिप्रधान देशात आपल्या स्वतःच्या मालाला अधिक नाही मात्र जो बाजारपेठेत चालू आहे तोच दर मिळावा यासाठी चक्क बळीराजाला आंदोलन करण्यापर्यंत जावे लागत आहे. स्वतःला कृषिप्रधान देश म्हणवून घेणाऱ्या देशासाठी ही एक शर्मनाक घटना नव्हे नव्हे तर अपमानास्पद आहे. मात्र, हे घडले ते ही कापसाचे आगार म्हणून संपूर्ण भारतवर्षात विख्यात असलेल्या परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात. सेलू तालुका फार पूर्वीपासून कापूस खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांची सामुहिक व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. या कापसाच्या सामुहिक व्यासपीठात परभणी जिल्ह्यासमवेतच मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधव कापूस विक्रीसाठी आणत असतात. यात प्रामुख्याने जालना बीड बुलढाणा आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.
सेलूचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी शेतकरी आणि व्यापारी हे दोन्ही वर्ग कापूस विक्रीसाठी येत असतात. सेलू मध्ये जिनिंग-प्रेसिंग चे कारखाने मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने या ठिकाणी कापसाची मागणी ही इतर ठिकाणाहून अधिक असल्याचे तज्ञद्वारे सांगितले जाते. या ठिकाणी मागणी अधिक असल्याने कापसाला दर हा नेहमीच समाधान कारक असतो आणि म्हणूनच कापूस विक्रीसाठी शेतकरी बांधव अनेक मैलावरून या कापसाच्या पंढरीत दाखल होतो. मात्र कापसाच्या पंढरीत कापूस उत्पादित करणाऱ्या विठोबाचे हाल हे कृषिप्रधान देशाला काळिमा फासण्यासारखेच आहेस. दहा तारखेला कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर कापसाला कमी बाजार भाव प्राप्त होत असल्याने रास्ता रोको करण्याची नामुष्की ओढावली. व्यापाऱ्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा बळीराजाने इशारा दिला रास्ता रोकोमुळे काही काळ महामार्गावरील ट्रॅफिक विस्कळीत झाल्याचे बघायला मिळाले.
किरकोळ व खाजगी व्यापारी फडीवाले पेक्षा खूपच कमी दर देत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या हक्कांसाठी रस्त्यावरच उतरावे लागले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, शेलू म्हणजे कापसाची पंढरीच आणि या पंढरीतच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल म्हणजे ही सेलूसाठी मोठी शोकांतिका आहे. कापसाच्या उत्पादनासाठी शेतकरी बांधव अहोरात्र काबाडकष्ट करतो आणि मग पदरी कापसाचे उत्पादन पडते. मात्र, त्यांच्या या कापसाला बाजारपेठेत मिळत असलेल्या दरापेक्षा कमी दर देणे अनैतिक व अव्यवहार्य आहे. या पिळवणूकी विरुद्ध शेतकऱ्यांनी स्वतः बंड पुकारले आणि रास्ता रोको सारखा निर्णय घेण्याची नामुष्की ओढावली.
या हंगामात कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त होत आहे, तरीदेखील व्यापाऱ्यांमार्फत होणाऱ्या पिळवणुकीचा मुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे समोर येत आहे. गुरुवारी व्यापाऱ्यांनी फडीवाल्यापेक्षाही कमी दर दिल्याने शेतकऱ्यांनी आपला माल दुसऱ्या फडीवालेला विकला. दुसऱ्याला मागितला म्हणून व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी करण्यास मनाई केली. शेवटी बाजार समितीला मध्यस्थी घ्यावी लागली आणि मग शेतकरी व व्यापाऱ्यांचे संलग्नमत करून पुन्हा बिट सुरू झाली.
Share your comments