MFOI 2024 Road Show
  1. कृषीपीडिया

रब्बी हंगामातील पिकांसाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर आहे महत्त्वाचा

खरीप हंगामातील ज्वारी मका, सोयाबीन, उडीद, मुग काढण्याचे काम काम आटोपले असून रब्बी हंगामातील लागवडीचे नियोजन सुरू आहे. यावर्षी पाऊस चांगला समाधान कारक झाल्यामुळे विहिरींमध्ये पाणी चांगले समाधानकारक असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची लागवडीसाठी पाणी उपलब्ध आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


खरीप हंगामातील ज्वारी मका, सोयाबीन, उडीद, मुग काढण्याचे काम काम आटोपले असून रब्बी हंगामातील लागवडीचे नियोजन सुरू आहे. यावर्षी पाऊस चांगला समाधान कारक झाल्यामुळे विहिरींमध्ये पाणी चांगले समाधानकारक असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची लागवडीसाठी पाणी उपलब्ध आहे. पाणी भरपूर उपलब्ध म्हणून रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा ,मका पिकांसाठी पाटपाणी मोकाट सिंचन पद्धतीचा शेतकऱ्यांनी अवलंब करू नये. पाटपाणी पद्धतीमध्ये पिकांना पाणी देण्याऐवजी जमिनीत पाणी दिले जाते. खूप पाणी दिले म्हणजे अधिक उत्पादन मिळेल असा गैरसमज आहे. पाटपाणी पद्धतीमध्ये हे फक्त तीन-चार दिवस जमीन वाफसा राहतो.

अशावेळी रब्बी हंगामातील पिकांसाठी सूक्ष्म सिंचन (ठिबक सिंचन अथवा तुषार सिंचन) चा वापर करणे अधिक फायदेशीर ठरणार आहे. सूक्ष्म सिंचन पद्धतीमुळे कमी पाण्यात कमी वेळेत कमी विजेत अधिक क्षेत्रावर पिकाची लागवड करणे सहज शक्य होते. रात्रीसुद्धा पिकांना एकसमान पाणी देता येते. रब्बी हंगामात शेतकरी गहू, हरभरा, मका, कांदा, बटाटा, सूर्यफूल, रब्बी ज्वारी या पिकांची पारंपारिक पद्धतीने लागवड करीत असतात. त्यामुळे पिकांचे उत्पादन कमी मिळते. त्यामुळे आर्थिक नफाही कमी मिळतो. त्यामुळे वर्षानुवर्ष करीत आलेल्या या पिकांच्या लागवडीसाठी प्रगत तंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. कमी पाण्यात अधिक क्षेत्र लागवडीखाली कसे आणता येईल, याकरिता सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करणे आता काळाची गरज झालेली आहे.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, सूर्यफूल, बटाटा, ज्वारी या पिकांची पारंपारिक पद्धतीमध्ये सपाट, वाफा, सरी-वरंबा पद्धतीने लागवड केली जाते. गादी वाफा पद्धतीवर लागवड अधिक फायदेशीर आहे. गादी वाफेमध्ये हवा ,पाणी यांचे संतुलन योग्य राखले जाते. सूक्ष्म सिंचन पद्धतीमध्ये जमिनीमध्ये कायम वाफसा होतो. त्यामुळे उत्पादनात भरीववाढ होते. चांगला आर्थिक फायदा होतो. 

मका हरभऱ्याची टोकण पद्धतीने लागवड करावी. मका पिकाचे दोन ओळीमध्ये ३० ते ४० सेंटिमीटर अंतर ठेवावे. तर दोन रोपांमध्ये २० ते २५ सेंटिमीटर अंतर ठेवावे. मकाप्रमाणेच रब्बी ज्वारीची ठिबकवर लागवड करता येते. त्यामुळे ज्वारीचे विक्रमी उत्पादन मिळते. गादीवाफ्यावर गहू ,हरभरा ,कांदा, मका ,बटाटा, सूर्यफूल, भुईमूग, या पिकाची लागवड केल्यानंतर या पिकांसाठी पाणी भरपूर उपलब्ध आहे, म्हणून पारंपारिक मोकाट सिंचन पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन न करता सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करणे अधिक फायदेशीर ठरते. यामध्ये ठिबक सिंचन किंवा सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करता येतो.

 


सूक्ष्म सिंचन पद्धतीची निवड:- गहू, हरभरा, कांदा, भुईमूग, सूर्यफूल, बटाटा या पिकांसाठी ठिबक सिंचन आणि सूक्ष्म तुषार( मायक्रो स्पिंकलर रेन कोर्ट सिस्टिम) सिंचन पद्धतीचा अवलंब करता येऊ शकतो. गहू, हरभरा, कांदा, भुईमूग, सूर्यफूल, मका या पिकांची गादी वाफ्यावर लागवड करण्यापूर्वी इनलाईनची उभारणी करून घ्यावी. गादीवाफा वापसा अवस्थेत आणल्यानंतर पेरणी किंवा लागवड करावी. त्यासाठी एक इनलाईन नळी गादीवाफेच्या मध्यभागी ठेवावी. आणि शेवटी नळी खुंटीला बांधावी. म्हणजे इनलाईन नळी गादीवाफ्यावर सरळ राहील. त्यामुळे संपूर्ण वाफा वापसा अवस्थेत ठेवण्यास मदत होईल. दोन-तीन लाईन नळ्यांमध्ये अंतर ४.५ ते ५ फूट ठेवावे दोन ड्रीपरमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार ३० ते ५० सेंटिमीटर अंतर ठेवावे. प्रवाह सुद्धा जमिनीच्या प्रकारानुसार २.४ ते ४लिटर प्रति तास निवड करावी.

तसेच गहू, हरभरा, कांदा, भुईमूग, सूर्यफूल ,बटाटा या पिकांसाठी ठिबक सिंचन आणि रेनपोर्ट सिस्टीम किंवा सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करता येतो. यामध्ये मायक्रो स्पिंकलरचा उपयोग करावयाचा असल्यास दोन मायक्रो स्पिंकलरमध्ये ३×३ मीटर किंवा ४ मीटर अंतर ठेवावे. दोन मायक्रो स्पिंकलरमधील अंतर स्प्रिंकलरसच्या  प्रवाहानुसार ठेवावे.

रेनकोट सिस्टीममध्ये पाणी वापर कार्यक्षमता ८०  ते ८५ टक्के मिळते. नेहमीच्या स्प्रिंकलरपेक्षा पाणी वापर कार्यक्षमता अधिक असते. याचा उपयोग कांदा भुईमूग आले हळद इत्यादी पिकांना ही करता येतो. या दोन्ही सिंचन पद्धतीमध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबावर आपले नियंत्रण असते. पाटपाणी पद्धतीमध्ये शक्य होत नाही. पाणी वापर कार्यक्षमता अधिक मिळते, याचबरोबर या पिकांच्या अधिक उत्पादनासाठी संतुलित रासायनिक खतांचा वापर करणे गरजेचे आहे. ठिबक सिंचनातून पाण्यात विरघळणारी युरिया, अमोनिया, सल्फेट किंवा फर्टीलायझर टँकमधून देता येतात. पारंपारिक रासायनिक खते पारंपारिक पद्धतीच्या वापरामुळे खतांची कार्यक्षमता ४० ते ५० टक्के मिळते. पाण्यात विरघळणारी खते ठिबकमधून दिल्यास खत वापर कार्यक्षमता ८० ते ९० टक्के मिळते, त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते. उत्पादनात भरीव वाढ होते. तसेच गुणवत्ताही चांगली मिळते. रब्बी बाजरीसारख्या पिकांमध्ये ठिबक सिंचनाचा वापर झालेला आहे. ज्वारीचे एकरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळविता येते. रब्बी ज्वारीची लागवड मकाप्रमाणे ठिबक सिंचन पद्धतीवर करता येते.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई, विजेची टंचाई, मजुरांची समस्या, रासायनिक खतांची टंचाई या समस्या भेडसावत आहेत. या समस्यांवर सूक्ष्म-सिंचन पद्धतीचा वापर हा सर्वोत्तम रामबाण उपाय आहे, सूक्ष्मसिंचन पद्धतीच्या वापरामुळे पाणी वापरामध्ये ४० ते ५० टक्के बचत होते. ठिबक सिंचनाचा उपयोग पिकांना फक्त पाणी देण्यासाठी करू नये. पिकांना ज्या ज्यावेळी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्याल त्या-त्या वेळी पाण्यात रासायनिक खते किंवा फर्टीलायझर टँकमधून द्यावीत.

 


सर्व झाडांना सारखे पाणी दिले जाते. जमीन कायम वाफसा अवस्थेत ठेवली जाते. ठिबक सिंचनातून पाण्यात विरघळणारी खते दिल्याने खतांच्या वापरामध्ये २५ ते ३० टक्के बचत करता येते. पिकांना पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठ्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते. दाणे चांगले भरले जातात दाण्यांना वजन चांगले मिळते तसेच दाण्याची गुणवत्ताही चांगली मिळते. कांदे चांगले पोसले जातात.

मसाला पिके :- आले ,हळद.

नगदी पिके- कापूस, ऊस.

तृणधान्ये :- गहू ,मका, ज्वारी, बाजरी, भात.

तेलबिया- भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, एरंडी ,मोहरी इत्यादी.

कडधान्य- हरभरा ,तूर ,वाटाणा फळपिके- केळी ,पपई ,स्ट्रॉबेरी.

वरील सर्व पिकांची लागवड इनलाईन ठिबक पद्धतीवर सहज करता येते. या पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर करताना बदल करण्यासाठी बदल करण्याची गरज पडत नाही.

त्यामुळे रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकासाठी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. कमी पाण्यात कमी वेळेत अधिक क्षेत्रासाठी सिंचन करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीशिवाय दुसरा पर्याय नाही. या तंत्राच्या वापराने पिकाचे विक्रमी उत्पादन मिळणे सहज शक्य असल्याने आर्थिक उत्पन्नात सुद्धा वाढ होईल. त्यामुळे सूक्ष्म सिंचन पद्धतीवर प्रगत तंत्राने रब्बी हंगामातील पिकाची लागवड करणे काळाची गरज आहे.

 लेखक - 

प्रा. जयश्री कडू

सहाय्यक प्राध्यापिका (कृषी अर्थशास्त्र)

श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती.

English Summary: The use of micro Irrigation method is important for rabi season crops Published on: 01 October 2020, 11:59 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters