![](https://kjmarathi.b-cdn.net/media/7001/rain-9-640.jpg)
गुरुवारी मुंबई आणि उपनगरीत झालेल्या पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबई शहारातील अनेक भागात जलयम झाले आहेत. दरम्यान मुंबईनंतर मध्य महराष्ट्र, कोकणात आज मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे. गुजरात ते मध्य महाराष्ट्र, विदर्भ छत्तीसगडपर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळे आज मेघगर्जनेसह आणि जोरदार वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, खानदेश, मराठवाडा व विदर्भातील पश्चिम भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. सध्या दक्षिण गुजरातच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ आणि ४.५ किलोमीटर यादरम्यान उंचीवर आहे. यासह बंगालच्या उपसागर, उत्तर ओडिशा, पश्चिम बंगाल या भागातही कमी दाबाचे क्षेत्र असून पश्चिम बंगालच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच मॉन्सूनचा आस असलेला पट्टा बिकानेर, जयपूर, ग्वाल्हेर, सिध्दी, ओडिसा , पश्चिम बंगाल ते बंगालच्या उपसागराच्या भागापर्यंत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरात रविवारी पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.
दरम्यान कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई भागात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. राज्यातील किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार असल्याचा अंदाज आहे. शुक्रवारी व शनिवारी पावसाचा जोर कमी होऊन रविवारी पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठावाड्यातील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान काल बुधवारी मुंबईत जोरदार पाऊस झाला. हाती आलेल्या माहितीनुसार, काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगरात येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा, विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Share your comments