Agripedia

पृथ्वीतलावर आणि भूगर्भात सर्वात जास्त आणि मुबलक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य म्हणजे कर्ब (कार्बन).

Updated on 01 March, 2022 11:15 PM IST

पृथ्वीतलावर आणि भूगर्भात सर्वात जास्त आणि मुबलक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य म्हणजे कर्ब (कार्बन). कर्बाचे जरी विविध प्रकार असले तरी कृषीक्षेत्रात सर्वात जास्त सहभाग असतो तो सेंद्रिय कर्बाचा. चांगल्या कुजलेल्या जैविक खतामधून वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व मूलद्रव्ये त्यांना सहज उपलब्ध होतात आणि यामध्ये कर्बाचे प्रमाण जवळपास ६० टक्के असते. म्हणून यास सेंद्रिय कर्ब असे म्हणतात. जमिनीची सुपीकता ही सेंद्रिय कर्बाच्या मूल्याद्वारे ठरविली जाते. ज्या जमिनीमध्ये हे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी असते ती जमीन शेतीसाठी अयोग्य किंवा कमी उत्पादित ठरते. शेतजमिनीमधील सेंद्रिय कर्ब जेव्हा चार टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असते. तेव्हा तिला सेंद्रिय जमीन अथवा सुपीक जमीन असे म्हणतात.

 सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या वरच्या थरात असलेल्या जिवाणू आणि विविध कीटकांच्या माध्यमात कार्यरत असतो. हे उपयोगी जीव सेंद्रिय घटकांमध्ये असलेली सर्व मूलद्रव्ये विघटन क्रियेमधून वनस्पतींच्या मुळांना उपलब्ध करून देत असतात आणि ती मृत झाल्यावर त्यांच्या विघटनामधून ही सर्व मूलद्रव्ये पिकांना पुन्हा सहजपणे उपलब्ध होतात. सुपीक जमिनीमध्ये निसर्गाची ही निरोगी अन्नसाखळी अखंडित चालू असते. मात्र जेव्हा रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अमर्याद वापर होतो तेव्हा ही अन्नसाखळी तुटते आणि जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होऊ लागते. शेतजमिनीमधील सेंद्रिय कर्बाचे झपाटय़ाने कमी होत असलेले प्रमाण हा सध्या कृषीक्षेत्रासाठी संवेदनशील विषय आहे.

मातीचे भौतिक गुणधर्म, कणांची रचना, घनता, पाण्याचे शोषण, वहन तसेच मुळाभोवती हवा खेळती राहण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण नेहमीच आवश्यक त्या प्रमाणात असावे लागते, म्हणूनच शेतीमध्ये शेणखत, कम्पोस्ट, गांडूळ खत, हिरवळीचे खते, जिवाणू खते यांचा नियमित वापर हवा, शेतबांधावर वृक्षलागवडसुद्धा हवी. कृषी उत्पादन घेतल्यावर पिकांचे अवशेष त्याच शेतात परत गाडणे हे सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. 

मातीतील सेंद्रिय कर्ब हा जमीन प्रतवारी, रोग नियंत्रण, पाणी कार्यक्षमता आणि शेती उत्पादन क्षमता यासाठी दुर्लक्षित परंतु सर्वात महत्वाचा असा घटक आहे. ह्यूमस आणि त्यांच्या संबंधीत इतर सर्व आम्ल हे कर्बाचे मुख्य घटक आहेत. 

जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यरत होऊन माती जिवंत होण्यास मदत होते. जमिनीमध्ये कार्बन आणि नत्र यांचे योग्य गुणोत्तर प्रमाण राखले गेल्यास चांगला फायदा होतो.

सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपीकतेला बळकट करणारा महत्त्वाचा घटक आहे. अजैविक आणि जैविक अशा दोन प्रकारांत सेंद्रिय कर्ब हा मातीत उपलब्ध होतो. अजैविक कर्ब हा खनिज स्वरूपात आढळतो किंवा वातावरणातील कार्बनडाय आॉक्साईडसोबत मातीतील खनिजांची जी अभिक्रिया होते, 

त्या प्रक्रियेत आढळतो. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे मातीच्या वरच्या स्तरात अधिक असते. वाळवंटी भागात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी आहे. मातीच्या १२ टक्के ते १८ टक्के श्रेणीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्या मातीस सेंद्रिय माती असे संबोधतात. ५ ते २० टक्के कर्ब हा प्रकाश संश्लेषणाद्वारे निर्माण होतो. तो मुळांच्या अवतीभोवती असणाऱ्या मातीच्या स्तरात (Rhizosphere) सूक्ष्म जिवांच्या कृतीद्वारे पुरवला जातो. सेंद्रिय कर्बाच्या उपलब्धतेत सूक्ष्मजिवांचे खूप मोलाचे योगदान असते.

 

A). सेंद्रिय कर्ब किती असावा?

सेंद्रिय खते व पिकांच्या अवशेषातील कर्ब-नत्र गुणोत्तर प्रमाण महत्त्वाचे असते. हे गुणोत्तर जेवढे जास्त तेवढा सेंद्रिय पदार्थ कुजण्यास वेळ लागतो. हे गुणोत्तर सर्वसाधारणपणे सेंद्रिय खतात १२ः१ ते २०ः१ यादरम्यान अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने उपयुक्त असते. साधारणपणे जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण १ टक्के पेक्षा जास्त असावे.

B). जमिनीतील सेंद्रिय कर्ब कसा वाढवावा?

१) सेंद्रिय खतांकडे वनस्पतींना अन्नद्रव्ये पुरविणारे स्राेत एवढ्यापुरतेच पाहू नये. जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. हे दोन्ही गुणधर्म चांगले असल्यास रासायनिक जमिनीचे गुणधर्म सुधारून जमिनीतील स्थिर झालेली अन्नद्रव्ये उपलब्ध स्थितीत येतात. पिकांना उपलब्ध होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडीस शेणखत चांगल्या प्रतीचे कसे निर्माण होईल याकडे लक्ष द्यावे.

२) ज्या प्रदेशात जास्त पाऊस पडतो, त्या ठिकाणी ढीग पद्धतीने खत तयार करावे. याउलट कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात खड्डा पद्धतीने शेणखत किंवा कंपोस्टखत तयार करावे.

३) सेंद्रिय खत चांगले कुजवावे, अन्यथा शेणखतातील तणांच्या बियांमुळे शेतात तणांचा प्रादुर्भाव वाढेल.

४) बऱ्याच शेतकऱ्यांकडे शेणखतामध्ये सामान्यतः कुजण्याच्या स्थितीनुसार तीन प्रकार पडतात. खड्ड्यातील वरचा थर न कुजलेला, मधला थर कुजलेला, तर खालचा थर न कुजलेला अशी परिस्थिती असते. अशा खतांमधून तणे, किडी, अपायकारक बुरशींचा प्रसार होतो, हे लक्षात घ्यावे.

English Summary: Organic carbon is most important and benificial
Published on: 01 March 2022, 11:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)