News

कोल्हापूर : देशात यंदा भाताची लागवड चांगली झाली असून गरजेइतक्या पावसामुळे पीक चांगले येण्याची शक्यता आहे. यामुळे यंदा भाताचे उत्पादन वाढेल, असा अंदाज तांदूळ उद्योगातील सूत्रांचा आहे. उत्पादन वाढले तरी देशात सर्व उद्योग, व्यवसाय वेगात सुरू असल्याने मागणी ही चांगली राहण्याचा अंदाज आहे.

Updated on 15 September, 2021 11:49 PM IST

गेल्या वर्षी (२०२०)मध्ये खरीप हंगामात भाताची पेरणी सुमारे ३२० लाख हेक्टर क्षेत्रावर झाली होती. या वर्षीदेखील मागील वर्षीही ३२० लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली. सुरुवातीच्या विलंबानंतर यंदा भाताची लागवड नंतर गतीने झाली. त्याचे उत्पादन ऑक्टोबर ते नोव्हेंबर शेवटपर्यंत वेगवेगळ्या जातींप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांमध्ये येईल. पुढे काही दिवस हवामान, निसर्गातील बदल किंवा काढणीच्या वेळी अतिपावसामुळे भाताचे नुकसान झाले नाही तर यावर्षी तांदळाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी (२०२० – २१)मध्ये देशात तांदळाचे एकूण उत्पादन ११.९८ कोटी टन झाले होते. ते यावर्षी प्रथमच १२ कोटी टन पेक्षा जास्त होईल, असा अंदाज सूत्रांचा आहे. तांदळाचे उत्पादन जरी जास्त झाले तरी यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला तांदळाचे भाव गेल्या वर्षीपेक्षा जास्त निघतील, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी कोविडची लाट असताना निर्यात कमी झाली. यामुळे राइस मिलरनी तांदळाची खरेदी कमी केली. तिसऱ्या लाटेचा धोका कायम असला तरी सध्या बाजारपेठा खुल्या आहेत. त्यामुळे तांदळाची मागणी चांगली राहील.

 

‘‘येत्या दोन ते तीन महिन्यांत तांदळाची मागणी पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला गेल्या वर्षीपेक्षा ५ ते १० टक्के दरवाढ होईल’’ असा अंदाज फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्रचे (फाम) वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी व्यक्त केला.

English Summary: Paddy production is likely to increase this year, demand will remain good
Published on: 15 September 2021, 11:49 IST