शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असून कृषिमालाला चांगला दर मिळावा यासाठी सर्व खासगी बाजार समित्यांनी ई-राष्ट्रीय कृषी बाजाराशी (ई-नाम) जोडणी करावी, असे निर्देश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.
हिंगोली व वाशिम जिल्ह्यातील खासगी बाजार समित्यांच्या प्रतिनिधींची बैठक श्री. देशमुख यांनी आज मंत्रालयात घेतली. या बैठकीस आमदार राजेंद्र पाटणी, आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह पणन विभागाचे अधिकारी आणि खासगी बाजार समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, ई-नामच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी बाजाराशी ऑनलाईन जोडणी करणे पणन विभागांतर्गतच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि खासगी बाजार समित्यांना बंधनकारक आहे. खासगी बाजार समित्यांच्या समस्यांच्या अनुषंगाने बोलताना ते म्हणाले, बाजार समित्यांनी संघटितरित्या आपल्या समस्या मांडल्यास त्यावर उपाययोजना करणे शक्य होईल.
Published on: 01 August 2018, 10:17 IST