![](https://kjmarathi.b-cdn.net/media/6024/rain-640-monsoon.jpg)
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या परतीच्या पावसाचा जोर कमी होणार आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पावसाची उडीप रउघडीप राहणार आहे. मात्र आज सोलापूर, नांदेड, लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी वादळी पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परतीच्या मॉन्सूनचा प्रवास सुरु आहे. त्यातच पश्चिम मध्य बंगालच्या उपसागारात कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे.
आज आणखी या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन ते आंध्रप्रदेशाच्या उत्तर किनारपट्टीजवळ नर्सापूर आणि विशाखापट्टनम व काकीनडा या परिसरात विरुन जाण्याची शक्यता आहे. सोमवारी कमी दाबाचा प्रभाव क्षेत्र हे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनमपासून ते आग्नेयकडे २८० किलोमीटर तर काकिनाडापासून आग्नेयकडे ३२० किलोमीटर, नर्सापूरपासून आग्नेयकडे ३६० किलोमीटर अंतरावर होता. आज त्या क्षेत्राची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. यासह पश्चिम मध्य अरबी समुद्राच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती असून ती आंध्रप्रदेश,रायलसीमा व उत्तर कर्नाटकाची किनारपट्टी दरम्यान सरकत आहे.
गुरुवारी या वाऱ्यांची स्थिती कोकण, दक्षिण गुजरात या भागात येऊन कमी होण्याची शक्यता आहे. तर उत्तर कर्नाटकाच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. यामुळे परतीच्या पावसाला राज्यातून माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान आहे. राज्यात काही भागात होत असलेल्या पावसामुळे हवेत गारवा तयार होत आहे. यामुळे तापमानात चढउतार होत असून साताऱ्यातील महाबळेश्वर येते १७.० अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.
Share your comments