मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शीतगृह बांधण्यात येणार असून शीतगृहामुळे कृषिमाल निर्यातीसाठी मोठा वाव निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार असल्याने बाजार समितीने शीतगृह उभारणीसाठी आवश्यक प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विविध विकास कामांबाबत श्री. खोत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस अपर आयुक्त तथा बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी, सचिव अनिल चव्हाण, पणन उपसंचालक डॉ. अशोक गार्डी, महाराष्ट्र राज्य पणन संघाचे सरव्यवस्थापक डॉ. किशोर मांडे,सहायक व्यवस्थापक सतीश वराडे आदी उपस्थित होते.
श्री. खोत यांनी बाजार समितीच्या अधिकाऱ्यांकडून बाजार समितीमधील विविध विकास कामांचा आढावा घेतला. समितीमध्ये स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. त्यासाठी घनकचरा प्रकल्प उभारणीच्या प्रस्तावाबाबत आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर घ्यावात तसेच कामाला तात्काळ सुरुवात करावी, असेही ते म्हणाले.
Published on: 08 August 2018, 12:16 IST