Agripedia

झाडांच्या बिया जमिनीवर पडतात, आपल्या आपण उगवून येतात. जगात ज्या ठिकाणी माणूस प्रथम शेतीकडे वळला, त्या सर्व ठिकाणांचे महत्वाचे वैशिष्ट्य होते, अतिशय सुपीक जमीन. अशा जमिनीत एखादे बी नुसते खोचले,

Updated on 10 December, 2021 7:30 PM IST

तरी रोप उगवून येणे शक्य होते. शेतात बाहेरून काही आदाने (पाण्याखेरीजही) दिली पाहिजेत हा विचार मग नेमका कसा पुढे आला आला, हे सांगणे अवघड आहे, पण जवळजवळ सर्व प्राचीन कृषिप्रधान संस्कृतींमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात शेतजमिनीत बाहेरून काही पदार्थ घातले जात होते असे पुरावे मिळतात. यामध्ये राखेचा वापर सार्वत्रिक होता. पुढे युरोपात समुद्री पक्ष्यांच्या आणि वटवाघळांच्या विष्ठेचा खत म्हणून वापर केला जाऊ लागला. अशा विष्ठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या खडकाळ सागरी किनाऱ्यांना आणि गुहांना व्यापारी महत्व प्राप्त झाले. एका अर्थाने ही अगदी पहिली खते म्हणता येतील. पण या खतांचे नेमके काम काय, हे त्यावेळी माहित नव्हते, असे पदार्थ जमिनीत घातले तर उत्पन्न वाढते, या निरीक्षणाच्या जोरावरच हे चालू होते.

पिकांच्या वाढीसाठी नायट्रोजन व इतर काही खनिज पोषणद्रव्यांची विशिष्ट प्रमाणात गरज असते, हा विचार शास्त्रीय पध्दतीने 19व्या शतकातील जर्मन रसायन शास्त्रज्ञ जस्टस फॉन लीबग यांनी प्रथम मांडला.

शेतीशास्त्राची मांडणी ही बरीचशी लीबग यांनी घातलेल्या पायावर उभी आहे. वनस्पती जमिनीतील खनिजांमधून पोषण मिळवत असतात, त्यामुळे आपण जेव्हा जमिनीत उगवलेले पीक कापून बाजूला काढतो, तेव्हा शेतातल्या मातीतून खनिजे कमी होतात. त्यामुळे प्रत्येक पिकासाठी मातीत बाहेरून विशिष्ट प्रमाणात ही खनिजे परत घातली पाहिजेत, नाहीतर कालांतराने मातीतली खनिजे संपून माती पूर्णतः नापीक होईल, हा विचारही लीबग यांनी प्रथम मांडला. मग राख किंवा पक्ष्यांची विष्ठा किंवा माशांच्या हाडांचा चुरा, इ. पदार्थांतून आडवळणाने खनिजे देण्यापेक्षा, आवश्यक त्या प्रमाणात थेट शुध्द रसायनेच का घालू नये, हा विचार त्यांच्या कामातूनच पुढे आला, त्यामुळे त्यांना खत उद्योगाचे जनकही म्हटले जाते.

मात्र कारखान्यांमध्ये खास निर्माण केलेली शुध्द रसायने थेट शेतात वापरण्याचे दुष्परिणाम लक्षात आल्यावर, अलिकडच्या काळात सेंद्रीय शेतीची संकल्पना पुढे आली. सेंद्रीय शेती ही खतांचे महत्व नाकारत नाही, फक्त त्या खतांचा स्रोत इथे वेगळा आहे. वनस्पतींनी जमिनीतून उचललेली पोषणद्रव्ये ही अन्नसाखळीचा भाग बनतात. तेव्हा अन्नसाखळीतला कोणताही टाकाऊ पदार्थ या पोषणद्रव्यांचा स्रोत म्हणून वापरता येईल, हा त्यामागचा विचार आहे. पण ज्या पध्दतीने सेंद्रीय शेती केली जाते, त्यात आणि रासायनिक शेतीत तत्वतः फार फरक नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

सेंद्रीय शेतीमध्ये सेंद्रीय पदार्थ – मग ते शेण असेल, किंवा शेतातला काडीकचरा, इ. – कुजवून त्याचे खतात रूपांतर केले जाते. कुजवण्याच्या प्रक्रियेत त्या सेंद्रिय पदार्थातील कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन बऱ्याच अंशी हवेत उडून जातात, आणि खनिज पदार्थ मागे रहातात.

मग अशा रितीने तयार केलेले खत किती प्रमाणात जमिनीत घालायचे, हे त्या पिकाची या पोषक रसायनांची गरज किती आहे, आणि तयार केलेल्या खतात या रसायनांची मात्रा किती आहे, यावर ठरते. त्यामुळे जिथे रसायनिक शेतीत काही किलोग्रॅम शुध्द रसायन घालून भागते, तिथे सेंद्रीय खताच्या मात्रा मात्र टनाच्या हिशोबात असतात.

एकदा कारखान्यात बनवलेली कृत्रीम रसायने मातीत जाऊ द्यायची नाहीत, हा विचार रुजला की तो फक्त खतांपुरता मर्यादित रहात नाही तर कीटकनाशक आणि तणनाशकांनाही आपल्या कवेत घेतो. मग वेगवेगळ्या सेंद्रीय स्रोतांतून निर्माण केलेली

संरक्षक द्रव्ये यासाठी वापरली जातात, किंवा काही प्रमाणात उत्पन्न कीटकांना अर्पण करण्याची मानसिक तयारी करावी लागते.... धन्यवाद विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल

मिलिंद जि गोदे युवा शेतकरी

milindgode111@gmail.com

English Summary: Agriculture and the process of nature Plants grow on their own in nature.
Published on: 10 December 2021, 07:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)