MFOI 2024 Road Show
  1. कृषीपीडिया

शाश्वत पीक उत्पादनासाठी आंतरपीक पद्धती फायद्याची

आंतरपीक पद्धतीमध्ये तूर पिकात भुईमूग ,सोयाबीन,उडीद, मूग बाजरी अथवा सुर्यफुल अशा वेगवेगळ्या आंतरपिकांची निवड करता येईल.पाऊस वेळेवर झाल्यास तुरीतील आंतरपिकास मर्यादा येत नाहीत,पण पाऊस वेळेवर न येता उशिरा आला ते मात्र मूग,उडीद,सोयाबीन सारखी आंतरपिके घेता येत नाहीत.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
sustainable crop production news

sustainable crop production news

डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. सचिन सदाफळ

खरीप हंगामा दरम्यान पावसामध्ये खंड पडणे किंवा अतिवृष्टीमुळे पिकांवर अनिष्ट परिणाम होतात. कधी कधी तर पीक हातचे जाण्याची परिस्थती निर्माण होते. राज्यातील बहुतांश शेती कोरडवाहू असल्याने पूर्ण: पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाचा लहरीपणा हा शेतकऱ्यांकरिता एक चिंतेचा विषय बनलेला आहे. अशा परिस्थितीत फक्त एका पिकावर अवलंबून न राहता आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून एकापेक्षा अधिक पिकांचा आंतर पीक पद्धतीमध्ये समावेश करणे आवश्यक आहे.

कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रामुख्याने एक पीक पद्धती,आंतरपीक पद्धती आणि दुबार पीक पद्धतींचा अवलंब, पडणाऱ्या पावसावर आणि जमिनीच्या प्रकारानुसार करावयास हवा.जमीन, हवा,पाणी आणी अन्नद्रव्य या नैसर्गिक घटकांचा समतोल राखण्यासाठी आणि परिणामकारक उपयोग होण्यासाठी मुख्य आणि आंतरपिकांची योग्य निवड करणे हितावह ठरेल.

कोरडवाहू क्षेत्रात आंतरपीक पद्धत नेहमीच फायद्याची दिसून आली आहे. आंतरपीक पद्धतीत पिकांची निवड करताना मुख्य आणि आंतरपीक वाढीची पद्धत भिन्न असणे आवश्यक आहे.मुख्य आणि आंतरपिकाच्या परिपक्वतेचा कालावधीत योग्य फरक असणे आवश्यक आहे.कोरडवाहू शेती मध्ये शाश्वत उत्पादनाच्या दृष्टीने योग्य पिके आणि पीक पद्धतीचे आयोजन करणे आवश्यक आहे, कमी कालावधीत येणारी,अवर्षणास प्रतिकारक्षम शिफारशीत वाणांची निवड करावी.स्थानिक परिस्थिती ,पाऊसमान लक्षात घेऊन उत्पादन तंत्र आणि कमी खर्चाच्या उपायांचा उपयोग करावा.कोरडवाहू क्षेत्रात पीक पद्धतीचे नियोजन करताना आवश्यकतेप्रमाणे पर्यायी पिकांचा समावेश करावा.

कोरडवाहू क्षेत्रामध्ये आंतरपीक पद्धतीची निवड करताना मुख्य आणि आंतरपीक वाढीची पद्धत भिन्न असणे आवश्यक आहे.मुख्य व आंतरपिकाची मुळांच्या वाढीची ( सोटमूळ व तंतुमय) भिन्न असावी.मुख्य व आंतरपिकांच्या पक्व्तेचा कालावधी योग्य फरक असावा. मुख्य व आंतरपीक एकमेकास स्पर्धक नसून पूरक असावेत.आंतरपिके ही प्रामुख्याने कडधान्य वर्गातील असावीत.

आपत्कालीन परिस्थितीत आंतरपीक पद्धतींचा अवलंब फायदेशीर

आपत्कालीन परिस्थितीचा सामना करताना शेतकर्यानी सलग पीक पद्धतीपेक्षा आंतर पीक पद्धतीचा अवलंब करावा.कारण पेरणी पुरता पाऊस चांगला झालेला असला तरी पीक वाढीच्या काळात चांगला पाऊस पडेलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. संपूर्ण खरीप हंगामात विभागून चांगला पाऊस आला तर दोन्ही पिकांचे उत्पादन चांगले मिळते आणि आर्थिक फायदा होतो.

जर सुरुवातीस पाऊस चांगला पडला आणि नंतर पावसाने उघडीप दिली तर कमी कालावधीचे आंतरपीक चांगले उत्पादन देऊन जाईल आणि सुरुवातीस पेरणीपुरता पाऊस होऊन पुढे बरच काळ पावसाने उघडीप दिली आणि खरीप हंगामाच्या शेवटी पाऊस चांगला झाला, तर उशिरा येणाऱ्या तुरीसारखे पीक चांगले उत्पादन देऊन जाईल म्हणून आपत्कालीन परिस्थितीचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी शेतकर्यानी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे.

कोरडवाहू क्षेत्र कोणती आंतरपिके घ्यावीत?

आंतरपीक पद्धतीमध्ये तूर पिकात भुईमूग ,सोयाबीन,उडीद, मूग बाजरी अथवा सुर्यफुल अशा वेगवेगळ्या आंतरपिकांची निवड करता येईल.पाऊस वेळेवर झाल्यास तुरीतील आंतरपिकास मर्यादा येत नाहीत,पण पाऊस वेळेवर न येता उशिरा आला ते मात्र मूग,उडीद,सोयाबीन सारखी आंतरपिके घेता येत नाहीत. शेतकऱ्यांजवळ मग तुरीतील आंतरपिकासाठी बाजरी आणि सूर्यफुल या दोन पिकांचाच पर्याय शिल्लक राहतो आणि अगदीच पाऊस लांबला ते तूर + सूर्यफुल आंतरपीक पद्धती सगळ्यात जास्त उत्पादन देऊन जाते.

आंतरपिकाची निवड करताना ...

कोरडवाहू क्षेत्रात ( कमी पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात), कमी कालावधीत परिपक्व होणारी पिकाची आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा.(उदा.मूग,उडीद,चवळी,सोयाबीन)
हलक्या व मध्यम जमिनीमध्ये नत्रस्थिरीकरण करणाऱ्या पिकांचा समवेश कराव.(मूग, उडीद चवळी,सोयाबीन,भुईमूग )
मुख्य पीक आणि आंतरपीक एकमेकांशी जमीन,हवा,सूर्यप्रकाश पाणी आणि अन्नद्रव्य इत्यादीसाठी स्पर्धा करणारे नसावे.
मुख्य पीक आणि आंतरपीक यांची मुळे जमिनीच्या वेगवेगळ्या स्थरांमध्ये वाढणाऱ्या अधिक पसरणाऱ्या असाव्यात.
सुर्यफुल ,मका यासारखी खादाड पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश टाळावा.

आंतरपीक पद्धतीचे फायदे

सरासरी पेक्षा कमी किंवा जास्त पाऊस झाल्यास आंतरपीक पद्धती मुळे हमखास उत्पादन येते.
सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यास , कमी कालावधीत येणारी आंतरपिके निश्चित उत्पादन देतात.
जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक सुपिकता टिकवून ठेवण्यास मदत होते.
सरासरी पेक्षा जास्त पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यास धूपरोधक आंतरपिके ,जमिनीची धूप कमी करतात ,पाण्याचा निचरा लवकर होतो.
सात्यत्याने बदलत्या हवामानाच्या दुष्परिणामाची तीव्रता कमी करून जमीन, हवा,पाणीआणि सूर्य प्रकाश यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन होते.

आंतरपीक पद्धती व्यवस्थापन

सरासरी पाऊसमान व जमिनीचा प्रकार या दोन बाबींवर आंतरपीक पद्धती फायद्याची ठरते.
हलक्या जमिनीत बाजरी,कुळीथ, मटकी,हुलगा, तीळ,कारला, एरंडी सारखी पिके घ्यावीत.
मध्यम जमिनीत तूर ,बाजरी ,सूर्यफुल सोयाबीन व खरीप ज्वारी यासारखी पिके घ्यावीत.
मध्यम तसेच भारी जमिनीत कापूस, तूर,सोयाबीन व खरीप ज्वारी यासारखी पिके घ्यावीत.
लवकर पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी,
दोन ओळींमध्ये योग्य अंतर ठेवून हेक्टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवावी.
मुख्य पिकांसाठी शिफारस केलेली रासायनिक खतांची पूर्ण मात्रा अधिक क्षेत्रानुसार आंतर पिकांसाठी शिफारशीत रासायनिक खतांची मात्रा द्यावी. उदा. सोयाबीन + तूर (४:२) या प्रमाणात आंतर पीक घेतल्यास ३३ टक्के क्षेत्रावर तुरीचे पीक घेता येते यासाठी तूर पिकास शिफारस केलेली ३३ टक्के मात्रा द्यावी.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करावा.
एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करून योग्य वेळी आंतरमशागत व तण नियंत्रण करावे.
आंतरपीक पद्धतीमध्ये मुख्य पीक तसेच आंतरपीक यांच्या, कृषि विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या सुधारित वाणांचा तसेच लवकर पक्व होणाऱ्या ,अवर्षणास प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी .

आंतर पीक पद्धती आणि ओळींचे प्रमाण

कापूस, सोयाबीन आणि तूर हे शेतकऱ्याचे खरीप हंगामातील अत्यंत महत्वाची पिके आहेत.महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत कापूस सर्वसाधारणपणे ४२ ,सोयाबीन ४५ आणि तूर १२ लाख हेक्टर क्षेत्रावर घेतली जाते.या तिन्ही पिकांची उत्पादकता राज्यात कमी आहे.राज्यातील या महत्वाच्या तिन्ही पिकांचा अंतर्भाव आंतरपीक पद्धतीमध्ये केल्यास शेतकऱ्यास नगदी पिके,तेलबिया आणि कडधान्य या तिन्ही घटकांची पूर्तता कण्यास मदत होते.

कापूस – आंतरपीक
•कापूस + मूग (१:१)
•कापूस + उडीद ( १:१),
•कापूस + सोयाबीन(१:१)
•रुंद ओळीमध्ये कापूस + मूग ( १:२)
•कापूस + तूर ( ४-६:१ किंवा ६-८:२)
•कापूस + सोयाबीन +तूर+ सोयाबीन (३:२:२:२)
•विदर्भ भागामध्ये – कापूस + ज्वारी + तूर +ज्वारी (६:१:२:१)

तूर आंतरपीक आणि मिश्र पीक
•मूग/उडीद /सोयबीन+तूर (४:२ किंवा २:१)
•बाजरी + तूर (२:१) पश्चिम महाराष्ट्र
•सुर्यफुल + तूर (२:१)
•तूर + गवार ( १:२)

ज्वारी – आंतरपीक
•खरीप ज्वारी + सोयाबीन (२:४) किंवा (३:६)
•खरीप ज्वारी + तूर (३:३ किंवा ४:२ )
•खरीप ज्वारी + तूर (२:१)
•पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तसेच मराठवाडा,विदर्भात देखील ४५ से.मी.अंतरावर ज्वारीच्या दोन ओळीची लागवड आणि त्यानंतर ३० से.मी अंतरावर तुरीची एक ओळ लावतात.

आंतरपिकास रासायनिक खतांची मात्र देताना

आंतरपीक घेताना शिफारशीनुसार रासायनिक खते देणे आवश्यक आहे.अन्यथा अपेक्षित उत्पादन मिळत नाही.अशावेळेस आंतरपिकाचा फायदा दिसून येत नाही याकरिता मूळ पिकास शिफारशीनुसार आणि आंतरपिकास शिफारशी नुसार मात्रा एक हेक्टर ताटांची संख्या गृहीत धरून खत द्यावे.

लेखक - डॉ. आदिनाथ ताकटे,मृद शास्त्रज्ञ एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी, मो.९४०४०३२३८९
डॉ. सचिन सदाफळ ,सहायक प्राध्यापक ,कृषि विस्तार प्रसारण केंद्र,महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी

English Summary: Intercropping practices beneficial for sustainable crop production Published on: 24 May 2024, 12:21 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters