Agripedia

रोज उत्पन्न वाढेल या आशेवर कोणी काय सांगेल ते प्रयोग करून अंगावर कर्ज वाढवून ठेवायचं काम शेतकर्यांकडून सध्या चालू आहे.

Updated on 25 November, 2021 8:00 PM IST

आज यश मिळेल उद्या नफा होईल, हे केलं तर पानं रूंद होतात, ते केलं तर पांढऱ्या मुळ्या वाढतात, अमुक फवारणी केली की वजन वाढते, अमुक खते घेतली की फुटवे चांगले निघतात.

सगळे शेतकर्याची फसवणूक करून पैसे कमावणारेच. रास्त भाव, हमी भाव, एम एस पी, स्वामीनाथन, रंगनाथन ही मागणी केली की योग्य दर मिळेल, तो आयोग लागू झाला पाहिजे मग उत्पन्न दिडपट मिळेल असे ऐकून ऐकून दर वर्षी अनुभव घेत देत फक्त कर्ज वाढत गेलं.

एक एक प्रयोग फेल गेला कि नशीबाला दोष देत एक एक वावर कधी विकलं कळलंच नाही.कर्ज काढून पाण्यासाठी पाईपलाईन केली , घरच औत असलं तर नांगरट चांगली होते, ट्रॅक्टर घेतला, शेणखतासाठी जनावरं केली, शेतीला जोडधंदा असावा म्हणून कोंबड्या शेळ्या, कर्ज काढून घेतली.कुणी सांगीतलं शेततळं काढा, कुणी सांगीतलं ड्रिप करा, द्राक्षे लावा, डाळींब लावा, सगळं केलं, वाढलं फक्त कर्ज.  

सरकार कडून मिळाली सवलत फसवी,

दररोज चारा घालून वाढवलेल्या बोकडावर जसं कापण्यासाठी मांस वाढण्याची वाट पाहात सांभाळले जाते,

तसे शेतकर्याकडे बघण्याची सगळ्यांची दृष्टी. खतवाला, औषधवाला, बॅंकवाला, सावकार, आडत्या, साखर कारखानदार, दुध संघवाला, सगळे शेतकर्याची पीकं कापायला येण्या पुरतीच मदत करतात, शेतकरी मोठा व्हावा ही कोणाचीच इच्छा नाही. बोकड जस मालकाची आपल्यावर मर्जी आहे वाटून उड्या मारत जगत असते, आणि शेवटी कळतं यान आपल्याला का सांभाळले, तसे वेळ गेल्यावर कळतं शेतकर्याला उत्पादन वाढवायला का सांगीतले ते. वर्षातून तीन तीन पीक घेऊन, पाणी पाजून पाजून, खत घालून घालून शेती नापीक होते, तरी प्रयोग थांबत नाही. ज्याला त्याला विचारलं तर म्हणतय घरची शेती आहे, पडीक पाडायची काय? आणि पळून पळून प्रयत्न करून उत्पन्न डब्बल करायच्या नादात कर्ज डब्बल कधी होते कळतच नाही. खरं आहे, रोज होणाऱ्या शेतकरी आत्महत्या आमचं मन सुन्न करीत नाही.

कारण, कुणीही त्यावर बोलायला तयारच नाही.

शेती ही संस्कृती आहे असे ऐकून ऐकून कान पिकले आहेत. शेती करणारा शेतकरी तिथेच मातीत गाडल्या जातो आहे. बापाच्या छातीवर हात ठेवून झोपणाऱ्या मुलांना विचारा एकदा की तू का ठेवतो छातीवर हात? तेव्हा त्याचं उत्तर येते की बाप जिवंत आहे की गेला हे अधूनमधून चेक करावे म्हणून ठेवावा लागतो हात. भयाण आहे हे सर्व आमच्या शेतीची पार वाट लावून टाकली इथल्या राजकीय सत्तेने. शेतीवर कविता करणारे छान जगतात. शेतीवर कादंबरी लिहिणारे खुशाल जगतात. शेतकरी आत्महत्या वर पुस्तक लिहिणारे सुद्धा मजेतच असतात. शेती कशी करावी हे सांगणारे तर अधिकच मजेत आहेत.

प्रत्यक्ष शेतीत राबणारा जीव मात्र कासाविस होतो आहे. त्याला त्याच्या प्रश्नांचे उत्तर शोधू दिले जात नाही हीच खंत आहे. 

 जैविक शेतकरी शरद केशवराव बोंडे.

English Summary: Baliraja used as a scapegoat. God will not forgive those who do.
Published on: 25 November 2021, 08:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)