![](https://kjmarathi.b-cdn.net/media/6024/rain-640-monsoon.jpg)
बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्र प्रदेश दरम्यान चक्रीय स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती पावसासाठी पोषक ठरणारी आहे. त्यामुळे येत्या शनिवारपर्यंत पाऊस पडणार आहे. दरम्यान आज कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागराच्या पश्चिम भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती अजूनही कायम आहे. तर कर्नाटक किनाऱ्यापासून बंगालच्या उपसागरापर्यंत वाऱ्यांचे पूर्व जोडक्षेत्र सक्रिय झाले आहे.
दरम्यान अरबी समुद्राच्या पश्चिम भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्राकार वाऱ्यामध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराचाय पश्चिम मध्य भाग व आंध्र प्रदेशाच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस ढगाळ हवामानासह कडाक्याचे ऊन पडणार असून अधूनमधून पाऊस पडणार आहे. राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने सकाळी काही प्रमाणात धुके पडत असल्याची स्थिती आहे. उद्या ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे , नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर औरंगाबाद, बीड या जिल्ह्यातील काही भागात पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान दोन - तीन दिवसांपासून राज्यातील काही भागात पाऊस होत आहे. यामुळे शेतकरी अडचणी आला आहे. भात काढणी खोलंबल्या असून नुकसानीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी येथे सकाळी आठ वाजेपर्यंत इंदापूर येथील बावडा येथे ७९.० मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. यामुळे पिकांच्या नुकसानीमध्ये आणखी भर पडली.
Share your comments