![](https://kjmarathi.b-cdn.net/media/6504/lady-finger-1-640.jpg)
सध्या शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपारिक पिके सोडून नगदी पिकांचे उत्पन्न घेत आहे. यात फळपिके, तेलबिया, कापूस, विविध भाजीपाला वर्गीय पिके घेऊन आपले उत्पन्न वाढवत आहे. या पिकांविषयी बोलताना भाजीपाल्याची शेती करताना शेतकऱ्यांचे रोजचे चलन चालू असते. खिशात नेहमी पैसा येत असल्याने शेतकरी समाधानी जीवन अनुभवतो. भाजीपाल्याच्या शेतीत सर्वाधिक उत्पन्न देणारी आणि शेतकऱ्यांना मालामाल बनवणारे पीक म्हणजे भेंडी. हे पीक नगदी चलन देणारे असल्याने याच्या लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार, या भागात काही वर्षांपासून भेंडीची लागवड वाढली आहे. या लेखात आपण भेंडीच्या लागवडीविषयी जाणून घेणार आहोत. लागवडीसाठी सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे जमीन आणि हवामान कोणत्या प्रकराचे असते.
जमीन आणि हवामान - भेंडीचे पीक हलक्या मध्यम तसेच भारी जमिनीत उत्तमरित्या येते. भेंडीची लागवड खरीप तसेच रब्बी हंगामातही केली जाते. उन्हाळ्यात इतर भाज्यांची बाजारात आवक कमी होत असते, जर आपण उन्हाळ्यात योग्य पाणी नियोजन करुन भेंडीचे उत्पादन घेतले तर ३० ते ४० रुपये किलो या दराप्रमाणे आपणास भाव मिळत असतो. भेंडीच्या पिकास किमान २० ते कमान ४० अंश सेल्सिअस तापमान चांगले मानवते. खरीप हंगामात १ ते ८ किलो तर उन्हाळ्यात १० किलो बियाणे पुरेसे असते. लागवडी आधी जर बियाणां बिजप्रक्रिया केली तर बियाण्यांची उगवण क्षमता चांगले होत असते.
भेंडीची लागवड करण्यापुर्वी जमिनीची चांगल्याप्रकारे नांगरणी करुन घ्या. त्यानंतर कुळवणाची पाळी देऊन जमीन भूसभुशीत करावी. हेक्टरी ४० ते ४३ गाड्या शेणखत शेतात पसरवले तर पिकासाठी उत्तम असते. खरीपात पेरणी करताना दोन रांगांमध्ये साधरण ६० सेंटीमीटर अंतर ठेवावे. तर उन्हाळ्यात पेरणी करताना रांगांमध्ये ४५ सेंटीमीटर अंतर ठेवावे. दोन रोपांमध्ये ३० सेंटीमीटर अंतर राहू द्यावे. अशा पद्धतीने बियाण्याची टोळण पद्धतीने लागवड करावी. लागवडीपुर्वी सऱ्या ओल्या करुन चांगला वाफसा आला की, सऱ्यांच्या कडेला भेंडींच्या बियाणांची लागवड करावी.
खते - आपण जेव्हा भेंडीची लागवड करतो तेव्हा जर आपण हेक्टरी ५० किलो याप्रमाणे नत्र-स्फुरद- पालश यांचा उपयोग करावा. याची मात्रा योग्य असावी, जमिनीत योग्य प्रमाणे मिसळावीत, लागवडीपूर्वी याचा वापर केल्याने हे पिकासाठी फार फायदेकारक ठरते. साधरण लागवडीनंतर २५ दिवसांनी ५० किलो या प्रमाणात हेक्टरी पुरवठा करावा. पेरणीनंतर हलक्या प्रमाणात सिंचन करावे. पाच ते सहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
लागवडीनंतर पिकाची वाढ खुंटल्यासारखी वाटत असेल अनेक किंवा फुलगळ होत असेल फळांचा आकार चांगला पोसला जात नसेल तर जमिनीत स्फुरदचे प्रमाण कमी आहे असे समजावे. त्यासाठी 00:12:34: 1.5 किलो दोनशे लिटर पाण्यात मिसळून ड्रिपद्वारे द्यावे. किंवा फवारणी करुन स्पुरद या खताचा पुरवठा जमिनीतून द्यावा. जर हरित द्रव्याचे प्रमाण कमी असेल तर पाने आणि देढ हे पिवळे दिसतात. यासाठी 5 ग्रॅम फेरस सल्फेटची फवारणी करावी.
भेंडीवरील रोग - भुरी - या रोगामुळे प्रथम पानांवर पांढरे डाग पडतात. नंतर ते डाग पसरत जाऊन पुर्ण झाड पावडरसारखे पांढरे पडते. दमट हवामानात या रोगाचा प्रसार झपाट्याने होत असतो. पाने सुकून गळत असल्याने भेंडी लागत नाही.
नियंत्रण - हेक्साकोमॅझोक 0.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांनी फवारणी करावी. किंवा पाण्यात विरघळणारे सल्फर 2.5 ग्रॅम प्रति लिटर कॅरावेन 0.5 मिली प्रति लिटर प्रमाणे फवावरणी करावी.
- शेंडी अळी - या प्रकारची अळीही झाडाचा शेंडा पोखरून खोडात शिरते आणि आतला गर खाते. त्यामुळे झाडांचा शेंडा वाळत असतो. ही अळी देठाजवळ आणि फळात शिरतात. यामुळे भेंडी वाकडी येत असतात आणि त्यावर छिद्रे पडतात.
नियंत्रण - एंडोस्लफान किंवा क्लोरोपायरीकॉस व क्किनाकफॉन प्रति लिटर २ मिली या प्रमाणात फवारावे. किडीचा प्रभाव जर जास्त झाला असेल तर सायपरमेथ्रिन 0.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- रसशोषक किडी - भेंडीवर मावा, तुटवडे, पांढरी, माशी यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो. या किडींचा प्रभाव जर भेंडी या पिकावर झाला तर पाने वेडीवाकडे होतात. पानांचा अर्धा भाग पिवळा पडतो, झाडांची वाढ खुंटते, पानांच्या संश्लेषण क्रियेत अडथळा येतो.
नियंत्रण - निबोळी तेल 3 मिली प्रति लिटर व त्याच्यात अॅसिफ्टे 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा कॉन्फीगॅर, 0.5 मिली लिटर किंवा 10 ते 15 मिली लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसू लागल्यास प्राइड 0.5 ग्रॅम प्रति लिटर या पाण्यात फवारावे.
काढणी व उत्पादन - साधरण लागवडीनंतर भेंडीला 30 ते 35 दिवसांनी फळे येतात. त्यानंतर 5 ते 7 दिवसांनी फळे तोडणीस योग्य असतात. साधारण 2 ते 3 दिवसांनी अंतराने तोडणी करावी. मध्यम आकाराची फळे तोडावीत, जर शक्य असेल तर सकाळी तोडणी करावी, त्यामुळे भेंडी ताजी टवटवीत दिसते, पर्यायाने बाजारपेठत भाव देखील चांगला मिळतो.
Share your comments