राज्यस्तरीय गोशाळा संमेलन
आपल्या संस्कृतीत गोमातेला पवित्र स्थान आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा नाही. गोमाता ही तिच्या जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला केवळ देण्याचेच काम करते. गोधन व पशुधन वाढल्यास शेती, शेतकरी आणि पर्यायाने समाजाला फायदा होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
रेशीमबाग येथील डॉ. हेगडेवार स्मारक समितीच्या महर्षी व्यास सभागृहात आयोजित राज्यस्तरीय गोशाळा संमेलनात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, जीवजंतू कल्याण बोर्डाचे अध्यक्ष एस. पी. गुप्ता, सदस्य गिरीश शहा, सुनील मानसिंहका, संजय महाराज पासपोर, विवेक बिडवई, विजय शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले, आज शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याला भूमीचे उत्खनन, पर्यावरणाचा ऱ्हास यासोबतच गोधन व पाळीव जनावरांची कमी झालेली संख्या कारणीभूत आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीची उत्पादकता संपते. शेतीवरचा भार वाढत असल्यामुळे खर्चही वाढत आहे. त्यामुळे आज शेतकरी अडचणीत आला आहे. केवळ नगदी पिकांच्या नादात चारा तयार करणारी पिके घेणे सुद्धा बंद केले गेले आहे. त्यामुळे गोधन कमी झाले आहे. आज गोधनाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. या पवित्र कार्यात अनेक संस्था, व्यक्ती चांगले काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
गोशाळा चालवितांना येणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गोधन संवर्धनाबाबत शासनाने अनेक निर्णय घेतले आहेत. याबाबत आणखी निर्णय घेण्यात येतील. गोशाळांना मदत, गायरान जमिनींचा विकास कसा करता येईल, त्याचप्रमाणे वैरण विकासाचा कार्यक्रम व्यापक करून या कार्यक्रमाला गोशाळांना कशा प्रकारे जोडता येईल, यासह अनेक मुद्द्यांवर शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. गोसेवा अनुसंधानाच्या माध्यमातून अनेक यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. या प्रकल्पांना आता जागतिक मान्यता मिळत आहे. अनुसंधान संस्थेतून उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.
श्री. बापट म्हणाले, राज्य शासन गोशाळांना सर्वतोपरी मदत करणार आहे. यापूर्वी देखील शासनाने मदत केली आहे. पशुधन वाढले पाहिजे, तसेच गोमातेचे संरक्षण झाले पाहिजे,तिच्या आरोग्याची देखील काळजी घेतली गेली पाहिजे, असे ते म्हणाले.
प्रास्ताविकातून श्री. शहा यांनी प्रत्येक तालुक्यात गो रुग्णवाहिका सुरु करण्यात यावी. जलयुक्त शिवार अभियानाच्या धर्तीवर 'गायरानयुक्त गाव' ही संकल्पना शासनाने राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. गोमाता संरक्षणामध्ये उत्कृष्ट काम करणारे अकोला येथील रतनलाल खंडेलवाल व नागपूर येथील कन्नुभाई सावरिया यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अकोला येथील आदर्श गोपालन व अनुसंधान केंद्र व नागपूर येथील गो विज्ञान केंद्राला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आर्थिक सहाय्याचा धनादेश देण्यात आला. या संमेलनात २४३ गोशाळा सहभागी झाल्या होत्या. विवेक बिडवई यांनी आभार मानले.
Published on: 17 July 2018, 09:26 IST