क्रॉपसॅपच्या अहवालानुसार राज्यातील ९२५ गावांमध्ये मावा, तुडतुडे आणि फुलकिडी यासारख्या रस शोषणाऱ्या कीडीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्याचे आढळून आले. हीच परिस्थिती पाहणी न झालेल्या गावांतही झाली असण्याची शक्यता या अहवालात वर्तविण्यात आली आहे. कापसावर संजीवके, हार्मोन्स आणि टॉनिकचा मारा केल्याचे आढळून आले आहे. या औषधामुळे पिकाची वाढ होऊन तिचा लुसलुशीतपणा वाढतो. पिकाच्या हिरवेपणात वाढ झाल्याने पीक जोमदार असल्याचे भासते. मात्र, ही अनावश्यक वाढच मावा, तुडतुडे आणि फुलकिड्यांना आमंत्रित करते. केंद्र आणि राज्य सरकारने मान्यता न दिलेल्या औषधांच्या फवारणीमुळी ही समस्या उद्भवली असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले.
उत्पादनवाढीसाठी पिकावर औषधांचा मारा केल्याने राज्यातील ९२५ गावांमधील कापूस पिकावर मावा आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाला असल्याचे कृषी विभागाच्या पाहणीतून समोर आले आहे. राज्य सरकारने उत्पादन वाढीच्या संप्रेरक औषधांना कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा औषधांपासून दूर राहावे असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील बहुतांश पिकांची पेरणी अथवा लागवड अंतिम टप्प्यात आहेत. कापूस पिकाखाली ३८.७५ लाख हेक्टर क्षेत्र येते. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहे. राज्यात अनेक ठिकाणी कापसावर मावा, तुडतुडे, फुलकिडे या सारख्या रस शेषणाऱ्या कीडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागातर्फे राज्यात कापूस पिकावरील कीड व रोग सर्वेक्षणासाठी क्रॉपसॅप ही योजना राबविली जाते. त्याअंतर्गत निवडक ठिकाणी दर आठवड्यास सर्वेक्षण केले जाते. त्या माध्यमातून कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडूून कीड आणि रोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो.
Share your comments