![(प्रतिनिधीक छायाचित्र)](https://kjmarathi.b-cdn.net/media/4581/ration-new-620.jpg)
(प्रतिनिधीक छायाचित्र)
देशात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले असून संक्रमणापासून वाचण्यासाठी हे लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे लोकांना आपल्या घरातच बसून राहावे लागणार आहे. पण लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाऱ्या आणि गरीब जनतेचे काय होणार, अशी चिंता सरकारला सतावत होती. यावर सरकारने उपाय काढला असून यामुळे देशातील ८० कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे. केंद्र सरकारने गहू २ रुपये आणि तांदूळ ३ रुपये किलो दराने देण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकार ८० कोटी लोकांना २७ रुपये किलो दराचा गहू २ रुपये किलोने देणार तर ३७ रुपये किलो दराचा तांदूळ ३ रुपये किलोने देणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. सरकारी संस्थांमध्ये जे कंत्राटी कामगार आहेत, त्यांनाही पगार दिला जाईल. खासगी कंपन्याही यासाठी सकारात्मक आहेत, असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे. अवघ्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउनचा निर्णय मान्य केला. १३० कोटी जनतेच्या सुरक्षेसाठी हा लॉकडाउन आवश्यक होता, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान यासह भाजपने गरिब जनतेसाठी जेवणाची सोय केली आहे. आजपासून भाजप दररोज ५ कोटी गरिबांना भोजन देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी भाजपाकडून एक कार्यकर्त्यांची ओळख करण्यात येणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय जेपी नड्डा यांनी या संदर्भात पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली आहे.
Share your comments