पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या आठवड्यात राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे तर काही भागात पाऊस पडणार नाही, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
दि. 16 ऑगस्टपर्यंत पूर्व-विदर्भात (भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर,वर्धा, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात) हलक्या पावसाची शक्यता आहे. परंतु, पश्चिम-विदर्भ (अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्हे), उत्तर-मराठवाडा (औरंगाबाद, जालना, परभणी जिल्हे) आणि जळगावमध्ये केवळ हलक्या पावसाच्या सरींची थोडी शक्यता राहील. उर्वरित मराठवाडा, खान्देश आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्रात (सांगली, सोलापूर जिल्हे) किमान 16 ऑगस्टपर्यंत तरी चांगला पाऊस अपेक्षित नाही. दरम्यान कोकणात हलका पाऊस सुरु राहील पण बहुतांश मध्य महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये चांगल्या पावसाची शक्यता कमी राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. यामुळे राज्यातील बऱ्याच भागात उष्णता कायम राहील.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
Share your comments