Agripedia

वनस्पती शरीरात कुठलाही अन्नघटक एक एकटा काम करीत नाही. सर्वसाधारणपणे गरजेप्रमाणे स्फुरद आणि पालाश, सिलिकॉन व पालाश आणि तिघे एकत्र शिवाय त्यांच्याबरोबर इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये अशी एकत्रितपणे पिकाच्या शरीरात त्यांची कामे चालतात. या संदर्भात पिकांचे पोषण संरक्षणातील पोटॅशचे महत्त्व आणि तो उचलून घेण्यासाठी लागणारी शक्ती याविषयी आपण माहिती घेत आहोत.

Updated on 16 September, 2021 8:48 AM IST

जर्मन शास्त्रज्ञ जस्टस लेबिग याने प्रयोगशाळेत वनस्पती जाळून राखेचे पृथःक्करण केले तेव्हा त्यात त्याला नत्र, स्फुरद, पालाश हे तीन घटक आढळले. तेव्हापासून या तीन घटकांचे ‘शेतीसाठी अत्यावश्यक घटक’ या सदरात वर्गीकरण झाले. नत्र, स्फुरद, पालाश संस्कृतीचा जनक म्हणून जस्टस लेबिग यांना ओळखले जाते. वनस्पती शरीरात कुठलाही अन्नघटक एक एकटा काम करीत नाही. सर्वसाधारणपणे गरजेप्रमाणे स्फुरद आणि पालाश, सिलिकॉन व पालाश आणि तिघे एकत्र शिवाय त्यांच्याबरोबर इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये, अशी एकत्रितपणे पिकाच्या शरीरात त्यांची कामे चालतात. या संदर्भात पिकाच्या पोषण - संरक्षणातील पोटॅशचे महत्त्व व तो उचलून घेण्यासाठी लागणारी शक्ती याविषयी शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे. 

 

स्फुरद हा उत्पन्न ठरविणारा घटक आहे, तर पोटॅश हा शेती उत्पादनाची गुणवत्ता ठरविणारा घटक आहे. उत्पादनाची चव, रंग, तजेला, टिकाऊ क्षमता हे गुण मुख्यतः पोटॅशच्या उपलब्धतेवर ठरतात. म्हणजे स्फुरद व सिलिकॉन हे दोघंही इमारतीच्या पायाच्या दगडाप्रमाणे काम करतात, तर पोटॅश हा कळस चढवितो. पालाश व सिलिकॉन यांची कामे, विशेषतः ताण नियोजनाच्या कामात सारखी आहेत. सिलिकॉन कायम अप्रत्यक्षपणे कामे करतो, तर पालाश प्रत्यक्ष पिकाच्या वाढीतील महत्त्वाचा घटक आहे. 

येणाऱ्या काळात शेती उत्पादनवाढीचे मोठे आव्हान असणार आहे. कारण वातावरण बदलातील ताणांमुळे पिकावर विविध प्रकारचे जैविक व अजैविक ताण येतात. या ताणाला सामोरे जाताना पिकाची अन्नघटकांची गरज बाहेरून खते देऊन मोठ्या प्रमाणावर भागविली जात आहे; पण अतिरिक्त नत्र तर पालाश व स्फुरदाची कमतरता यामुळे जवळजवळ सर्व पिकांची उत्पादने व त्यांची गुणवत्ता सतत घटते आहे. सर्व तणांना तोंड देण्यात सिलिका व पालाशची उपलब्धता निर्णायक ठरणार आहे.

पोटॅशच्या उपलब्धतेमुळे पीक सहन करते ताण -

दुष्काळाचा ताण -

१) दुष्काळी परिस्थितीत पानांमागे असणारी पर्णरंध्रे बंद राहणे व पाणी उडून जाण्याचे प्रमाण कमी होऊन पिकाच्या शरीरात जास्त काळ पाणी टिकण्यामध्ये पोटॅश मदत करते. शास्त्रज्ञांच्या मते पोटॅशच्या कमतरतेमुळे दुष्काळी परिस्थितीत पानात इथिलिनची जास्त निर्मिती होते. त्यामुळे स्टोमॅटा पेशींवर होणाऱ्या ॲबसिसिक ॲसिडच्या क्रियेत अडथळा येतो. त्यांचे बंद होणे टाळले जाते. याचा प्रतिकूल परिणाम कार्बनडाय आॅक्साइड शोषून घेण्यावर व पर्यायाने प्रकाशसंश्लेषणावर होतो. त्यामुळे रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेशिजची निर्मिती वाढते. क्लोरोफिल व पेशी आवरण यांचे विघटन सुरू होते. कालांतराने पान मरते. 

२) पेशी आवरणाची स्थिरता, मुळांची वाढ, पानांचा आकार; तसेच पिकाचे एकूण वजन दुष्काळी परिस्थितीतही वाढविण्यासाठी पोटॅशची गरज असते. त्याचाच अनुकूल परिणाम पाणी शोषून घेणे, पिकात टिकवून ठेवणे यावर होतो. 

क्षारांचा ताण -१) पालाशची कमतरता असेल तर क्षाराचा ताण सहन करायची पिकाची शक्ती कमी होते. कारण या ताणाच्या काळात पिकामध्ये नत्र व प्रकाशसंश्लेषणात कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेण्यात अडथळे निर्माण होतात. पिकाची वाढ, उत्पादनक्षमता; तसेच पीक जिवंत राहण्याची क्षमता यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. 

२) पालाशची कमी व सोडियमचे अधिक प्रमाण याने पेशीद्रव्यातील K+/Na+ यांचे गुणोत्तर कमी होते. त्याचा परिणाम मुळांच्या आयन देवाण-घेवाणीच्या शक्तीवर होतो. 

 

पालाश व कमी तापमानाचा ताण -

थंड हवामानात जर पिकात पालाशची कमतरता असेल तर पीक गारठलेल्या अवस्थेत जास्त पाणी उचलू शकत नाही. पेशींमध्ये कोरडेपणा येतो. गारपीट/ बर्फ यांच्या काळात त्यांच्यापासून संरक्षणासाठी जी विकरे पिकात तयार व्हायला लागतात, त्यांची निर्मिती खुंटते; तसेच पेशी आवरणातून इतर अन्नघटकांचे आयन, पाणी व चयापचयात तयार झालेली द्रव्ये यांच्या देवाण-घेवाणीत अडथळे निर्माण होतात. परिणामी अनेकदा बीजनिर्मिती होऊ शकत नाही. 

 

पालाश व पाणी साठून राहिल्याने निर्माण होणारा ताण -

जमिनीत पाणी बराच काळ भरून राहिले तर मुळांचे श्वसन नीट होत नाही व त्यांच्या पेशी शक्तिहीन होतात. याचा परिणाम म्हणून पर्णरंध्रांची उघडझाप, प्रकाशसंश्लेषण यावर प्रतिकूल परिणाम होतो. तसेच मुळांभोवती सल्फाइड, लॅक्टिक ॲसिड, ॲसेटिक व फॉर्मिक ॲसिड इत्यादी विषारी द्रव्ये विविध अभिक्रियांमधून तयार होऊन साठून राहतात. त्याचा परिणाम पेशी आवरण फाटण्यात होतो. या काळात जर पालाशची उपलब्धता झाली तर K+, Ca, 2+ N, Mn 2+, Fe 2+ हे आयन योग्य त्या प्रमाणात उचलले जातात. (अश्रफ इ.) 

 

पालाशचे महत्त्व -

१) पालाशची पिकामधील उपलब्धता मुख्यतः आयनच्या देवाण-घेवाणीतून होत असते. हा उचललेला पालाश पिकामध्ये होणाऱ्या चयापचयाच्या क्रियांचे नियंत्रण करतो. 

२) प्रकाशसंश्लेषण क्रियेत या घटकाचा महत्त्वाचा सहभाग आहे. अपुऱ्या पालाशमुळे श्वसनाची गती वाढते. प्रकाशसंश्लेषणाची क्रिया मंदावते. त्यामुळे पिकाच्या विविध भागांकडे कार्बोहायड्रेट्‍सचा पुरवठा कमी होतो. 

३) पेशींमधील विविध आयन्सचे संतुलन राखले जाते. 

४) लोहासारख्या जड धातूचे चलनवलन सुव्यवस्थित होते.

५) पालाशमुळे कार्बोहायड्रेट्‍स - साखर तयार होते; पण प्रथिने तयार करण्यातही त्याचा वाटा आहे. 

६) पिष्टमय पदार्थांच्या घडणीबरोबरच विघटनाची क्रियासुद्धा मार्गी लागते. या विघटनातूनच पिकाच्या वाढीसाठी लागणारी ऊर्जा मुक्त होते. 

७) पीक फुलावर येण्यासाठी तसेच फळधारणेसाठी लागणारी विकरे, जैवरसायने तयार होण्यासाठी पालाश अत्यावश्यक आहे. 

८) जवळजवळ ६० प्रकारच्या विकरांच्या क्रियांना चालना मिळते. त्यामुळे चयापचयाची क्रिया सुनियंत्रित होते. 

९) पालाशमुळे पिकातील साखर वाढून उत्पादनात वाढ होते. 

१०) रोगांचा प्रादुर्भाव, कमी पाणी आणि तापमानातील बदल यामुळे पिकावर येणाऱ्या ताणाला तोंड देण्यासाठी पालाश व सिलिका हातात हात घालून काम करतात.

 

संकलन - विनोद भोयर , मालेगाव

प्रतिनिधि - गोपाल उगले

English Summary: importance of potash
Published on: 16 September 2021, 08:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)