![कृषी योजनांमध्ये महिलांना 30 टक्के प्राधान्य](https://kjmarathi.b-cdn.net/media/9133/dadaji-bhuse-600.jpg)
कृषी योजनांमध्ये महिलांना 30 टक्के प्राधान्य
सध्याच्या काळामध्ये कोरोना मुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन करण्यात येत आहे. तसेच कृषी योजनांमध्ये महिलांना 30 टक्के प्राधान्य देण्यात येईल अशा प्रकारची माहिती राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार डॉ. भारती ताई पवार, आमदार किशोर दराडे, नरेंद्र दराडे, दिलीप बनकर, दिलीप बोरसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, कृषी सहसंचालक संजीव पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी उपसंचालक के. एस. शिरसाट उपस्थित होते.
यावेळी बोलताना कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले की, येणाऱ्या खरीप हंगामात शेतातील पिकांची उत्पादकता वाढवणे यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी एक गाव, एक वाण ही संकल्पना राबवण्यात येईल. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे वाटप करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तसेच विविध प्रकारच्या कृषी योजनांमध्ये महिलांना सहभागी करून घेतल्यास त्याचा फायदा भविष्यात होईल. यामध्ये महिलांना कृषी विषयक प्रशिक्षण देण्यात येऊन कृषी योजनांमध्ये महिलांना 30 टक्के प्राधान्य देण्यासोबतच अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या कृषी योजनांचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक माहितीचे संकलन करण्यात आले आहे.
तसेच यावर्षी कापसाचा बीटी वाणांमध्ये झालेली दरवाढ कमी करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. कृषिमंत्री भुसे यांनी लोक डाऊन च्या काळामध्ये कृषीपूरक व्यवसाय या दुकानांना मुभा देण्यात यावी अशी मागणी केली. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट योजनांतर्गत अल्पभूधारकांसाठी व कृषी उद्योजक यांना केंद्रस्थानी ठेवून उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून सर्वसमावेशक कृषी मूल्य साखळी विकसित करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे सांगितले.
Share your comments