डॉ.आदिनाथ ताकटे
आपल्याकडे जमीन कोणत्या प्रकारची आहे?आपल्या जमिनीत फळझाडे येतील का?बारमाहीपाण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे का?आपल्या हवामानात फळझाडे कोणत्या प्रकारची येऊ शकतील? मातीची व पाण्याची तपासणी केली आहे काय?बागेसाठी उत्तम जातीवंत कलमे कोठून उपलब्ध होऊ शकतील?जी बाग आपण लावणार आहोत त्यास बाजारपेठ उपलब्ध आहे काय?प्रक्रिया उद्योग आहेत काय? अशा सर्व बाबींचा विचार केल्यानंतरच आपणास कोणती फळझाडे लावायला हवीत याचा विचार करणे महत्वाचे ठरते.
फळबाग म्हणजे ५ ते ६ महिन्याच्या पिकांच्या मशागतीची गोष्ट नसते, तो एक दिर्घकाळ चालणारा व्यवसायाच म्हणायला हरकत नाही. एकदा त्यात पडले कि थांबुन चालत नाही. अनेक वर्ष सात्यत्याने व चिकाटीने बागेचे फलोत्पादन हाती येईपर्यंत कष्ट करावे लागतात. मेहनत घ्यावी लागते.घामही गाळावा लागतो. कधी कधी पैसा अपुरा पडतो,पाणी पुरत नाही.भावनेच्या भरात एखादी बाग करावयाची ठरविले जाते आणि मग धाडस निभाविता येत नाही.सगळा पसारा अर्ध्यावर सोडावा लागतो.त्यामुळे केलेल्या कष्टाची पैशाची, अनाठायी नासाडी होते.त्यामुळे फळबाग लागवड करण्यापूर्वी योग्य नियोजनांची नितांत आवश्यकता असते.
फळबागेसाठी जमिनीची निवड
आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे, हलकी, मध्यम कि भारी हे सर्वाना परिचित असतेच.जर माहिती नसेल तर माहिती करून घ्यावी.जमिनीची खोली किती आहे? जमिनीच्या खाली मुरूम किती खोलीवर आहे? जमिनीचा निचरा कसा आहे? त्याचा अभ्यास करूनच फळबाग निवडावी.फळबागेसाठी जमिनीची निवड करताना तिचा निचरा उत्तम असणे आवश्यक आहे. फळबागेसाठी कमीत कमी १ मीटर खोलीनंतर मुरमाचा थर असणारी जमिन निवडावी. भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी, भुसभुशीत,मध्यम पोताची जमिनीचा सामू ६ ते ७.५ पर्यंत असावा.मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यापेक्षा कमी असावे. जमिनीचा उतार २ ते ३ टक्क्यापेक्षा जास्त नसावा. ज्या ठिकाणी फळबाग लावायची आहे,त्या ठिकाणच्या मातीचे परिक्षण करून घेणे आवश्यक आहे.
जमिनीचा प्रकार व त्यात घ्यावयाची पिके
|
अ.न. |
जमिनीचा प्रकार |
फळपिके |
|
१. |
हलकी ते मध्यम |
अंजीर,पेरू,डाळिंब,कागदी लिंबू,द्राक्षे,पपई,सीताफळ,बोर, करवंद, कवठ, चिंच |
|
२. |
मध्यमं |
चिकू,आंबा,संत्री,मोसंबी, काजू,नारळ. |
|
३. |
भारी |
केळी |
फार खोल असणाऱ्या जमिनी, क्षारयुक्त जमिनी, चोपण जमिनी यातून पाण्याचा निचरा योग्य होत नाही अशा जमिनीत प्रारंभी झाडे वाढल्यासारखी दिसली तरी पुढे वाढीचा वेग मंदावतो व उत्पादन मिळत नाही. काही वेळा झाडे मरण्याची संभावना असते.तसेच ज्या जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण १० % पेक्षा जास्त आहे अशा जमिनीत फळबागेची वाढ होत नाही.
फळबागेची आखणी आणि अंतर
फळझाडांची आणि जागेची निवड झाल्यावर लागवडीसाठी आखणी करणे गरजेचे आहे, तेंव्हा जमिनीची आखणी करण्यापूर्वी लागवडीची पद्धत ठरवावी. फळपिके लागवडीच्या चौरस, आयताकृती, त्रिकोणी, षटकोनी, उतार (कंटूर) अशा निरनिराळ्या पद्धती आहेत.
चौरस पद्धत ही सर्वात सोपी,आखणीस अडचण नसणारी आणि उभ्या-आडव्या मशागतीस योग्य अशी पद्धत प्रामुख्याने सर्वत्र वापरली जाते,आंबा, पेरू, चिकू, संत्रा, मोसंबी इत्यादी फळझाडांची लागवड या पद्धतीने केली जाते. या पद्धतीमध्ये झाडांच्या रांगा काटकोन करून असतात. दोन झाडातील आणि दोन रोपातील अंतर सारखेच येत असल्यामुळे झाडे सर्व दिशांनी पाहिल्यास सारख्या अंतरावर दिसतात. या पद्धतीने लागवड करणे अत्यंत सुलभ असते.
फळबाग लागवडीचे अंतर
विविध फळझाडांसाठी खड्डा खोदणे आणि भरणे महत्वाचे, त्याकरिता खड्ड्याचा आकार किती असावा ? हे खड्डे केंव्हा घ्यावेत? आणि केंव्हा भरावेत आणि कसे ? जेथे फळझाडांची लागवड करावयाची आहे,तेथे योग्य त्या अंतरावर चौरस पद्धतीने आखणी करून खड्डे खोदावेत.जमिनीच्या मगदुराप्रमाणे आणि फळझाडांच्या प्रकारानुसार खड्ड्याचा आकार ठरवावा.खड्डे खोदण्याचे काम उशिरात उशिरा एप्रिल महिन्यात पूर्ण करावे.
सर्व साधारणपणे मोठ्या आकाराचे खड्डे हलक्या जमिनीत व मोठया विस्ताराच्या झाडासाठी घ्यावेत. दीर्घायुषी झाडे असतील तर १ x १ x १ मी. आकाराचा खड्डा घ्यावा.मध्यम आकारच्या झाडांना ७५ x ७५ x ७५ से. मी. व लहान झाडांना ६० x ६० x ६० से.मी आकारचे खड्डे घ्यावेत.जमीन डोंगर उतारची असेल तर समपातळी रेषा काढून त्याप्रमाणे लागवड करावी.
विविध फळझाडांच्या लागवडीचे अंतर
|
अ.न. |
फळझाड |
लागवडीचे अंतर ( मीटर) |
हेक्टरी झाडे |
|
१. |
आंबा |
१० x १० |
१०० |
|
२. |
चिकू |
१० x १० |
१०० |
|
३. |
चिंच |
१० x १० |
१०० |
|
४. |
जांभूळ |
१० x १० |
१०० |
|
५. |
नारळ |
७.५ x ७.५ |
१७७ |
|
६. |
आवळा |
७ x ७ |
२०४ |
|
७. |
पेरू |
६ x ६ ३ x २ |
२७७ १६६६ |
|
८. |
बोर |
६ x ६ |
२७७ |
|
९. |
लिंबू /मोसंबी |
६ x ६ |
२७७ |
|
१०. |
सीताफळ |
५ x ५ |
४०० |
|
११ |
डाळिंब |
४.५ x ३ |
७४० |
|
१२. |
अंजीर |
५ x ५ ४.५ x ३ |
४०० ७४० |
फळबागेसाठी खड्डा कसा भराल?
खड्डा खोदताना वरच्या व खालच्या थरातील माती वेगवेगळी टाकावी.खड्डे तीन आठवडे तापू द्यावे,जेणेकरून प्रखर सूर्यप्रकाशामुळे खड्ड्याचे निर्जंतुकीकरण होईल. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात खड्डे परत भरावे.
खड्डे मातीने भरताना ते निर्जंतुकीकरण करून वाळलेला पालापाचोळा १५ से.मी. थरात भरावा. मातीमध्ये २०-२५ किलो चांगले कुजलेले शेणखत + २ ते ३ किलो गांडूळखत + २ ते ३ किलो लिंबोळी पेंड २५ ग्रॅम टायकोडर्मा जीवाणू +१५ ग्रॅम स्फुरद विरघळवणारे जीवाणू +२५ ग्रॅम अॅझोटोबॅकटर हे मिश्रण मिसळून घ्यावे. खड्डा जमिनीच्या वर ५ ते ७ से.मी उंच भरून ठेवावा.म्हणजे पावसाळ्याच्यासुरुवाती बरोबर लागवड करता येईल.
फळबाग लागवडीची योग्य वेळ
खात्रीशीर पाऊस झाल्यावर पावसाच्या सुरुवातीस जून महिना अगर जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. अतिपावसात अगर पावसाच्या शेवटी सप्टेबर-ऑक्टोबर मध्ये फळझाड लागवड करू नये.पावसाच्या सुरुवातीस लागवड केलेली झाडे चांगली समाधानकारक वाढतात. काही कालावधीकरिता पाण्याचा ताणही सहन करू शकतात.जून-जुलै पर्यंत वेळेवर झाडांची लागवड झाल्यास वाढ जोमाने होते.
|
फळझाडांच्या लागवडीसाठी योग्य आकाराचा खड्डा, योग्य अंतरावर एप्रिल-मे महिन्यातच खोदावेत.उन्हाळ्यात खड्डे तापू द्यावेत. खड्डा भरताना तळाला पालापाचोळा टाकून १५ ते २० किलो चांगले कुजलेले शेणखत व पोयटा माती व १ ते १.५ किलो सिंगल सुपर फॉसपेट व ५०-१०० ग्रॅम फॉलीडॉल पावडर यांच्या मिश्रणाने मे महिन्याच्या दुसऱ्यादुसऱ्या पंधरवाड्यात अथवा जून च्या पहिल्या आठवड्यात भरून घ्यावा. दोन चांगले पाऊस पडून गेल्यावर सर्वसाधारणपणे जून- जुलै महिन्यात रोपांची/कलमांची लागवड करावी.रोपे/कलमे खात्रीशीर रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत |
डॉ.आदिनाथ ताकटे,मृद शास्त्रज्ञ कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, सोलापूर, मो.९४०४०३२३८९
Published on: 24 April 2025, 02:12 IST