News

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात हस्तकला, अभियांत्रिकी आदी उद्योगाने गती धरली असून आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याच्या माध्यमातून या उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग व खनिकर्ममंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.

Updated on 15 November, 2018 6:50 AM IST


नवी दिल्ली:
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात हस्तकला, अभियांत्रिकी आदी उद्योगाने गती धरली असून आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याच्या माध्यमातून या उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग व खनिकर्ममंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.

प्रगती मैदान येथे आजपासून सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन श्री. देसाई यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतिश गवई, महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार आणि  महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त (अ.का.) समीर सहाय यावेळी उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, महाराष्ट्रामध्ये उद्योग क्षेत्रात विविधता दिसून येते. यात ग्रामीण उद्योगाने आपली वेगळी छाप सोडली आहे. ग्रामीण भागात हस्तकला आणि अभियांत्रिकी उद्योगांमध्ये गती घेतली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण उद्योजकांना जागतिक मंच उपलब्ध झाला आहे. या माध्यमातून देश-विदेशातील व्यापाऱ्यांशी थेट संवाद व व्यापाराची संधीच ग्रामीण उद्योजकांना उपलब्ध झाली आहे. या मंचासह राज्यातील ग्रामीण उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नरत राहील असे श्री. देसाई यांनी  यावेळी सांगितले.

राज्यातील टेक्स्टाईल पार्कला उद्योगांचा उत्तम प्रतिसाद ; रोजगारात वाढ

राज्य शासनाने 10 टेक्सटाईल पार्क उभारण्याचा निर्णय घेतला त्यानुसार अमरावती मध्ये एक टेक्स्टाईल पार्क उभारण्यात आला आहे. याला उद्योजकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे येथे गुंतवणूक वाढत आहे तसेच या पार्कमुळे रोजगारातही वाढ झाल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात उर्वरित टेक्स्टाईल पार्क लवकरच उभारण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

वीजेवर चालणारी वाहने उत्पादित करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन पेट्रोल व डिझेलऐवजी देशात वर्ष 2030 पर्यंत सर्व वाहने वीजेवर चालविण्यासाठी केंद्र शासनाने धोरण आखले आहे. याची अंमलबजावणी करण्यात देशात महाराष्ट्राने पुढाकार घेतला व धोरणही आखले आहे. राज्यात या धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. या धोरणानुसार वीजेवर चालणाऱ्यावाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना  राज्य शासन प्रोत्साहन देत आहे. याचाच परिणाम म्हणून राज्यात पुणे येथे जिंदाल उद्योग समूहाची जे.एस.डब्ल्यू कंपनी तर नाशिक येथे महिंद्रा कंपनी लवकरच कामाला सुरुवात करणार आहे. नागपूर येथे ई-रिक्षा निर्मितीला सुरुवात झाल्याचेही त्यांनी सांगितले.  

वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या इंटरनॅशनल ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशनच्या वतीने दि. 14 ते 27 नोव्हेंबर 2018 या कालावधीत 38 व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. “ग्रामीण भारतातील उद्योग” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्यावतीने "महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योग" हे राज्याच्या उद्योग क्षेत्रातील प्रगतीचे दर्शन घडविणारे सुरेख प्रदर्शन साकारण्यात आले आहे.

रचना संसद या संस्थेच्या चमुने संस्कार भारती रांगोळीच्या धर्तीवर महाराष्ट्र दालनाची सुबक व सुंदर सजावट केली आहे. राज्यातील ग्रामीण उद्योजकांचे 13 आणि महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचा एक असे एकूण 14 स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत. ग्रामीण उद्योगाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची भरारी आणि लहान उद्योजकांना मिळालेली संधी, लघुउद्योगास चालना देणारे राज्याचे धोरण, विदेशी गुंतवणूक, पर्यटन आदी विषयांना स्पर्श करणारे आकर्षक महाराष्ट्र दालन यंदा राज्याच्या वतीने उभारण्यात आले आहे.

English Summary: Due to trade fair, the global market is available in the rural areas of the state
Published on: 15 November 2018, 06:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)