![vegetable](https://kjmarathi.b-cdn.net/media/13718/organic.jpg)
vegetable
भाजीपाला हा नाशवंत असल्यामुळे जास्त काळ साठवता येत नाही. त्यामुळे त्याचा वापर त्वरित करावा लागतो. कीडनाशके वापरल्यानंतर आठ ते दहा दिवस भाजीपाल्याची विक्रीसाठी काढणी करू नये अशा सूचना दिल्या असल्या तरी त्या कितपत पाळल्या जातात ते सांगता येत नाही.
सेंद्रिय खतांचा आणि जैविक तथा वनस्पती जन्य रोग किडनाशक औषधांचा वापर करून केलेल्या शेती पद्धतीला सेंद्रिय शेती असे म्हणतात. सेंद्रिय शेती पद्धतीत खालील बाबींवर विशेष लक्ष दिले गेले पाहिजे.
सेंद्रिय शेतीतील विशेष बाबी
- कृषी किंवा तत्सम उत्पादनांवर आधारित उद्योग मधून निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थांच्या अधिकाधिक व कार्यक्षम पद्धतीने सेंद्रिय खत तयार करून वापर करणे.
- शेतातील काडीकचरा, धसकटे,जनावरांचे मलमुत्र तसेच वनस्पती औषधे इत्यादी कुजवून किंवा त्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत, शेणखत आणि गांडूळ खत निर्माण करून रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा अधिक वापर करण्याचा प्रयत्न करणे.
- डाळवर्गीय पिकांचा वापर करून हिरवळीच्या खताचा वापरही सेंद्रिय खत म्हणून करता येतो.
- सेंद्रिय खतांमुळे पिकांना लागणाऱ्या पोषक अन्नद्रव्यांसोबत जमिनीचा कस व जलधारणाशक्ती वाढते. जमीन भुसभुशीत होते व हवा खेळती राहून शेतीला उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ होण्यासाठी मदत होते.
जिवाणू संवर्धके
एकदल पिकांना ऍसेटोबॅक्टर जिवाणू खत आणि कडधान्य पिकांसाठी रायझोबियम जिवाणू खत बियाण्याला लावतात.हे जिवाणू जमिनीत हवेतील नत्र शोषून घेऊन साठवतात व नंतर तो पिकांना उपलब्ध करून देतात.स्फुरदविरघळणाऱ्या जिवाणू संवर्धकांची बियाण्यावर प्रक्रिया करून किंवा वनस्पतींच्या मुळाशी ते शेणखतामध्ये मिसळून देतात. हे जिवाणू जमिनीतील स्थिर झालेल्या विद्राव्य स्फुरदाचे विघटन करून तो विरघळवून पिकास उपलब्ध करून देतात.
मित्र कीटकांचा किंवा जीवाणूंचा वापर
- परोपजीवी किंवा परभक्षी किडी- या किडी पिकांचे नुकसान करणार्या किडींवर आपली उपजीविका करतात. या जैविक घटकांचा वापर करून काही भयानक किडींचा बंदोबस्त करता येतो.
- उदाहरणार्थ,क्रायसोपा आणि लेडी बर्ड बीटल ही कीड मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पांढरी माशी सारख्या किड यांचा बंदोबस्त करते. ट्रायकोग्रामा हे परोपजीवी कीटक पतंग वर्गीयकिडींच्या अंड्यामध्ये मध्ये अंडी घालून त्यांचा नाश करतात. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी विषाणू एच एन पी व्ही तर काळ्याअळीच्या नियंत्रणास एसएनपीव्हीवापरतात.
- ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर पिकांच्या मुळावरील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी केला जात आहे. याशिवाय निंबोळी अर्काचा वापर किड रोग नियंत्रणासाठी करतात. सध्याची वनौषधी बेसिलस थुरीजीएनसीस या जिवाणूंचा फवारा बोंड आळी, टोमॅटो वरील फळे पोखरणाऱ्या आळी च्यानियंत्रणासाठी करतात.
- शेतात कमीत कमी काडीकचरा, ठेवल्यामुळे किडींची संख्या कमी करण्यास मदत होते.
लेखक-
1-प्रा. शुभम विजय खंडेझोड ( एमएससी हॉर्तिकल्चर), सेंद्रिय उत्पादक ( प्रशिक्षक)PMKVY
2- ज्ञानेश्वर सुरेशराव रावणकार ( पीएचडी विद्यार्थी ),भाजीपाला शास्त्र विभाग, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
Share your comments