![](https://kjmarathi.b-cdn.net/media/5304/swine-flu-2-640.jpg)
गुवाहाटी - देशात कोरोनाचा कहर सुरू असून देशातील कोरोना बाधितांचा आकडा ४० हजारांच्या पार पोहोचला आहे. देशात कोरोनाचे संकट असताना आणखी एक नवं संकट आले आहे. देशात पहिल्यांदाच आफ्रिकी स्वाईन फ्लूने शिरकाव केला आहे. याविषयीची बातमी एबीपी माझाच्या वृत्तवाहिनीने आपल्या पोर्टलवर दिली आहे.
आधीच कोरोनाचे सावट असताना आता आफ्रिकी स्वाईन फ्लूने शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान आसाममार्गाने आफ्रिकी स्वाईन फ्लू भारतात दाखल झाला आहे. आसाम राज्यात राज्यात आफ्रिकी स्वाईन फ्लूने शिरकाव केला आहे. यामुळे ३०६ गावांमधील २५०० हून अधिक डुक्करांचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील राज्य सरकारने दिली आहे. आसाममधील पशु चिकित्सक मंत्री अतुल बोरा यांनी सांगितले की, केंद्र सरकारने डुक्करांना मारण्याची मंजुरी दिल्यानंतरही राज्य सरकार त्यांना मारण्याऐवजी आफ्रिकी स्वाईन फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग शोधणार आहे. आसामधील पशुपालन आणि पशु चिकित्सक मंत्री अतुल बोरा यांनी डुक्करांच्या संख्येबाबत बोलताना सांगितले की, आसाममध्ये २०१९ मध्ये करण्यात आलेल्या गणनेनुसार, डुक्करांची संख्या जवळपास २१ लाख होती. परंतु, आतापर्यंत ही वाढून जवळपास ३० लाखांवर पोहोचली आहे.
दरम्यान या आफ्रिकी स्वाईन फ्लूचा कोविड-१९ शी संबंध नाही. आफ्रिकी स्वाईन फ्लूचा कोरोना व्हायरसशी काहीही संबंध नाही. राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग संस्था (एनआयएचएसएडी) भोपाळने हा आफ्रिकी स्वाईन फ्लू (एएसएफ) असल्याचं स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने आम्हाला सांगितलं आहे की, 'देशात या आजाराने पहिल्यांदाच शिरकाव केला आहे'.
Share your comments