Agripedia

राज्यामध्ये सन 1990-91 पासून रोजगार हमी अंतर्गत 100 टक्के अनुदानित फळझाड लागवड हि महत्त्वाकांक्षी योजना सुरु झाली.

Updated on 25 February, 2022 11:17 PM IST

राज्यामध्ये सन 1990-91 पासून रोजगार हमी अंतर्गत 100 टक्के अनुदानित फळझाड लागवड हि महत्त्वाकांक्षी योजना सुरु झाली. तेव्हा पासून फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील शेतकर्‍यांच्या मनावर रुजली. फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील पडीक जमिनीला मिळालेले वरदान ठरली, अस म्हटल तर वावग ठरू नये. राज्यात आता पर्यंत 18 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर फळबागा उभ्या आहेत. परंतु अद्याप फळबाग लागवडीमध्ये अपेक्षित असे यश मिळालेले नाही हि वस्तूस्थिती आहे. अशा परिस्थितीत फळबाग लागवड यशस्वी होण्यासाठी फळबाग लागवडीची पूर्वतयारी आणि नियोजन या महत्वाच्या बाबी आहेत.

फळबागेच्या यशस्वी लागवडीकरिता महत्वाच्या बाबी कोणत्या?

आपल्याकडे जमीन कोणत्या प्रकारची आहे? आपल्या जमिनीत फळझाडे येतील का? बारमाही पाण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे का? आपल्या हवामानात फळझाडे कोणत्या प्रकारची येऊ शकतील? मातीची व पाण्याची तपासणी केली आहे काय? बागेसाठी उत्तम जातीवंत कलमे कोठून उपलब्ध होऊ शकतील? जी बाग आपण लावणार आहोत त्यास बाजारपेठ उपलब्ध आहे काय? प्रक्रिया उद्योग आहेत काय? अशा सर्व बाबींचा विचार केल्यानंतरच आपणास कोणती फळझाडे लावायला हवीत याचा विचार करणे महत्वाचे ठरते.

फळबाग म्हणजे 5 ते 6 महिन्याच्या पिकांच्या मशागतीची गोष्ट नसते, तो एक दिर्घकाळ चालणारा व्यवसायच म्हणायला हरकत नाही. एकदा त्यात पडले कि थांबुन चालत नाही. अनेक वर्ष सातत्याने व चिकाटीने बागेचे फलोत्पादन हाती येईपर्यंत कष्ट करावे लागतात. यासाठी बरीच संकटे पुढे येतात. त्यात कधी कधी पैसा अपुरा पडतो, पाणी पुरत नाही. भावनेच्या भरात एखादी बाग करावयाची ठरविले जाते आणि मग धाडस निभाविता येत नाही. सगळा पसारा अर्ध्यावर सोडावा लागतो. त्यामुळे केलेल्या कष्टाची पैशाची, अनाठायी नासाडी होते त्यामुळे फळबाग लागवड करण्यापूर्वी योग्य नियोजनाची नितांत आवश्यकता असते.

फळबागेसाठी जमिनीची निवड

आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे, हलकी, मध्यम कि भारी हे सर्वाना परिचित असतेच.जर माहिती नसेल तर माहिती करून घ्यावी. जमिनीची खोली किती आहे? जमिनीच्या खाली मुरूम किती खोलीवर आहे? जमिनीचा निचरा कसा आहे? त्याचा अभ्यास करूनच फळबाग निवडावी. जमिनीची निवड करताना निचरा उत्तम असणे आवश्यक आहे. फळबागेसाठी कमीत कमी 1 मीटर खोलीनंतर मुरमाचा थर असणारी जमिन निवडावी. भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी, भुसभुशीत, मध्यम पोताची जमिनीचा सामू 6 ते 7.5 पर्यंत असावा. मुक्त चुनखडीचे प्रमाण 10 टक्क्यापेक्षा कमी असावे. जमिनीचा उतार 2 ते 3 टक्क्यापेक्षा जास्त नसावा. ज्या ठिकाणी फळबाग लावायची आहे, त्या ठिकाणच्या मातीचे परिक्षण करून घेणे आवश्यक आहे.

फार खोल असणार्‍या जमिनी, क्षारयुक्त जमिनी, चोपण जमिनी यातून पाण्याचा निचरा योग्य होत नाही अशा जमिनीत प्रारंभी झाडे वाढल्यासारखी दिसली तरी पुढे वाढीचा वेग मंदावतो व उत्पादन मिळत नाही. काही वेळा झाडे मरण्याची संभावना असते. तसेच ज्या जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण 10 % पेक्षा जास्त आहे अशा जमिनीत फळबागेची वाढ होत नाही. 

माती परिक्षण करण्यासाठी फळबाग क्षेत्रातील मातीचा नमुना कसा घ्यावा?

फळबागे करिता मातीचा नमुना घेताना जमिनीच्या प्रकारानुसार प्रातिनिधिक नमुना घ्यावा. सर्वप्रथम 3×3×3 फुट खोलीचा (100 से.मी) किंवा मुरूम लागेपर्यंत खड्डा करून पृष्ठभागापासून प्रत्येक फुटातील प्रतिनिधिक नमुना काढावा व तो वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून तपासणीसाठी पाठवावा. माती परीक्षणाप्रमाणेच पाण्याची तपासणी करणे आवश्यक आहे. आपल्या विहिरी/बोअरचे पाणी क्षारयुक्त वा मचूळ असू नये ते गोड असावे. तेव्हा माती बरोबरच, पाण्याचेही रासायनिक परिक्षण करून घ्यावे आणि त्या अनुषंगानेच फळझाडांची निवड करावी.

 

फळबागेसाठी पाण्याची उपलब्धता

बागायती फळझाडांना नियमित पाणी द्यावे लागते, अशा बागायती फळझाडांची लागवड करताना कितपत पाणीपुरवठा पुरेल किंवा पाण्याची उपलब्धता किती आहे, याचा विचार करूनच नियोजन करावे. कोरडवाहू फळपिकांना लागवडीच्या सुरुवातीस पहिली तीन ते चार वर्ष चांगल्या व समाधानकारक वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असते. नारळ, सुपारी, केळी, पपई, चिकू मसाला पिके यांना इतर फळझाडांपेक्षा जास्त पाणी लागते. तसेच फळझाडांवरील कीड व रोगांच्या नियंत्रणाकरिता आवश्यक फवारणीसाठी पाण्याची आवश्यकता असते. म्हणून पाण्याच्या उपलब्धतेनुसार फळझाडांची निवड करावी. आपल्याकडे 12 महिने पाण्याची सोय असेल तर ज्या फळझाडांना बाराही महिने पाणी लागते अशा फळझाडांची निवड करावी. आपल्याला पाणी आठ महिने पुरत असेल तर पेरू सारखी फळझाडे लावावीत. आपले पाणी फक्त सहा महिने पुरत असेल तर सीताफळ, रामफळ, आवळा, बोर या सारखी कोरडवाहू फळझाडांची लागवड करावी.

हवामानानुसार फळपिकांची लागवड 

महाराष्ट्रातील शेतकरी या बाबतीत खरोखरच भाग्यवान आहेत, कारण आपल्या राज्यात सफरचंद वगळता बहुतेक फळझाडांची यशस्वी लागवड करता येते. कारण आपल्या राज्यातील हवामान फळबाग लागवडीसाठी खुपच अनुकूल आहे. यामुळे हवामानाच्या बाबतीत फळबाग लागवड करताना शेतकर्‍यांना फारसा विचार करावा लागत नाही. आपल्या राज्याचा विचार करता पश्‍चिम महाराष्ट्रात आंबा, केळी, चिकू, पपई, नारळ अशा प्रकारची फळझाडे घ्यावीत. पूर्वेकडील उष्ण व कोरड्या हवामानात संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, पेरू, द्राक्षे, डाळिंब यासारखी फळझाडे घ्यावीत. कोकण सारख्या अति पावसाच्या भागात चिकू, नारळ, फणस, आंबा काजू यासारखी फळझाडे घ्यावीत. अति कमी पावसाच्या भागात बोर, सीताफळ, आवळा, चिंच अशी कोरडवाहू फळझाडे घ्यावी.

कलमांची निवड कशी कराल?

फळबागांपासून काही वर्षाच्या मेहनतीनंतर उत्पन्न देणारे झाड न मिळाल्यास ते तोडून दुसरे लावणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. फळझाडांची कलमे, रोपांच्या निवडीवर फळांची गुणवत्ता आणि फळबागेचे एकूण यश अवलंबून असते म्हणून बागेकरिता उत्कृष्ट आणि गुणवत्ता माहित असलेली दर्जेदार आणि खात्रीशीर कलमे/रोपे आणावी. शक्यतो कृषी विद्यापीठ किंवा शासकीय रोपवाटिकेमधून रोपे आणावीत. शक्य नसल्यास आपल्या माहितीतील शासकीय परवानाधारक रोपवाटिकेतून कलमे/रोपे घ्यावीत. कलमांची निवड करताना ती किती उंच आहेत, यापेक्षा ती योग्य त्या जातीच्या मातृवृक्षापासून केलेली आहेत कि नाहीत याबाबींकडे अधिक लक्ष द्यावे. रोपे घेताना कलम बांधलेली आहेत व जोड पूर्णपणे जुळलेले आहेत याची खात्री करून घ्यावी. त्याच बरोबर ती वाढीला जोमदार आहेत, निरोगी आहेत आपणास पाहिजे त्याच जातीची आहेत याची खात्री करूनच घेतली पाहिजे.

नवीन रोपांची/कलमांची लागवड कशा प्रकारे कराल?

प्रथम लागवड करण्यापूर्वी कलमाच्या पिशवीच्या दोन्ही बाजूंवर उभा काप द्यावा व मुळाभोवती असलेला मातीचा गोळा न फुटता पॉलिथीन बॅग काढावी. मोकळा झालेला गोळा दोन्ही हातात धरून खड्ड्याच्या मधोमध ठेऊन हलकेच दाबावा व मोकळ्या हाताने माती भरून गोळ्याभोवती माती टाकावी. अगोदर हाताने व नंतर पायांनी दाबावी, हे करताना मातीच्या गोळ्यावर पाय पडणार नाही याची काळजी घ्यावी. आवश्यकता वाटल्यास हलकेसे पाणी द्यावे. आधारासाठी पश्‍चिम बाजूस 6 इंच अंतरावर 4 ते 5 फुट बांबूची काठी रोऊन त्यात कलम बांधावी.

English Summary: Do also pre preparation cultivation and plantation of orchards
Published on: 25 February 2022, 11:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)