Agripedia

कांदा पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची निवड, योग्य जातींची निवड, दर्जेदार बियाणे, निरोगी रोपे, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, कीड-रोग व्यवस्थापन इ. बाबींइतकेच कांदा पिकाची योग्य परिपक्वतेला काढणी करणे व योग्य प्रकारे साठवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Updated on 13 May, 2021 7:11 AM IST

कांदा पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची निवड, योग्य जातींची निवड, दर्जेदार बियाणे, निरोगी रोपे, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, कीड-रोग व्यवस्थापन इ. बाबींइतकेच कांदा पिकाची योग्य परिपक्वतेला काढणी करणे व योग्य प्रकारे साठवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

योग्य परिपक्तेला काढणी करून उत्तम साठवणूक केल्यास उन्हाळी कांद्याची साठवण रांगडा कांद्याच्या तुलनेमध्ये दीर्घकाळ करणे शक्य होते. यामुळे स्थानिक बाजारपेठेत दराची स्थिरता मिळवणे शक्य होते. त्याच प्रमाणे निर्यातीसाठी कांद्याची उपलब्धता वाढवता येते. अधिक काळ साठवणीमुळे बाजारभावानुसार टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करणे शक्य होते.

  • साठवणुकीसाठी काढणीपूर्वी नियोजन

  • जातीची निवड

खरिपात तयार होणाऱ्या जातींचा कांदा एक महिन्यापेक्षा जास्त टिकत नाही. रब्बी हंगामात तयार होणाऱ्या जातींचे कांदे योग्य पद्धतीने साठविल्यास जातिपरत्वे पाच महिने टिकतात.

एन २-४-१, ॲग्रिफाउंड लाइट रेड किंवा अर्का निकेतन या जाती साठवणीत विशेष घट न होता सहा महिने टिकू शकतात. भीमा किरण, भीमा शक्ती या नवीन जातीदेखील साठवणीत चांगल्या टिकतात. लागवडीसाठी योग्य जातींची निवड त्यामुळेच महत्त्वाची ठरते.

  • खते आणि पाणी नियोजन

  • लागवडीआधी माती परीक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार मुख्य व सूक्ष्मअन्नद्रव्ये यांचे व्यवस्थापन करावे. खतांची मात्रा, प्रकार आणि पाणी नियोजन यांचा साठवणीवर खूप परिणाम होतो. सर्व नत्रयुक्त खते लागवडीनंतर ६० दिवसांच्या आत द्यावीत. उशिरा नत्र दिल्यास माना जाड होतात व कांदा टिकत नाही. पालाशमुळे साठवणक्षमता वाढते.

गंधकासाठी अमोनिअम सल्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश किंवा सुपर फॉस्फेटचा वापर केला, तर गंधकाची गरज आपोआप पूर्ण केली जाते. अलीकडे संयुक्त दाणेदार खतांचा वापर होत असल्यामुळे त्यातून फक्त नत्र, स्फुरद व पालाश हीच अन्नद्रव्ये मिळतात. गंधकयुक्त खत लागवडीपूर्वी देणे हे साठवण चांगली होण्यासाठी  आवश्‍यक आहे.

पाणी देण्याची पद्धत, पाण्याचे प्रमाण याचा परिणाम साठवणीवर होत असतो. कांदा पिकाला पाणी कमी; परंतु नियमित लागते. कांदा पोसत असताना एकाच वेळी भरपूर पाणी दिले तर माना जाड होतात. जोड कांद्याचे प्रमाण वाढते. पाणी अधिक वेळा विभागून देण्यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचन फायदेशीर ठरते. काढणीअगोदर जमिनीच्या प्रकारानुसार २ ते ३ आठवडे पाणी बंद करावे. त्यानंतर पात पिवळी पडून कांद्याच्या ५० ते ७० टक्के माना पडल्यानंतर काढणी करावी.

 

साठवणुकी साठीचे नियोजन

  • कांदा सुकवणे
  1. काढणीनंतर कांदा शेतातच पातीसह सुकू द्यावा. कांद्याच्या ओळी अशा तऱ्हेने लावाव्यात, की जेणेकरून पहिल्या ओळीतील कांदा दुसऱ्या ओळीतील पातीने झाकला जाईल. अशा प्रकारे कांदा शेतात चार दिवस सुकू द्यावा.

  2. त्यानंतर चार सें.मी. लांब मान ठेवून पात कापावी. चिंगळी, जोड कांदा व डेंगळे आलेले व खराब कांदे वेगळे काढावेत.

  3. राहिलेला कांदा सावलीत ढीग करून १५ दिवस सुकवावा. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. अशा प्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ चांगला टिकतो.

  4. बऱ्याच वेळा शेतकरी कांदा काढला की कापून लगेच ढीग लावतात. ओल्या पानांनी ढीग झाकतात. मात्र कांदा काढून तो पानासहित वाळवला तर पानातील ॲबसेसिक ॲसिड पानातून कांद्यामध्ये उतरते, त्यामुळे कांद्यास सुप्तावस्था प्राप्त होते. त्यामुळे कांदे चांगले टिकतात.

 

  • साठवणगृहातील वातावरण :-

चांगल्या साठवणीसाठी साठवणगृहात ६५ ते ७० टक्के आर्द्रता, तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावे लागते. नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून साठवणगृहाची रचना केली तर तापमान व आर्द्रता काही अंशी मर्यादित ठेवून साठवणीतील नुकसान कमी करता येते.

 

  • साठवलेल्या कांद्याची उंची व रुंदी

  1. चाळीतील कांद्याची उंची ४ ते ५ फुटांपेक्षा जास्त असू नये. उंची वाढल्यामुळे तळातील कांद्यावर वजन वाढते. हवा खेळती राहत नाही.

  2. पाखीची रुंदीदेखील ४ ते ४.५ फुटांपेक्षा जास्त असू नये. रुंदी वाढवली तर वायुविजन नीट होत नाही. थरातील मध्यावरील कांदे सडतात.

  3. कांदा साठविण्याआधी एक दिवस अगोदर चाळीत बुरशीनाशकाची फवारणी करून निर्जंतुक करावी.

  4. कांदे साठवणीसाठी टाकताना जास्त उंचावरून टाकू नये.

  5. पावसाळ्यात बाजूने कांदे ओले होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

 

  • साठवणगृहाची रचना

  1. साठवणगृहाचे दोन प्रकार असतात. नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून उभारलेले साठवणगृह आणि विद्युत ऊर्जेचा वापर करून बनवलेली शीतगृहे.

  2. नैसर्गिक वायुविजनावर आधारित चाळ ही एक पाखी आणि दोन पाखी या दोन प्रकारची असतात. एक पाखी चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर करावी. दोन पाखी चाळीची उभारणी पूर्व-पश्‍चिम करावी.

  3. चाळीची लांबी ५० फुटांपेक्षा जास्त असू नये. तळाशी हवा खेळती असावी, तसेच बाजूच्या भिंतीदेखील लाकडाच्या किंवा बांबूच्या असाव्यात. त्यास फटी असाव्यात.

  4. चाळीसाठी उंचावरची व पाणी न साठणारी जागा निवडावी. चाळीभोवतीची जागा स्वच्छ असावी. तळाशी मुरूम, वाळूचा थर द्यावा. त्यानंतर चाळीची उभारणी करावी. तळाशी एक फुटाची मोकळी जागा ठेवावी.

  5. सिमेंट किंवा पन्हाळी पत्र्यांनी चाळीत उष्णता वाढते. सिमेंट पत्रे व त्यावर उसाच्या पाचटाचे आच्छादन केले तर तापमान कमी राहण्यास मदत होते.

  6. चाळीचे छप्पर उतरते असावे. ते उभ्या भिंतीच्या तीन फूट पुढे असावे, त्यामुळे पावसाचे ओसाडे कांद्यापर्यंत पोहोचत नाहीत, कांदा खराब होणार नाही.

1) ज्ञानेश्वर सुरेशराव रावनकार

    पी.एच.डी. विद्यार्थी (भाजीपाला शास्त्र)

    उद्यानविद्या विभागडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

  2) प्रा.मयूर बाळासाहेब गावंडे

      सहायक प्राध्यापक (उद्यानविद्या विभाग)

   श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती

English Summary: Read on! Method of onion planting and harvesting
Published on: 13 May 2021, 07:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)