Agripedia

जमिनीने पिकांच्या मुळ्यांना वाढण्यास योग्य वाव दिला पाहिजे, त्यांना पाणी आणि अन्नद्रव्ये गरजेप्रमाणे उपलब्ध झाली पाहिजेत,

Updated on 13 January, 2022 9:33 PM IST

जमिनीने पिकांच्या मुळ्यांना वाढण्यास योग्य वाव दिला पाहिजे, त्यांना पाणी आणि अन्नद्रव्ये गरजेप्रमाणे उपलब्ध झाली पाहिजेत, सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी योग्य परिस्थिती, वायुवीजनासाठी योग्य तितक्या पोकळ्या, जैविक नत्र स्थिरीकरण, अन्नद्रव्ये साठवणे, गरजेप्रमाणे पिकांना उपलब्ध करणे अशा अनेक घटकांच्या एकत्रीकरणातून जमिनीची सुपीकता साकार होते.

जमीन जिवंत असते. तिच्यात अनेक लहान मोठे सजीव वाढत असतात, ते जमिनीला जिवंतपणा देतात. जमिनीतील अजैविक घटक उत्तम स्थितीत असतील तर सजिवांचे आरोग्य चांगले टिकून राहते आणि जमिनीला शाश्वत सुपीकता प्राप्त होते.

 सुपीक जमिनीचे लक्षण म्हणजे ती कायम जिवंत हिरव्या आच्छादनाने झाकलेली असली पाहिजे, आणि त्यामुळे सेंद्रीय कर्बाच्या प्रमाणात सतत वाढ होत राहिली पाहिजे. पिकांची वाढ रासायनिक पेक्षा जैविक सहभागातून झाली पाहिजे. पीक फेरपालटातून रोग – कीड नियंत्रण झाले पाहिजे. कमीत कमी हालवाहालवी झाली पाहिजे. अवजड यंत्रसामुग्री वापरल्याने मोडली जाणारी नैसर्गिक सच्छिद्रता व येणारा टणकपणा यापासून जमीन वाचली पाहिजे. मशागतीमुळे सेंद्रीय कर्बाचे कर्ब वायूत जास्त वेगाने रूपांतर होऊन त्याचा र्‍हास गरजेपेक्षा जास्त वेगाने होतो. (का?) सजिवांच्या चक्रातून जमिनीची योग्य कणरचना तयार झाली पाहिजे.

जर जमिनीच्या वर वाढणारा पिकाचा भाग योग्यरित्या वाढत नसेल, तर जमिनीच्या आतील सजीवांची वाढही योग्य प्रमाणात होत नसते. उत्तम जैविक व्यवस्थापनात जमिनीत लहानमोठ्या पोकळ्या सतत तयार होत राहिल्या पाहिजेत.पोकळ्यांतून मुळांच्या आणि सूक्ष्मजीवांच्या श्वासोच्छ्वासासाठी आणि सेंद्रीय कर्बाचे कर्ब वायूमध्ये रूपांतर करण्यासाठी प्राणवायू उपलब्ध होतो. जैविक प्रक्रिया चालू राहणे म्हणजे जमीन सजीव असणे होय.

संवर्धित शेतीमध्ये झाडे वाढवणे, पिकाच्या उर्वरित भागाचे आच्छादन, आच्छादन वनस्पती वाढवणे (जिवंत), हिरवळीच्या पिकांची लागवड, पिकांचा फेरपालट, कडधान्यवर्गीय पिकांचा आंतर्भाव यातून सेंद्रीय कर्बाचे व्यवस्थापन केले जाते. मुळांच्या सभोवतालच्या परिसरातील एकपेशीय प्राणी व निमॅटोडही योग्य व्यवस्थापनात जैविक नत्र स्थिरीकरण करतात.

जितक्या प्रमाणात एखाद्या पीकवाढीसाठी अन्नद्रव्ये वापरली जातात, तितक्या प्रमाणात ती परत जमिनीत आली पाहिजेत.मुख्यत्वेकरून ती पिकांच्या अवशेषातून आच्छादनरूपात यावीत.

अन्नद्रव्यांची जैवप्रक्रीय हलचाल संवर्धित शेतीत प्रचलित शेतीच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त असते, यामुळे प्रचलित पद्धतीतील माती परीक्षणातून खतांच्या शिफारशींचे नियम संवर्धित शेतीला लागू पडणार नाहीत. फॉस्फरस, अमोनियम स्वरूपातील नत्र, तांबे व जस्त या अन्यथा मंद हालचाल करणार्‍या अन्नघटकांची योग्य प्रमाणात हालचाल मायकोरायझा बुरशीमुळे शक्य होते.

उत्तम दर्जाच्या खतासाठी द्विदलवर्गीय वनस्पतीपेक्षा एकदल चांगल्या. एकदल काडामध्ये कर्बाच्या तुलनेत नत्राची टक्केवारी कमी असल्याने असे काड सावकाश कुजते. तसेच द्विदल तणांच्या सोटमुळांपेक्षा एकदल वनस्पतींची तंतूमय मुळे कुजल्यावर जमिनीच्या सुपीकतेमध्ये फार मोठी सुधारणा करू शकतात.

नांगरणी न करता पेरणी केल्यावर तणनाशकाचे योग्य साहाय्य न घेतल्यास तणनियंत्रण करणे जोखिमीचे होऊ शकते. तण हाताबाहेर गेल्यास पिकाचे १००% नुकसान होऊ शकते. यासाठी योग्य तणनाशकाचा वापर हा संवर्धित शेतीमध्ये महत्त्वाचा ठरतो.

जमिनीत २ प्रकारचे सूक्ष्मजीव असतात –

१. कुजवणारे – जमीन सुपीक बनवतात

२. खतातली अन्नद्रव्ये झाडाला उपलब्ध करून देणारे – झाडाला पोषण देतात.

तयार शेणखत किंवा कम्पोस्ट वापरल्यामुळे जमिनीतले दुसर्‍या प्रकारचे सूक्ष्मजीवच पोसले जातात, पहिल्या प्रकारचे नाही.

जमिनी अल्कधर्मीय होणे – जमिनीचा ph वाढणे ही सध्या एक मोठी समस्या आहे. रासायनिक खतांचा वापर, अती पाणी देणे ही कारणे आहेत असा समज आहे. परंतु सर्व रासायनिक खते ही आम्लधर्मीय असतात. त्यांच्या अति वापराने जमिनीचा ph कसा वाढेल? कुजण्याच्या क्रियेतून ph कमी होतो (humic acid) तर पिकाच्या वाढीमध्ये तो वाढतो. त्यामुळे कुजणे आणि पिके घेणे या दोन्ही क्रिया एकाच जमिनीमध्ये झाल्या तर जमिनीचा ph टिकून राहतो.

 रासायनिक खते झाडाला थेट वापरता येत नाहीत. याचे ३ टप्पे असतात:

१. रासायनिक खत टाकणे.

२. त्याचा अंश जमिनीत नीट साठवला जाणे. खत पाण्यात विरघळून वाहून न जाता जमिनीत टिकून राहायला हवे, स्थिरीकरण व्हायला हवे. यासाठे जमिनीत पुरेसा सेंद्रीय कर्ब आवश्यक असतो.

३. झाडांच्या गरजेप्रमाणे सूक्ष्मजीव ही अन्नद्रव्ये झाडाला उपलब्ध करून देतात.

English Summary: Grow crop roots and take more production
Published on: 13 January 2022, 09:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)